गर्वहरण

जून 30, 2009

घ्रर्रर्र….
नदीकिनार्‌याच्या शांत वातावरणाला चिरत तो आवाज आसमंतात भरला. आसपासच्या झाडाझुडपांवरची पाखरं कावरी बावरी होत उडाली. नदीकाठाने मॉर्निंग वॉकला जाणार्‌यांचे चेहरे त्रासिक बनले. नेहमीच्या चिवचिवाटाची जागा यांत्रिक थडथडाटाने घेतली. मातीचा धुरळा उडून धुकं धुकं झालं. भले मोठे जेसीबी नदीकाठच्या उंचसखल जमिनीला एकसारखे करण्याच्या कामाला जुंपले. नदीच्या ओंजळभर पाण्यातही तगून राहिलेले मासे भेदरून तळातल्या कपारींच्या आश्रयाला गेले. पाण्यावर धुळीचं बारिकसा तांबडा-पांढरा थर साचू लागला. सावळ्या चेहर्‌याच्या बाईनं तोंडभर पावडर थापून घ्यावी, तसा नदीचा चेहरा विचित्र दिसू लागला.
नदीचा प्रवाह मात्र नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहत होता. काठावर आज झालेल्या बदलांची नोंद त्याने घेतली होती की नाही, कोण जाणे.

शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदी म्हणजे पुरुषांच्या कळपात हरवलेली बाई. दाही दिशांनी जिभल्या चाटत अंगावर येवू पाहणार्‌या इमारती, झोपडपटृटया, रस्ते, गटारं. त्यातूनही उरलीसुरली अब्रु सांभाळत वाट फुटेल तशी आपला मार्ग आक्रमणारी ती. नदी. आजही काठावर दाटीवाटीनं गर्दी करुन असलेल्या उंच इमारतींनी तिच्याकडे तुच्छतेने पाहिलं. पलिकडचे रस्ते दात विचकून हसले. गटारं घाण ओकू लागली. त्यात भर म्हणून ही जेसीबी यंत्रं. सौंदर्यवतीचा केशसंभार वस्तर्‌यानं भादरून तुळतुळीत गोटा करावा, तसा तो हिरवाईनं लगडलेला नदीकाठ जेसीबीच्या धारेखाली निर्जीव, सरधोपट आकार धारण करु लागला.

एकेकाळी हीच नदी शहरातलं मुख्य सौंदर्यस्थळ होती. घरात एकुलती एक पोर असली, की तिचं जसं कोडकौतुक होतं, तसंच हिचंही होत असे. दोन्ही तिरांवर पसरलेली हिरवाई म्हणजे या पोरीच्या खांद्यावर बागडणार्‌या दोन वेण्याच. सकाळ-संध्याकाळ नदीकाठचा आसमंत पाखरांच्या किलबिलाटाने किणकिणायचा. सुटीच्या दिवशी लेकुरवाळी कुटुंबं, नवथर तरुण जोडपी नदीच्या काठी विरंगुळ्याला यायची. चार घटका निवांत घालवायची. नदीच्या वाहत्या पाण्याचा खळखळाट तेव्हा अधिकच बोलका व्हायचा.

पण अचानक सारंच बदललं. नदीकाठाला लागून पहिली इमारत उभी राहिली, तेव्हाही नदीचा प्रवाह नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहत होता. काठावर झालेल्या बदलांची नोंद त्याने घेतली होती की नाही, कोण जाणे. याच शांतपणाचा फायदा दोन पायांच्या श्वापदानं घेतला. नंदनवनात रोगट तण माजावं, तसं इमारतींचं रान नदीच्या आसपास माजू लागलं. डांबराचे साप विषारी फुत्कार टाकत तिच्याभोवती पाश आवळू लागले. सुदृढ शरीरात रोगट रक्त शिरावं, तशी गटारं नदीच्या सात्विक सौंदर्याला भ्रष्ट करण्याच्या इर्ष्येने तिच्या शरीराला लुचू लागली. पण तणातल्या तुळशीसारखी नदी मात्र या सार्‌यांतून वाट काढत वाहत राहिली. अशक्त्त बनली पण साहत राहिली. काठावरचे इमले कुचेष्टेने तिची टर उडवत राहिले.

आज मात्र अखेरचा घाव पडला. अक्राळविक्राळ यंत्रानं तिच्या अब्रुवरच घाला घातला. डोहात आतल्या आत खळबळ माजली. पण तीरावरुन कुचेष्टेनं तिच्याकडे पाहणार्‌या इमल्यांना नदीचा प्रवाह आजही शांत आणि संथच वाटत होता.

आपल्या नशिबावर रडावं की माणसाच्या करंटेपणावर हसावं नदीला कळेना. डोहातल्या कपारीत घुमणारे हुंदके तिला असह्य झाले. दात विचकून हसणार्‌या इमल्यांचा आवाज कानातून मळ काढून फेकावा तसा तिनं फेकायचा प्रयत्न केला. उगमापासून अंतापर्यंत अंगात साठलेला संताप उसळ्या मारु लागला. शहराबाहेरच्या धरणाच्या कुंपणावर नदीचं पाणी धडका देउ लागलं.

