
विकणे आहे…
ऑक्टोबर 12, 2009एका अतिसामान्य नागरिकाचे म त योग्य किंमतीस विकणे आहे…
अटी व शर्ती :
उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असावा. (त्याशिवाय मागेल तो दाम कसा मिळणार?)
उमेदवार अशिक्षित असावा. (त्याशिवाय तो राजकारणात यशस्वी कसा असणार?)
उमेदवार चारित्र्यहीन असावा. (त्याशिवाय वाटृटेल ती किंमत मोजण्याइतका पैसा त्याच्याकडे कोठून येणार?)
उमेदवार सामाजिक उत्कर्षापेक्षा वैयक्तिक उत्कर्षाला महत्व देणारा असावा.(त्याशिवाय तो आमचा आर्थिक उत्कर्ष कसा करणार?)
वरील अटी पूर्ण करु शकणारयांनी त्वरित संपर्क साधावा.
मोबदल्याच्या निवडीसाठी पर्याय -
१ – स्वत:चा विकास
२ – स्वत:चा व कुटुंबाचा विकास
३ – स्वत:चा, कुटुंबाचा व अनुयायांचा विकास
४ – स्वत:चा, कुटुंबाचा, अनुयायांचा, नातेवाईकांचा विकास
५ – पर्याय १ ते ४ सह जमल्यास देशाचा विकास
त्वरा करा, मर्यादित कालावधीसाठीच ऑफर आहे.
ता.क. सर्वाधिक बोली लावणारयांस एका म ता वर एक म त फ्री मिळेल!
आपला
- अतिसामान्य मत’दारु’ अण्णा.
तो सूर शोधण्यासाठी
ऑक्टोबर 8, 2009
www3.telus.net वरुन साभार
मौ को कहॉं ढूँढे रे बंदेऽ
गंगाद्वारचा पहाड सुरू होतो, तिथल्या जंगलात पायऱ्यांकडे जाणारा रस्ता सोडून जरा आतल्या बाजूला जावं. रानपाखरांच्या ओल्या कुजबुजीत एकतारीवरचा सूर ऐकू येतो. पावसाच्या अलगद कोसळण्याच्या संथ लयीशी सम साधून कुणाचा तरी भक्तीनं भारलेला स्वर. कोणतेही गेय संस्कार न झालेला, तरीही आतून आल्यासारखा हलवून टाकणारा..
त्या आवाजाचा कानोसा घेत थोडंसं जंगलात आत शिरावं.. एका बाभळीच्या झाडाच्या खोडाला हात टेक वून उभा संन्यासी. समोर उभ्या ब्रह्मगिरीच्या डोंगराकडे पाहत भजन गुणगुणतोय.
शेजारी बहुधा त्याचाच पाळलेला श्वान. पावसानं ओलं झालेलं अंग झटकत संन्याशाच्या मागे-पुढे गिरक्या घालतो. आपल्याच तंद्रीत असलेला संन्यासी गाण्याच्या लयीत पाठीमागे वळतो. पाहणाऱ्याकडं दृष्टी जाताच डोळे अर्धवट मिटून हसतो. ओठांवरचं भजन त्याच लयीत हलकेच संपतं.
फार छान चाल आहे हो भजनाची !
नुस्ती चालच ऐकली का ?
?
चालीपेक्षा शब्द जास्त गोड आहेत रे
उत्तरादाखल ऐकणारा सहमतीदर्शक हसतो.
संन्याशाची उमर पन्नाशीच्या आसपासची.
स्वत:शीच काही तरी संवाद सुरू असल्यासारखा.. तो काही क्षण शांत होतो. डोळे मिटून श्वास आत घेत एक ओमकार म्हणतो.
तू मत कर मोहऽ
एकतारीच्या षडजासह दुसरं भजन सुरू होतं…
तयारीच्या गायकासारखा आवाज नसूनही, त्यातनं भरभरून वाहणारा भाव ऐकणाऱ्यांच्या कांनांपलीकडे आत खोलवर शिरतो. ऐकतच राहावं अशी अवस्था.
या चाली तुम्ही लावल्यात ?
पुन्हा चालीभोवतीच घोटाळलास का ?
सांगा ना..
मी लावलेल्या नाहीत. मला संगीतातलं काही कळत नाही रे.. ऐकलेल्या आहेत..
कुणाकडनं..
गुरुजींकडनं. त्यांना संगीताची विलक्षण जाण होती..
कुठनं आलात तुम्ही ?
ते फारसं महत्त्वाचं नाही..
तुम्ही गाणं शिकलाहात का ?
नाही. गुरुजींनीच शिकवलेली भजनं आहेत, ती म्हणतो.
फार गोड चाली आहेत.
आतून गायलं की साधं गाणंही गोड वाटतं. हे तर देवाचं भजन आहे, ते गोड वाटणारच.
सिंहस्थासाठी आलाहात का?
उत्तरादाखल फक्त होकारार्थी मान डोलावली जाते?
मग साधुग्रामात राहणार असाल ?
नाही. इथंच..
इथं कुठं ?
कुठंही..
अशी किती भजनं तुम्हाला येतात ?
तुला किती ऐकायचीत ?
इच्छा तर भरपूर आहे; पण तेवढा वेळ नाहीये हो.
पुन्हा नवं भजन सुरू होतं..
तेवढ्यात ऐकणारा चमकतो. अरे, हे तर मघाचंच भजन.
मौ को कहॉं ढूँढे रेऽ
पण ही चाल पहिल्यापेक्षा वेगळी.. गोडवा मात्र तेवढाच.. ऐकणारा तल्लीन होऊन जातो.
आणखी ऐकायचंय ?
पुन्हा दुसरं भजन सुरू होतं. तू मत कर मोहऽ हे देखील पहिल्या खेपेपेक्षा वेगळं. अनवट, पण मधुर..
यांच्याकडे अशा चाली आहेत तरी किती..
ऐकणाऱ्याच्या मनातला प्रश्न जणू ओळखल्यासारखं समोरून उत्तर येतं,
मला ही दोनच भजनं गुरुजींनी शिकवली.
म्हणाले, आयुष्यभरासाठी तुला एवढं पुरेसं आहे.
त्यांच्यातच ईश्वर भेटेल. तेव्हापास्नं रोज शोधतोय. हर प्रकारे.. अजून तो स्वर सापडला नाही.
ऐकणारा स्तब्ध झालेला..
एकतारी पुन्हा छेडली जाते..
समोरच्या झाडीत संन्यासी दिसेनासा होतो.
दूर जाणारे भजनाचे सूर मात्र तिथंच रेंगाळत राहतात…
- अमोल
(संन्यस्तछटा या २००४ मध्ये प्रकाशित माझ्या पुस्तकातील एक उतारा)
कोजागरी
ऑक्टोबर 6, 2009काल रात्री अचानक
डोळ्यांनी चांदणं खुडताना
हळूच हाती लागला
तुझ्या पापणीआडचा चंद्र
आणि ओंजळीत उतरलेल्या
त्याच्या प्रकाशाची तिरीप
मनाच्या माजघरात आरपार
अवघडलेल्या अंधारात
माझे मलाच शोधताना
हलकेच लखलखून गेल्या
तुझ्या असण्याच्या खाणाखुणा
ओठावरचा दवबिंदू वेचताना
अलगद गालावर फिरावा
उष्ण लाजरा श्वास
तशीच चांदण उब पसरली
अंगांगावरती
आवेगाची घट्ट रुतावी
नखे त्वचेवर
तसे उमटले कुजबुजलेले
शब्द क्षणांच्या
देहावरती
आणि सरती रात्र
नेमका समजावून गेली
तुझ्या कटाक्ष पौर्णिमेचा
माझ्या हरवलेपणाशी
अनोळखी संदर्भ
अर्थाअर्थी
को जागर्ती, को जागर्ती !