अशातच कृष्णानं द्रौपदीला वस्त्र पुरवावं तशा पावसाच्या धारा जमिनीवर कोसळू लागल्या, रानावनातून, रस्ते-गल्ल्यांतून, गटारा-नाल्यांतून पाणी नदीला येवून मिळू  लागलं. तसा प्रवाहाचा जोर वाढला. वाढतच राहिला.

हजारोंच्या संख्येनं सैन्य शत्रूवर चालून जावं, तसे पाणी वाट फुटेल तसं शहरात शिरु लागलं. डांबराचे साप प्रवाहात वाहून गेले. मगरीच्या शेपटीच्या फटकार्‌याने पाठीचा मणका मोडावा, तशा प्रवाहाच्या फटकार्‌यांनी कच्ची घरं मोडून पडली. भिंती वाहून गेल्या. पण प्रवाहाला उसंत नव्हती, त्याचं तांडव आता तर कुठे सुरू झालं होतं. साताजन्माच्या भुकेल्या अजगराने दिसेल तो प्राणी गिळंकृत करावा, तसा पाण्याने नदीकाठ गिळंकृत करुन टाकला. पोट फुगलेल्या अजगरासारखी नदी दिसू लागली. तरी पाण्याला उसंत नव्हती. काठावरचे इमले पत्त्याच्या बंगल्यासारखे प्रवाहाच्या आवर्तात कोसळले, होते नव्हते झाले. तरी पाण्याची भूक शमण्याची चिन्हे नव्हती. पाणी शहरात शिरु लागलं. सहस्र हातांनी शहराला आवळू लागलं. नदी कात टाकल्यासारखी दिसू लागली.

युगायुगांच्या क्रोधाची आग ओकत साक्षात कालीनं तांडव करावं, तशी नदी अस्ताव्यस्त पसरली. दिवसभर शहराच्या छाताडावर बेभान तांडव करत फिरली.

…अखेर पात्रातल्या डोहाचा तळ पूर्ववत शांत झाला. भानावर येत असलेल्या नदीने काठावरच्या उदृध्वस्त इमल्यांकडे नजर टाकली. गलितगात्र होवून ते मोडून पडले होते. डांबराचे साप छिन्नविछिन्न झाले होते. अवघं शहर मरणासन्न झालं होतं. एरवी गर्वाने ताठ असलेली शहराची मान मोडून पडली होती…

…नदीचा प्रवाह आता पुन्हा नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहू लागला होता.

- अमोल कपोले


झोळी

जून 27, 2009

पहाडाच्या पायथ्याशी
मैतरीचं रान दाट
अंगओल्या तृणासवे
तुझी माझी गळाभेट

वाट चढणीची होते
तुझ्या गाण्याची लकेर
थेंबाथेंबात भेटतो
पित्यासम तुझा सूर

तुझ्या खटयाळ सरींशी
दवाड वारृयाशी सलगी
धुकाळला घाटमाथा
आभाळाअंगी बिलगी

माथ्यावरच्या राउळी
एक ज्योत फडफडे
तुझ्या पाउलांना घाली
माती मायेचे साकडे

वर शिखर संन्यासी
अवघे अस्तित्व न्याहाळी
दान तुझं उधळून
अक्षयली त्याची झोळी!

- अमोल कपोले


सरडा

जून 26, 2009
dollsofindia.com वरून साभार.

dollsofindia.com वरून साभार.

टिंगलवाडीच्या रामराव पाटलांना फिटनेसचा भलता नाद. त्यामुळे रोज सकाळी हणम्यासोबत ‘मार्निंग वाक’ ला जाणे हा त्यांचा नित्यक्रम. आजही ते फिरायला निघाले, सकाळी सातची वेळ म्हणजे गावाची जाग येण्याची वेळ. त्यामुळे गावाचे सगळे व्यवहार अगदी शांततेत चाललेले असण्याची वेळ. पण, आज त्या शांततेवर चरे उमटले. चावडी क्रॉस करून जात असतानाच हणम्या आणि पाटलांच्या कानावर एकच कल्लोळ आला,
”हाणा, मारा त्या कुत्र्याला, मायला चावून पळतंय”
आवाजाच्या दिशेने वळून पाहता दोघांनाही एक मजेशीर दृश्य दिसलं. एक छोटं कुत्र्याचं पिल्लू केकाटत पळत होतं आणि सात-आठ जण त्याच्या मागे धावत होते, त्याला मारण्यासाठी. अखेर या शर्यतीत ते बिचारं जनावर हरलं आणि त्या लोकांनी त्याला पकडलंच. आपली एंट्री मारायची वेळ आताच आहे, हे जाणून पाटलांनी गर्दीच्या दिशेनं कूच केली. हणम्या पण बाह्या सरसावत पुढे सरकला.
“का रं, काय गोंधळ हाये”

पाटलांना बघून गर्दी चपापली आणि त्यांनी पाटलांना वाट करून दिली.घोळक्याच्या मध्यभागी जनू न्हावी एक हात वर करून तावातावाने त्या कुत्र्याला शिव्या घालत होता.