- अमोल
सुपारी
सप्टेंबर 23, 2009तर भाईनं पहिली मीटिंग घेतली शूटर शंभूसोबत.
भाईचे सगळे व्यवहार तसे रोखठोक.
स्पष्ट. अगदी एखाद्याचा गेम वाजवायचा असला, तरी त्याला सांगून सवरुन.
त्यामुळे मीटिंगमध्येही त्यानं शंभूला सांगितलं,
“शंभ्या, लेका हा असा प्रॉब्लेम आहे.”
“जागा एक और आदमी तीन.”
“भौत बडी नाइन्साफी है.”
“आता यातून बाहेर पडायचा मार्ग एकच आहे. काय?”
“अन तो कोन्चा भाई?”
शुटर शंभूनं आज्ञाधारकपणे विचारलं.
तर भाई म्हणाला,
“हे बघ शंभ्या, आपल्या धंद्याचा उसूल एकदम सीधा हाये.”
“ते म्हण्तात ना, जो जीता वही शिकंदर”
“तर आता त्याच उसुलप्रमाने आपल्याला तुमच्या तिघातला शिकंदर निवडायचा आहे.
समजलास?”
“होय भाई.”
“मग आता निघ आणि उद्याच्याला रात्री अकरा वाजता समुद्रकाठच्या गुदामात तयार रहा मुकाबल्याला.
तिथं तुमच्या तिघांत मुकाबला होईल.
आन मग जो जिता वो शिकंदर.”
भाई विषयीच्या आदराने शूटर शंभूचे डोळे भरून आले. त्याला अगदी भडभडूनच आलं हो.
भाईच खरा न्यायी, असं वाटलं त्याला. देशाचा पीएम होन्याची लायकी या मान्साची आसं पन तेवढृयापुरतं वाटलं त्याला.
भाईच्या पाया पडून तो गेला.
………………………………..
आता सुरेबाज सुरेशसोबतची मीटिंग.
तर भाई पुन्यांदा एकदा रोखठोक.
त्यानं सुरेशसोबतही जो जीता वोही शिकंदरचा एक शो केला.
त्याला बी उद्या रात्री अकराला समुद्राकाठच्या गुदामात बोलावला.
सुरेबाज सुरेशलाही वाटलं, भाई भारताचाच काय, अमेरिकेचाबी पीयेम बनायला पायजे.
भाईच्या पाया पडून तो पन चालता झाला.
………………………………….
आता मीटिंग सवाई भाईसोबत.
हा… चुकलात.
भाई इथं बी रोखठोक.
म्हणाला, “लेका, आयुष्यात आपन याच उसुलावर वागलो की जो जीता वोही शिकंदर. तवा तुला उद्याच्या गेम शो मध्ये एकतर शिकंदर व्हावं लागंन
न्हायतर जागेवर पानी सोडावं लागंन.
माज्या परीनं मी न्याय केलेला हाये, आता स्वताची पात्रता शिद्द करा.
आन या आता.”
सवाई भाईनं मान डोलावली, आन तो बी भाईच्या पायाला स्पर्श करुन चालता झाला.
तर आता समुद्रकाठचं गुदाम.
रात्री अकरा वाजता. गेम शो.
कौन बनेगा तिकिटपती?
……………………………….
समुद्राकाठचं गुदाम म्हणजे भाईचा पुराणा अड्डा.
म्हण्जे दिवार मधल्या अभिका बच्चनचा (हा खास भाईचा शब्द) कित्ता गिरवत भाई भाई झाला तेवापासुनचा.
भाईने आपले कारकिर्दितले सगळे महत्वाचे टप्पे हितंच साजरे केले.
भाईची फेवरेट प्लेस म्हणा हवं तर.
त्यामुळे आजच्या गुंत्याचा निकालबी हितंच लागनार हे ठरलेलंच.
खरं तर ठरलेलं काय असतं म्हना.
तो सर्वांच्या वर कोन बसलेला असतो, तो आधीच ठरवतो आन त्याला पायजे ते घडवून आन्तो.
त्यामुळं भाई तसा निश्चिंत.