पाटलांना पाहताच त्याचा स्वर खाली आला, विस्कटलेले केस आणि कपडे सावरत तो म्हणाला,
“हृये बेणं कुत्र्याचं पिल्लू. चावलं की हो पाटील माझ्या हाताला. आता माझा कामाचा हात मी धरून बसलो आठ दिवस तर खानार काय?”
जन्याच्या उजव्या हाताची तीन बोटं रक्ताळली होती. कुत्र्यानं चांगलाच कडाडून चावा घेतला होता.
हं.. पाटलांनी मिशीवरून हात फिरवत आधी जन्याची बोटं बघितली आणि मग त्या कुत्र्याकडे नजर टाकली.
झाल्या प्रकाराने भेदरलेलं ते पिल्लू थरथर कापत जागीच उभं होतं, त्याच्या भेदरलेल्या नजरेत एकाच वेळी भीती आणि याचना असे भाव भरलेले होते.
“च्या मायला. कोनाचं पिल्लू हाय हे. कुत्री पाळतात तर सांभाळता येत नाही का लोकांना.. याचा बंदोबस्त आता केलाच पायजे.”
“व्हय व्हय.. ” गर्दीनेही पाटलांच्या स्वरात आपला स्वर मिसळला.

पाटील पुढे काहीतरी बोलणार एवढयात हणम्या म्हणाला, “पन पाटील, मला वाटतंय, ह्ये कुत्रं आपल्या आमदार सायबाचं हाये. त्यांच्याकडे आसं एक कुत्रं हाये आसं मी आइकलं होतं.”

पाटलांची फुगलेली छाती एकदम दोन इंच कमी झाली,

“काय सांगतूस, आमदार गुलाबरावाचं कुत्रं हाये हे..”
“व्हय..माला बी तसंच वाटतंय.. ” गर्दीतून एक स्वर बोलला.

पाटलाच्या चेहर्‍यावरचा रूबाब नाहिसा झाला. मिशांचे पीळ लुळे पडले. नजरेतले कुत्र्याविषयीचे तुच्छतेचे भाव आणि जन्याविषयीचे सहानुभूतीचे भाव यांची अदलाबदल झाली. कुत्र्याकडे दयार्द्र नजरेनं पाहत पाटील म्हणाले,

“जन्या लेका, सायबाचं कुत्रं असं उगा कुनाच्या वाटाला जानार न्हाय. तूच कायतरी खोड काडली असशील..”
“आता मी काय खोड काडनार त्याची पाटील.. आन हे कुत्रं आमदाराचं न्हाय..त्येच्याकडं असं कुत्रच न्हाय.. “जन्या उत्तरला.

एवढात हणम्या कसलीशी आठवण झाल्यागत म्हणाला, “पाटील, माला बी जरा डाउट वाटतोय. परवा मी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो नव्हं का, तवा तं काय दिसलं नाय बा मला.”
“व्हय व्हय, आमदाराकडं आसं कुत्रं नाय हाय,” गर्दीतला आणखी एक स्वर बोलला.

पाटलाच्या चेहर्‍यावरचे भाव पुन्हा बदलले, “हानम्या खरं बोलतूस?”
हणम्यानंही मान हलवली, “एकदम खरं पाटील.”
पाटलाच्या चेहर्‍यावरचे लाचार भाव एकदम नाहीसे झाले, मुद्रेवर पुन्हा रूबाब झळकायला लागला. पुन्हा एकदा कुत्रा आणि जन्याविषयीच्या भावनांची अदला बदल झाली.

“या कुत्र्याचा मालक कोन हाय, त्याचा शोध घेउन त्याला ताबडतोब दम द्यायला पायजे.”

“व्हय व्हय.. ” गर्दीने नेहमीप्रमाणे री ओढली.

“हनमंतराव.. कुत्र्याच्या मालकाचा शोध घेवून संध्याकाळी चावडीवर बोलवा..” पाटील मिशांना पीळ भरत बोलले.
“नाय नाय पाटील.. हे आमदारांचंच कुत्रं हाय..” गर्दीतून आणखी एक स्वर पचकला.

मिशीला पीळ भरता भरता पाटील पुन्हा दचकले,
“हनम्या, काय म्हनतोय तो.”

पण हणम्यानं उत्तर देण्याआधीच आणखी एक स्वर उत्तरला, “आवं पाटील, हे आमदाराचंच कुत्र हाये. या जन्याला खोड काडायची लय खाज… म्हनून त्यानं पेटती विडी कुत्र्याच्या तोंडात दिली, मग चावनार नाय तर काय?”

पाटलाच्या मिशा पुन्हा लुळ्या पडल्या.. पुन्हा कुत्रा आणि जन्याविषयीचे भाव बदलले.

“तरी मी म्हनत होतो हनम्या.. कुत्रं खानदानी दिसतंय, आसं एकदम कुनाला चावनार्‍यातलं वाटत नाही. काय रं जन्या.. हे आसले उद्योग करतूस आन त्या बिचार्‍या मुक्या प्रान्याला दोष देतोस व्हय रं.. आता लेका तुझाच बंदोबस्त करायला पायजे…”
“व्हय व्हय.. ” गर्दीने आपला धर्म पाळला.

“थांबा पाटील.. ” छगन सुताराचा पोरगा पुढे होत बोलला.
“नाय म्हन्जे मला वाटतं हे कुत्रं आमदाराचं न्हाई. म्या तरी कदी त्याला पाह्यलं नाही..”

“व्हय व्हय.. ” आणखी एक दोघांनी या नव्या माहितीला दुजोरा दिला.

पाटलांची मुद्रा पुन्हा बदलली. पुन्हा मिशा ताठ. कुत्रा आणि जन्याविषयीच्या भूमिकांत बदल.

आता ते काही बोलणार इतक्यात हणम्या म्हणाला, “माला वाटतं पाटील आपन माहितगार मानसाकडूनच खात्री करून घेऊ. तो समोरून नाम्या येतोय, आमदारांचा हरकाम्या. त्यालाच इचारू.”
“ह्ये कुत्रं आमदाराचं नाय, आमदाराकडे आसं कोन्चबी कुत्रं न्हाय..” नाम्यानं सगळ्या संशयांना पूर्णविराम दिला.
पाटलांची मुद्रा.. मिशा… जन्या.. पिल्लू.. अदलाबदल.
“तरी मी म्हनत होतो, ह्ये कुत्रं मोकाट कुत्रं असनार, कुठं तो आमदाराचा खानदानी आब आन कुठं ह्ये मरतुकडं कुत्रं.. त्याला आता मुन्शिपाल्टीच्या मान्सांच्याच ताब्यात द्यायला पायजे, ” इति पाटील.

“नाय पन.. जन्या बोलला, ह्ये कुत्रं आमदाराचं न्हाई आसं मी म्हनालो, पन ते आमदाराच्या भावाचं हाये. परवाच त्यांनी शहरातून आन्लं त्येला..”
पाटलांची मुद्रा.. मिशा… जन्या.. पिल्लू.. अदलाबदल.

“तरी मी म्हनतच होतो हनम्याला.. हे पिल्लू अगदी शहरी वळनाचं हाये, आसं एकदम कोनाला चावनारं न्हाय, ह्या जन्यानंच त्येची खोड काडली. कारं ए जन्या आता काय करावं तुला, बिचार्‍या मुक्या प्रान्याला तरास दिला.. चल आन आता ते पिल्लू इकडं..” , इति पाटील.

आता गर्दीतूनही जन्याविषयी कुचेष्टेचा स्वर उमटला. त्याची चेष्टा करत सारे पांगले. नाम्यानं पिल्लू उचललं आणि तो आमदाराच्या बंगल्याकडे रवाना झाला.

मिशांवर ताव देत, ताठ मानेनं पाटील हणम्यासोबत वाडयाच्या दिशेने चालू लागले..

(अंतोन चेकॉव्हच्या ‘दी शॅमेलिऑन’चे स्वैर रूपांतर)


………………गुप्तधन…………………..

जून 25, 2009

ist2_2939337-treasure-chestमित्रहो, जगात अनेक प्रकारचे मूर्ख आहेत, पण एकाच माणसाने अनेक प्रकारचा मुर्खपणा केलेला पाहिलाय का? मी त्या दुर्मिळ प्रजातीतला प्राणी आहे. आजवर मी सर्व प्रकारचा मूर्खपणा केला. शिक्षण अर्धवट सोडलं, वडिलांच्या पैशांची उधळपट्टी केली, जुगार खेळला, पैसा गमावला. आणि हे सर्व कमी पडलं म्हणून की काय, गुप्त खजिना शोधण्याच्या भानगडीत पडलो.

त्याचं असं झालं. जवळचा पैसा संपल्यावर गुजराण करण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं, म्हणून एका म्हातार्‍याकडे हरकाम्याची नोकरी पत्करली. आता हा म्हातारा होता विक्षिप्त. म्हणजे खुळाच म्हणा, दिवसभर आपला कीडा-मुंग्यांच्या मागे. त्याच्या घरात एक खोली नुसती किडे-फुलपाखरं-नाकतोडे आणि काय काय म्हणतात त्यांनी भरलेली. आता माझ्यासारख्या भणंगाला अशा माणसात काय रस वाटणार?
पण तरीही मला ती नोकरी सोडाविशी वाटेना, त्याची दोन कारणं होती, एक-पोटापाण्यासाठी मिळवण्याचं दुसरं काही साधन नव्हतं, आणि दोन – त्या विक्षिप्त म्हातार्‍याची गोड तरूण मुलगी, जिचा चेहरा मी कधी पाहिला नव्हता, पण तिच्या नुसत्या वावरानेच त्या घरात चैतन्याचा झरा वाहतोय असा भास व्हायचा. तिच्या एकतर्फी प्रेमात बिमात पडण्याइतका काही मी मूर्ख नव्हतो, तरी तारूण्यसुलभ अपेक्षांमुळे आवाक्यात नसलं, तरी हे हळूवार स्वप्न मी स्वप्न म्हणून का होईना बघत होतो. तशी ती अगदी टिपीकल बायको छाप होती. म्हणजे बापाची ज्याप्रकारे ती बडदास्त ठेवत होती, त्यावरून ती एक उत्तम पत्नी होऊ शकेल असं मला वाटत होतं. असो.