आपन काय काळजी करायची, जे होईल ते होईल, असं तो मनाशी म्हणाला.
तर अकरा वाजून एक मिनिटांनी गुदामात पहिली एंट्री झाली, ती शूटर शंभूची.
बघतो तर सगळा अंधार.
पण गुदामाचा कोपरा न कोपरा माहित असल्यानं तो सराईत पावलं टाकीत पुढं चालला.
सूं…… धप्प.
अंधारातून विजेच्या वेगानं सुरा आला आन त्यानं शंभूच्या नरड्याचा वेध घेतला.
काम तमाम.
शंभूला ओरडायची पन संधी मिळाली नाय.
अकरा वाजून दोन मिनिटं.
धापा टाकीत सुरेबाज सुरेश गुदामात शिरला.
मिटृट काळोख.
पण चप्पा चप्पा माहीत असलेला सुरेश सावधपणे पुढे सरकला.
सूं…… धप्प.
एकच गोळी. वर्मी घाव. काम तमाम.
भाईनं दुसर्या दिवशी सकाळी साडेनवाला तातडीची मिटिंग बोलावली.
“हे बगा दोस्तांनो, आपल्या गँगेतले दोन खंदे मोहरे काल रातच्याला तिकिटाच्या लढाईत जीव गमावून बसले.
दोगांनाबी तिकिट हवं होतं, आन आम्ही दोघांनाबी सामोपचारानं, चर्चा करून तोडगा काडू असं सांगितलं होतं.
पन तिकिटाच्या मोहापायी भलती स्पर्धा करायला गेले आन दोगंबी एकमेकाला मारुन बसले.
आता प्रश्न असा आहे, की तिकिट कोनाला द्यायचं.
तर माला वाटतं की आता दोगंबी योग्य उमेदवारच उरले नसल्याने तिकिट सवाई भाईला देण्यात काय अडचण नसावी. काय?”
सर्वांनी माना डोलावल्या.
भाईला समाधान वाटलं.
वर बसलेल्यानं योग्य निकाल लावला होता.
“शाबास पोरा, घरान्याची इज्जत राखलीस.”
“ते तर मी जमवनारच होतो भाई.”
“सगळं व्यवस्थित करतो का नाय असं टेन्शन होतं.”
“छृया, येकदम सिंपल झालं, तुमी म्हटले, जो जीता वोही शिकंदर, पन कैसे जीता हे थोडीच विचारलं. म्हनलं कसा बी जिंकला तरी जो जिता वोही शिकंदर.
मग काय, पावनेअकरालाच गुदामाच्या माळृयावर जाउन बसलो.
इकडच्या दारानं शंभू आला, त्याला टिपला आन तिकडच्या दारानं सुरेश आला त्याला उडवला.
दोघांकडनं पिस्तुलगिरी आणि सुरेबाजी शिकलो त्याची गुरुदक्षिना देउन टाकली.
पन ती वरची जागा लय सोयीची ठरली.
त्यामुळंच तर ठरवलं तसं घडवता आलं.”
“पोरा, वरची जागा सोयीची असते म्हनूनच तर कायबी अन कवाबी आपल्या मनासारखं घडवता येतं, हे आता तुझ्या डोक्यात घुसलं ते बरं झालं.
तेवा वरच्या जागेवरच लक्ष आसू दे.”
“शेवटी आपल्या हातात काय आहे, वर बसलेला ठरवेल तसं होतं, काय समजलास?”
(समाप्त)
सुपारी
सप्टेंबर 21, 2009भाईच्या डोक्याची एवढी मंडई कधीच झाली नव्हती.
नव्हे, ती करुन घेण्याचा भाईचा स्वभावच नव्हता.
भाईचा भर सारा ऍ़क्शनवर.
जी काय मंडई करायची ती समोरच्याच्या डोक्याची.
त्याशिवाय तो भाई झालाच नसता ना.
आणि समाजात त्याला भाई म्हणून मान (!) बी मिळाला नसता.
भाई शेल्फ मेड होता.