अर्थात तिची अपेक्षा करणारा मी काही एकटा नव्हतो. तिच्या विक्षिप्त बापाचा एक विद्यार्थीही, ज्याला आपण रवी म्हणू. संशोधनाच्या निमित्ताने येथे येउन राहिला होता, आणि अर्थातच तिच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. त्याची आणि माझी बर्‍यापैकी मैत्रीही झाली होती. तर या रविला एक वाईट खोड होती, आपल्या शिक्षणाच्या फुशारक्या मारण्याची. आणि त्याच्या या फुशारक्यांचा मला अगदी वैतागही येई. पण सांगणार कोणाला ? त्यामुळे मी ते सहन करीत असे.

तर घरात तरणी ताठी, देखणी पोरगी असताना दोन तरूणांना मुक्तपणे येण्याजाण्याची मुभा देणारा हा म्हातारा मूर्खच म्हणावा का? तर तसं आम्ही समजत होतो खरे, पण म्हणतात ना, चोर की दाढी मे तिनका, अखेर त्याच्या लक्षात आमचा संभाव्य धोका लक्षात आलाच. मग काय, एका संध्याकाळी त्याने आम्हाला दोघांनाही बोलावून भरपूर दम दिला आणि पुन्हा इकडे दिसलात, तर आयुष्यभर माझ्या प्रयोगशाळेतल्या बरण्यांमध्ये ठेवण्याच्या लायकीचे व्हाल, असा निर्वाणीचा इशाराही दिला.

झाले, आम्ही पुन्हा बेघर झालो. वादळी वातावरण पाहून आम्ही पाच-सहा दिवस तिच्या घराकडे फिरकलोच नाही. सातव्या दिवशी जाउन पाहतो, तर घर रिकामं. बाप-बेटी सामानासह गायब. माझ्याकडे पैसे असते, तर मी तिला शोधण्यासाठी अख्खं जग पालथं घातलं असतं, मी हताशपणे पुटपुटलो.

‘अरे, पण ती तुझ्या सोबत यायला हवी ना,’ इति रवी. ‘तुला माहितेय का, तिचं शिक्षण फारसं झालेलं नसलं, तरी ती उपजतच हुशार आहे, त्यामुळे शी डिझर्व्हस दी बेस्ट. आता हे जीवनातलं बेस्ट तुझ्यासारखा भणंग तिला कोठून देणार? ’
‘खरं आहे मित्रा, पण बेस्टची माझी व्याख्या वेगळी आहे, दोनशे एकरची शेती, शंभरावर गुरं-ढोरं आणि दहा खोल्यांचा वाडा असावा, दिमतीला चार-दोन गडी माणसं असावी, आणि फक्त आपल्यासाठी जगणारी बायको हवी. तुझं ते तत्वज्ञान आणि कविता – बिविता आपल्या पचनी पडत नाही.’
त्यावर रवी फक्त हसला..कुत्सितपणे.

तर आम्ही असं एकमेकांना समजावत, डिवचत, आपापल्या परीने त्या दोघांचा माग काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण व्यर्थ. अशात एक दिवस मला जनू भेटला. जनू म्हणजे माझा जुना शेजारी. तो आला एक जुनं-मळकट चिटोरं घेउन, त्यावर कसलासा नकाशा काढलेला.

treasure-map_22

मी म्हटलं, “काय रे बाबा ही भानगड.”

तो म्हणाला, “मावळात माझा लांबचा आजा राहायचा, त्यानं माझ्यासाठी ठेवलेल्या ऐवजात हे सापडलं, आपल्या तं काय डोक्यात शिरंना म्हणून तुझ्याकडे आलोय. या आज्याच्या आज्यानं तिकडेच एका डोंगराच्या माथ्यावर दीडेकशे वर्षांपूर्वी गुप्तधन लपवून ठेवलंय, त्याचा हा नकाशा हाय.”

नकाशाच होता तो, आमच्या गावापासून शंभरेक मैल दूरवर त्या डोंगर रांगा होत्या. माझं डोकं ताशी १००० किमी वेगानं धावू लागलं. रिकामं बसण्यापेक्षा हाही एक मूर्खपणा करून पाहू, काही हाती लागलंच, तर तिचा शोध घेता येईल, असा विचार करून मी प्रकरण (म्हणजे तूर्तास तो नकाशा) हातात घेतलं.