आणि सगळी शेल्फ मेड मान्सं असतात तसाच होता. नो नॉन्सेन्स.
जे काय असेल ते एकदम एक घाव दोन तुकडे.
आर या पार.
त्यामुळे प्रश्न कोणतेही असोत, भाईच्या समोर गेले की ते सुटणार,
नाहीतर पार निकाल लागणार.
पण सरकारसारखं भिजत घोंगडं..
कधीच नाही.
भाईला ते परवडणारच नव्हतं.
नायतर तो भाई होवूच शकला नसता ना.
भाई तसा लीडर. बॉर्न लीडर.
आपल्या टीमच्या काळजात घुसून राहणारा.
म्हणूनच गेली वीस वर्ष त्याच्या विरोधात कुणी बंड करून उभं राहिलं न्हवतं.
अर्थात भाईनं तसं कुणाला राहू दिलंही नाही.
पण भाई तसा गुणग्राहकही बरं का.
म्हणूनच शार्प शूटर शंभू असो किंवा सुरेबाज सुरेश,
प्रत्येक यशस्वी गेम नंतर भाई त्यांच्या कलेचं वारेमाप कौतुक करायचा. म्हणते अजूनही करतो.
त्याच्या दृष्टीनं शंभू आणि सुरेश म्हणजे गेम मधले आर्टिस्टच.
भाई तसा कोणाला डरायचा नाही.
कोणालाच नाही. म्हणजे निदान तसं दाखवायचा नाही.
त्याशिवाय तो भाई झालाच नसता ना.
तर भाई काही लोकांना आपण डरतो असं दाखवायचा. म्हणजे दाखवतो.
खरं तर भाईच अशा लोकांना प्रोटेक्शन देतो.
पण आपणच त्यांच्या प्रोटेक्शनमदी आहोत असं दाखवतो.
म्हणजे दाखवावं लागतं.
कारण ही सगळी मोठी माणसं.
गल्ली पासून दिल्ली पर्यंत यांची वट.
आणि वटवट
देशहिताची.
पण खटपट स्वहिताची.
काय करतील, त्यांनाही पोट आहेच ना भाईसारखं.
हा आता ते जरा अंमळ मोठं आहे म्हणा.
पण त्याला कोण काय करु शकतो.
तर भाई यांच्या हुकमाचा ताबेदार.
आणि यांच्या सेकंड लाईफचा शिलेदार.
सेकंड लाईफ हो. बियाँड बुक्स.
हे सोडले, तर भाईला कोणाचं ऐकून घेण्याची सवय नाही.
भाई इतरांना ऐकवतो.
कधीतरी तोंडाने आणि बरृयाचदा हाताने.
त्यामळे भाई कोणाला आन्सरेबल नाही बरं का.
अगदी स्वत:ला सुद्धा.
त्यामुळेच त्याच्या डोक्याची मंडई सहसा कधी होत नाही.
मागच्या वेळेला झाली ती वीसेक वर्षांपुर्वी.
तेव्हा तो गँगचा शार्प शूटर होता.
बॉसचा आवडता. त्यामुळे बॉसनंतर गँगची सूत्रं याच्याकडेच.
पण काय झालं कुणास ठाउक.
कोणी तरी याच्यावरच गेम केली आणि बॉसचे कान भरले.
बॉसनं याला गँगेतूनच काढलं.
भाईच्या डोक्याची मंडई झाली.
आणि दोन खून पडले.
एक कान भरणारृयाचा.
आणि दुसरा साक्षात बॉसचा.
तेव्हापासूनच तर भाई भाई झाला.
तर आता वीस वर्षानंतर भाईच्या डोक्याची मंडई करण्याची बुद्धी झाली कोणाला?
काय राव,
बापाला सवाई ठरतं कोण?
बेटाच ना?
तर अशा या बापसे बेटा सवाई पोरानं, म्हणजे सवाई भाईनं भाईची झोप उडवली.
पण भाईची झोप का उडाली?