आता या नकाशात गुप्तधनाची जागा दाखवली होती तो डोंगर घोडयाच्या खोगीराच्या आकाराचा होता. त्याच्या माथ्यावर एका रांगेत सहा महाकाय शिळा उभ्या आहेत, त्या शिळांच्या खाली गुप्तधन आहे, असं नकाशात म्हटलं होतं.

जन्याला म्हटलं, ‘गुप्त धन सापडलं, तर दोन तृतीयांश वाटा माझा.’

लेकाचा तयार झाला.

आता प्रश्न होता, दीडशे वर्षांपुर्वीच्या जागेचं लोकेशन शोधण्याचा. त्यासाठी आवश्यकता होती, सर्व्हेयरची. पण सर्व्हेयरकडे जाण्याची मला इच्छा नव्हती. शिकलेल्या लोकांबद्दल मला रागच आहे, त्यात रवीमुळे तो वाढला आहे. त्यामुळे सर्व्हेयरकडे जाण्यापेक्षा मीच थोडं व्यवहारज्ञान वापरलं आणि नकाशावरच्या दिशांचा अभ्यास करून ढोबळमानाने ती जागा ढोबरेवाडीच्या पलिकडच्या डोंगररांगांच्या पूर्वेला असावी असा अंदाज बांधला आणि जन्याला बरोबर घेउन मोहिमेवर निघालो.

तालुक्याच्या गावाला तिथलाच सर्व्हेयर गाठला, त्याला नकाशा दाखवून खातरजमा करून घेतली. माझ्या अंदाजानुसार ते ठिकाण पूर्वकडेच होतं. त्याला निश्चित ठिकाण दाखवण्यासाठी बरोबर घेतला. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्हाला ते ठिकाण दाखवून सर्व्हेयर रवाना झाला. दूरवर पसरलेली हिरवी गार कुरणं, पलिकडे वाहणारी नदी आणि नदीपलिकडे ती डोंगररांग. दोन दिवस त्या परिसरात खोगिरीच्या आकाराचा डोंगर शोधण्यात आम्ही घालविले. हाती काही लागलं नाही. अखेर नाद सोडून आम्ही गावी परतलो.

“तू जागाच चुकीची निवडलीस मित्रा,” रवी कुत्सितपणे हसत मला म्हणाला, “सरत्या काळाबरोबर अक्षांशात होणारा फरक तू लक्षातच घेतला नाहीस, म्हणून म्हणतो, आमच्यासारख्या विद्वानाचे सल्ले घेत जा.”

‘मग आपण पुन्हा जाऊ, तू म्हणतो त्या जागी शोधून पाहू.’

पुन्हा आमची मोहिम निघाली. रविच्या अंदाजानुसार ती जागा पूर्वेकडे नसून डोंगररांगेच्या मध्याला होती.

पुन्हा गावाकडचा सर्व्हेयर. पुन्हा हिरवी कुरणं. पुन्हा नदी, पुन्हा डोंगरांचा अंदाज. पुन्हा निराशा.

“तुझा तो खोगीराच्या आकाराचा डोंगर काही सापडत नाही, सापडणार कसा अस्तित्वाच नाही ना,” रवि म्हणाला.

“आकार हा पाहणार्‍याच्या नजरेत असतो,” शेक्सपीयर की शेलीचं वाक्य मी माझ्या संदर्भात वापरलं.
त्यावर रवि कुचेष्टेने खो-खो हसू लागला.
“जरा तुझा तो नकाशा पाहू,” तो म्हणाला.

मी नकाशा त्याच्या हाती दिला.
त्याने तो सूर्याच्या दिशेने धरला, आणि आतापर्यंत न जाणवलेली एक गोष्ट मला आता दिसली.
त्यावर वॉटरमार्क होता, १८६७ सालचा.
“हा नकाशा बनावट आहे,” रवि विजयी मुद्रेने म्हणाला, “नकाशावर तारीख लिहिलीय, १८३२ आणि नकाशा ज्या कागदावर काढलाय तो तयारच मुळी १८६७ साली झालाय, आहे की नाही गंमत.”

“नकाशा बनावट असो की खरा, मी गुप्तधन शोधायला त्या डोंगरावर जाणारच. तुला यायचंय की नाही, ते सांग,” मी म्हणालो.
रवीला आता मोहिमेत काही रस राहिला नव्हता, त्याने माझा निरोप घेतला.
दोन दिवस मी नदीपलिकडचे डोंगर शोधले, पण तिथे खोगीराचा आकार आणि सहा महाकाय शिळांव्यतिरिक्त सर्व काही होतं, दाट गवत, ज्रगल, आजवर कधीही न पाहिलेले पक्षी, किटक, फुलपाखरं, नाकतोडे…

तीन दिवसांच्या वांझोटया रपेटीनंतर आता नदी ओलांडून परतीचा मार्ग पकडावा म्हणून मी डोंगर उतरू लागलो.

नदी काठाजवळ एक म्हातारा, दाढी वाढलेला, एक मोठं फुलपाखरू धरून त्याचं निरिक्षण करत होता.
बिचारा वेडा दिसतोय, असं म्हणून मी नदीच्या दिशेनं वळलो…

तीच.

होय तीच होती ती.

आज मी तिचा चेहरा प्रथमच पाहत होतो. मला पाहून तिच्या नितळ चेहर्‍यावर हसू उमटलं,

आणि पाठोपाठ स्वप्नवत शब्द कानांवर आले,

“मला माहित होतं नाथा, तू येशीलच. बाबांनी मला पत्रसुद्गा लिहायला मनाई केली होती, नाहीतर आपण आधीच भेटलो असतो.”

(ओ.हेन्रीच्या दी बरीड ट्रेझर या कथेचे स्वैर रूपांतर)


————मृगजळ————

जून 24, 2009

उपेनचा निर्णय झाला होता. ओंकारनाथांचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. “जन्माची ददात मिटेल”. पण त्यासाठी सरूला…..?, उपेनच्या मनात विचार आला.
- मग काय झालं, असाही तिचा काय उपयोग आहे आपल्याला..नशिबाने पैसा मिळण्याची संधी पदरात आणून टाकली आहे, तिचा फायदा न घेण्याचा करंटेपणा कसा करावा. ऒंकारनाथांनी एवढ्या खात्रीने सांगितलंय…