अहो, भाई तसा उसूलाचा पक्का. म्हणजे जे चांगलं ते चांगलं आणि वांगलं ते वांगलं.
उगाच हे माझं आहे म्हणून चांगलं
आणि ते माझं नाही म्हणून वाईट असं काही नाही.
त्यामुळे भाईच्या गँगेत गुणवानांची भराभर प्रगती झाली. होते.
म्हणूनच निष्ठावंतांची संख्या भाईच्या गँगेत कमी नाही.
आणि भाईनंही त्यांना कधी निराश केलं नाही.
विशेषत: शंभू आणि सुरेशला.
त्यामुळेच माफिया लँडमध्ये आता इलेक्शन आले, तर भाई आपल्याला सुपारी देणार अशी खात्री या दोघांना होतीच.
आणि भाईचाही तसा विचार होताच.
दोघांनाही विशेष जबाबदारी देण्याचा.
पण,
सवाई भाईच्या महत्वाकांक्षेनं मध्येच डोकं वर काढलं.
आणि भाईचं नियोजनच कोलमडलं.
अगदी राज्याच्या वीज नियोजनासारखं.
तुमचा वारस म्हणून सुपारीचा मान मला मिळाला पायजे, अशी गर्जना करुन सवाई भाईनं बापालाच दम भरला.
आता भाई सापडलाय डायलेम्यात.
इतक्या वर्षांचे निष्ठावंत सहकारी
की सवाई भाई?
इकडे एके ५६
तिकडे रामपुरी
भाई काय करणार?
यातून कसा मार्ग काढणार?
गैंगेत बंडखोरी न होवू देता
आणि घरात महाभारत न घडू देता
भाई गेम कसा करणार?
बघू या छोटृयाशा ब्रेकनंतर….
मधुर भागवतने गाडी घेतली त्याची गोष्ट
सप्टेंबर 17, 2009तर हल्लीची ही जनरेशन.
प्रचंड कॉन्फिडन्ट आहे हो.
आणि क्लिअरही.
आपल्याला नेमकं काय हवंय, काय नको बरोबर माहिती आहे यांना.
जे काय असेल ते रोखठोक.
रोखठोक माणसाशी आपलं जमतंच. प्रश्नच नाही.
त्यामुळेच संध्याकाळी बसू या म्हणताच पठ्ठ्या आढेवेढे न घेता तयार झाला.
आणि विषय काढण्याआधीच बोलायलाही लागला.
“सर मला माहिती आहे, तुम्ही मला काय सांगणार आहात ते. आपल्या डेअरीतल्या दुधात राजरोस भेसळ चालते आणि त्याकडे डोळेझाक करण्याचे वरुन आदेश आहेत”
वा रे पठ्ठ्या.
मान गये.
म्हटलं बरं झालं, समजावण्याची गरज नाही. धमकावण्याची नाही की घाबरवण्याचीही नाही. मोकळं वाटलं एकदम.
म्हणालो, “लेका, स्वत:हून पॉइंटावर आलास ते बरं केलंस, आपला दोघांचाही वेळ वाचवला आणि श्रमही”
तर विचारलंच त्याने, “आप्पा, तुम्हाला भीती नाही वाटत का? पकडलं जाण्याची”
म्हटलं, कोण पकडणार? इथं पकडणारेच सोडवायला बसलेत. सारं काही त्यांच्या संमतीनेच तर होतंय. मग कुणी कुणाला पकडण्याचा प्रश्न येतोच कुठे.
डेअरी कुणाची आहे माहिती आहे ना?
तर म्हणाला ते तर सार्या जगाला माहिती आहे.
तर त्याला म्हटलं, आता धृतराष्ट्रासारखी डोळृयाला पट्टी बांध. आणि हा संजय जे सांगतो तेच खरं समज. दोन वर्षांत गाडी घेतोस की नाही बघ.
त्यावर फक्त्त हसला.
म्हटलं इंजिनिअरिंगसाठी किती पैसा खर्च केलास रे, सात-आठ लाख ओतले असतील कमीत-कमी. तो वसूल व्हायला नको का?
करु, करु असं म्हणाला.
आज दोन वर्ष झाली त्या गोष्टीला.
पठ्ठ्या धृतराष्ट्राचाही बाप निघाला.
दोन वर्षांत गाडी घेतलीच.
मी म्हटलंच होतं सुरुवातीला, हा पोरगा पुढे जाणार.
त्या दिवसापासून पुढे त्याने ना कोणाच्या रिडिंगविषयी शंका घेतली, ना कधी मला प्रश्न विचारले.
म्हटलं असा कसा हा एवढा सोपा-सरळ. काहीही विरोध नाही, काही नाही.
पण खरोखरच त्याने काही खुसपट काढलं नाही.
आणि अखेर गाडी घेतली.
आता आपण, मधुर भागवतने गाडी घेतल्यानंतर काय झालं, त्याची गोष्ट पाहणार आहोत,
पण ते पुढच्या भागात.
(क्रमश:)
मधुर भागवतने गाडी घेतली त्याची गोष्ट
सप्टेंबर 11, 2009तर यू टर्न घेण्यापुर्वी माझी ओळख करून देतो.
मी अप्प्या. म्हणजे तसं माझं पूर्ण नाव अपूर्व पुरोहित. पण ते महत्वाचं नाही, कारण माझं नाव अभय देशमुख किंवा गौतम मुनशेटृटीवार किंवा अगदी पद्मनाभन स्वामीनाथनही असू शकेल.
तर फॉर द सेक ऑफ आयडेन्टिफिकेशन…..
यू गॉट इट ना, वाटलंच मला.
परिस्थितीचं पटकन आकलन होणारी माणसं मला फार आवडतात.
म्हणजे त्यांच्याशी माझं पटकन जमतं.
जमतं म्हणजे जमतंच.
तर मधुरशीही आपलं असंच जमलं.
हा पोलिश डेअरीमध्ये तो जॉइन झाल्या दिवसापासून ते आजतागायत.
झकास जमलं.
आता पोलिश डेअरीच का? तर नावाला अर्थ नाही हो.. फॉर द सेक ऑफ.. जाउ दे, तुम्ही चाणाक्ष आहातच.
तर पोरगा पोलिश डेअरीमध्ये माझ्या हाताखाली जॉइन झाला, त्या दिवसापासून आमचं जमलंच.
इंजिनिअरिंग केलेलं पोरगं हुशार असणारच नाही का.
पण हे पोरगं नुसतं हुशारच नाही, तर चौकस आणि चतुरही होतं, म्हणजे आहे.
त्यामुळेच तर तो अखेर गाडी घेणार असा अंदाज मी लावला होता.
तर चौकस म्हणजे कसं बघा,
पहिल्याच आठवड्यात यानं ऍ़डल्टरेशनचा फॉल्ट काढला की हो.
कौतुक वाटलं मला त्याचं. प्रकरण प्रॉम्प्टली मला रिपोर्ट करून संबंधित माणसाला सस्पेन्ड करावं का, असं विचारत होता.
म्हटलं बाबा जरा सबुरीनं घे.
चुका माणसांकडूनच होतात. त्यासाठी कुणाचं करिअर संपवणं बरं नाही. एक संधी द्यायला हवी.
पटलं त्याला.
महिनाभर मग निरूपद्रवी कामांमध्ये बिझी ठेवला त्याला.
नव्यानं नोकरीला लागलेली पोरं नुकत्याच उघडलेल्या शॅम्पेनच्या बाटलीसारखी फसफसत असतात.
ही फसफस निवण्यासाठी निरुपद्रवी कामं बरी.
पण फसफस निवली, तरी किक बसायची राहात नाही.
किक बसायला आपली काही हरकत नाही, पण तोल सुटायला नको.
अशा वेळी दारु-सोड्याचं कॉम्बिनेशन तरी आपल्याला हवं तसं करुन घ्यायचं, नाहीतर दारुच बदलायची.
तोल सुटण्याआधी मला यातलं काहीतरी एक करावं लागणार होतं.
लागणार म्हणजे लागतंच, त्याला इलाज नसतो.
तर महिनाभरानंतर पुन्हा फॉल्ट घेउन आला.
“सर, कुलकर्णींचे चार्ट रिडींग्ज आणि ऍ़क्चुअल ऑइल रिडींग्ज मॅच होत नाहीयेत. “
म्हटलं आता कॉम्बिनेशन बदलायची वेळ आलीये.
“असं कर, ते पेपर्स माझ्याकडे दे आणि तू जा”
“आणि हो, संध्याकाळी काय करतोयस, जरा बसू आज”
तरुण पोरगं आणि बसायला नाही म्हणणार, इम्पॉसिबल.
तर मामला फिट बसवायची अशी तयारी झाली.
(क्रमश:)
मधुर भागवतने गाडी घेतली त्याची गोष्ट
सप्टेंबर 10, 2009अखेर मधुर भागवतने गाडी घेतली.
आता तुम्ही म्हणाल मधुर भागवत कोण?
तर मधुर भागवत हे फक्त नाव आहे, आयडेन्टिफिकेशनसाठी.
खरं तर तो मधुर कांबळे किंवा मधुर जाधव किंवा महंमद गौस किंवा आणखी काही असू शकतो.
तर फॉर द सेक ऑफ आयडेन्टिफिकेशन तो मधुर भागवत आहे.
आता तुम्ही म्हणाल मधुर भागवतने गाडी घेतली यात काय मोठं.
आजकाल सारेच गाडी घेतात. मग याचंच अप्रूप का?
तर गाडी घेणे ही घटना निश्चितच अप्रूप नाही, पण दखलपात्र आहे.
कारण मधुर भागवतचा यापुढचा प्रवास हा गाडी घेणे किंवा न घेणे यापैकी एका निर्णयाचा परिणाम असेल.
आणि त्याचबरोबर त्याचा गाडी घेण्याचा निर्णय ही त्याच्या आतापर्यंतच्या बरृया वाईट, नैतिक-अनैतिक प्रवासाची परिणती आहे.
त्यामुळेच त्याने गाडी घेणे या घटनेला अनेक बाजू आहेत, कारणांच्या आणि परिणामांच्याही.
पण त्याने गाडी घेण्याचा निर्णय घेतल्याने पुढचे परिणाम (त्याच्या दृष्टीनं नैतिक आपल्यापैकी काहींच्या दृष्टीने अनैतिक, किंवा व्हॉटेव्हर अकॉर्डिंग टू युअर थिंकिंग) बरृयापैकी स्पष्ट झाले आहेत. तेव्हा आपलं डोकं त्यावर शिणवा कशाला?
तर आता आपण मधुर भागवतने गाडी का घेतली त्याकडे वळू.
त्याकडे वळायचं म्हटलं तर मोठा यू-टर्नच घ्यावा लागेल.
जसा मधुरनं घेतला, किंवा आपल्यापैकी बरेचजण घेत असतील.
किंवा त्यांना घ्यावा लागत असेल. असो.
तर यू-टर्न.
(क्रमश:)
सये…
ऑगस्ट 21, 2009सये तुझी आठवण
पावसाची सर
अवकाळी, अवचित
खुणा अंगभर
सये तुझी आठवण
जिवाची काहिली
भर उन्ह वाटतसे
शीतल सावली
सये तुझी आठवण
मुठीतला पारा
मिठीत येईल कसा
भरारता वारा?
सये तुझी आठवण
साठते डोळ्यात
आसवे कोरडी अन्
झिरपे गळ्यात
सये तुझी आठवण
मनात रुतली
गुलाब शोधाया गेलो
काट्याला फितली
सये तुझी आठवण
तुझ्याच सारखी
नको तिथं भेटे अन्
एकांती पारखी !
- अमोल
अमोल यांनी पोस्ट केले
अमोल यांनी पोस्ट केले
अमोल यांनी पोस्ट केले 