त्याने खिशातून ओंकारनाथांनी लिहून दिलेलं ते चिटोरं काढलं. जीर्णं झालेला तो एक कागद होता. शंभर सव्वाशे वर्षांपुर्वीचा. त्यावरचे बरेच शब्द आता पुसट झाले होते. पण ते वाचण्याची आवश्यकता नव्हती. ऒंकारनाथांनी त्याला सर्व काही समजावून सांगितलं होतं. उपेनने शांतपणे घडी करून तो कागद खिशात ठेवून दिला. तो झपाझप पाऊलं टाकत घराच्या दिशेने चालू लागला. जमल्यास आज रात्रीच त्याला काम उरकून घ्यायचं होतं.
……
सुन्न मनानं सरू समोरच्या भिंतीकडे नजर लावून बसली होती. तिथेच त्या भिंतीच्या पलिकडे त्यांच्या नशिबाची दारं उघडणारी किल्ली दडलेली होती. पण त्या नशिबाकडे नेणारा मार्ग भयंकर होता. भैरप्पाचे शब्द तिच्या मनात घुटमळत होते. “पैसा मिळवण्यासाठी असलं काही करण्याची तिच्या मनाची तयारी नव्हती. तरीही मनात सारखे तेच विचार येत होते. धोका पत्करलाच पाहिजे. तिचं मन तिला सांगत होतं. असंही या दरिद्री
जिण्याला काय अर्थ होता. देणेकयांची देणी चुकवता चुकवता पुरेवाट होत होती. देणेकर्यांना चुकवण्यासाठीच गुपचुप घर बदलून या जुनाट वाड्यात रहायला आलो अन नशिबानं अलगद समोर सोन्यासारखी संधी आणून ठेवली. तिचा लाभ आपण घेतला नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच.
-पण उपेनला किती त्रास होईल, त्याचा विश्वासघात?
तेवढ्यापुरतं त्याला वाटेल, आणि असंही नंतर तो कुठे असणार आहे आपल्याबरोबर. या विचारासरशी तिच्या अंगावर शिरशिरी आली. कसला तरी निर्णय घेत ती लगबगीनं उठली.
आज रात्रीच आपला बेत तडीस न्यायचा, असा निर्णय तिनं घेतला.
……..
उपेन आणि सरूनं वाड्यातली खोली घेतली आणि त्या प्रकाराला सुरूवात झाली. वाडा जुना असला तरी गावाच्या मध्यवर्ती वस्तीत होता. मुख्य म्हणजे भाडं अगदी कमी होतं. बरेच रहिवासी वाडा सोडून गेले होते,
सरू-उपेन धरून तीन कुटुंबं सध्या तिथे वास्तव्यास होती. त्यांची खोली वाड्याच्या एका टोकाला होती.
-पहिल्याच रात्री त्यांना तो अनुभव आला.
त्यांची खोली म्हणजे भाडेकरूंसाठी एका मोठ्या खोलीचं दोन खणी घरात केलेलं रूपांतर होतं. खोलीच्या पुढ्च्या भागातल्या एका बाजूकड्च्या भिंतीमध्ये एक मोठा कोनाडा केलेला होता. त्याची खोल्रीही बर्यापैकी म्हणजे तीन साडेतीन फुट होती आणि उंची साधारणत: अडीच फुट. बारकाईने निरिक्षण केल्यावर असं लक्षात येत असे, की तिथे एक दरवाजा होता. जो कोनाडा काढ्ल्याने कायमचा बंद करण्यात आला होता.
रात्री दीडच्या सुमारास त्या आवाजाने दोघांनाही जाग आली.
खूप खोल ठिकाणाहून यावा अशा पद्धतीचा तो आवाज होता. पण दोघांनाही तो स्पष्टपणे ऐकू आला.
“ए, मला काढ”
भीतीने दोघांच्याही अंगावर सरसरून काटा आला. उपेनने जवळ जाऊन कोनाड्याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.
पलिकडून पुन्हा तेच शब्द उमटले. दर पाच मिनिटांच्या अंतराने ती हाक येत राहिली. बरोबर अडीचला ते शब्द येणं बंद झालं.
त्या रात्री दोघांनाही झोप लागणं शक्यच नव्हतं.
…..
वाड्यात गुप्तधन आहे, ज्योतिषी ऒंकारनाथांनी एका जीर्ण कागदावरचा मजकूर बघत सांगितलं.
काढलं तर सात पिढ्या बसून खातील, पण-
पण काय ?, उपेनने अधीर होवून विचारलं.
जो काढेल त्याला बळी जावं लागेल.
…..
बळी?
होय, सरूकडे भेदकपणे पहात भैरप्पा उत्तरला.
जो स्वत: ते दार फोडेल त्याला जीव गमवावा लागेल, यात काही बदल संभवत नाही. काय करायचं ते
तुम्ही ठरवा, असं म्हणून भैरप्पा निघून गेला.
….
घराकडे निघायला उपेनला साडेदहा वाजून गेले. पण त्याला आता वेळकाळाचं भान राहिलं नव्हतं. आजच्या आज निकाल लावून टाकायच्या इराद्यानं तो झपाटला होता.
“सात पिढया बसून खातील इतकी संपत्ती..” त्याला दुसरं काही दिसेनासं झालं होतं, दुसरं काही ऐकू
येईनासं झालं होतं.
-प्रश्न सरूला कसं तयार करायचं हाच होता.
अर्थात आपण काहीतरी कारण काढून तिला कोनाडा फोडायला सांगितलं तरी ती विरोध करणार नाही याची त्याला खात्री होती.
त्याच्या डोळ्यांत एक क्रूर चमक तरळून गेली. झपाझप पावलं टाकीत तो घराकडे निघाला.
…..
अकराच्या सुमारास उपेन घरापाशी पोहोचला. दार अर्धवट लोटलेलं होतं, त्यातून प्रकाशाची तिरीप बाहेर जमिनीवर पडली होती. सरूशी कसं कसं बोलायचं यावर मुद्दे मनात घोळवत त्याने दरवाजा लोटला. आतलं दृष्य पाहून त्याची नजर थिजली.
जमिनीवर सरूचा निष्प्राण देह पडला होता. तिचं सर्वांग हिरवं निळं पडलं होतं. कुठ्ल्याशा विषारी दंशाने तिचा जीव घेतला होता. बाजुलाच एक चिटोरं पडलेलं त्याला दिसलं. उपेनने ते उचललं. सरूचंच हस्ताक्षर होतं ते.
त्यात लिहिलं होतं,
“उपेन, मी तुला कधीच आवडत नव्हते. ही गोष्ट मला ठाऊक आहे. माझ्याकडून तुला कसलेच सुख देणे झाले नाही. मुलाबाळांचेही नाही. जीव गमाविण्याचे मला काही वाटत नाही. किमान तुझं पुढील आयुष्य सुखात जाईल.”
-सरू.
बरं झालं, सुंठीवाचून खोकला गेला, उपेनच्या मनात विचार आला. उपेनची नजर भिंतीकडे गेली. कोनाडा खोदण्याचा प्रयत्न सरूने केलेला दिसत होता. भिंतितली चौकट फोडलेली होती. आतल्या कुबट हवेचा दर्प खोलीत भरून राहिला होता. उपेनचे डोळे चमकू लागले.
“सात पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती..”
बेभान होवून तो पुढे सरसावला. कोनाड्यात चढून त्याने फोडलेल्या चौकटीवर लाथ मारली. आता आत डोकावण्याइतकी सोय झाली होती. अधीर होवून त्याने आत डोकं घातल. त्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. श्वास जड होवू लागला, खोल खोल पाण्यात आपण गाडले जातोय असं त्याला वाटू लागलं. मदतीसाठी हाक मारण्यासाठी त्याने तोंड उघडलं, पण आवाजच निघेना.
-पुढ्च्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. थोड्याशा झटापटीनंतर सारं कसं शांत शांत झालं.
…..
दुसर्या दिवसाच्या वर्तमानपत्रात बातमी होती,
एका विचित्र घटनेत गावातील जुन्या वाड्यात एका जोडप्याचा मृत्यु झाला. पत्नीचां मृत्यु विषारी दंशाने, तर पतीचा मृत्यु गुदमरल्याने झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच घरात सुमारे एक कोटी रुपये किमतीचं सोनं सापडलं…..

- अमोल कपोले


अनपेक्षित

जून 24, 2009

fog-777806

ताडोबाच्या माळावर यायचंय का ?

या प्रश्नामध्ये दचकण्यासारखं काय आहे ?

पण माझ्या प्रश्नावर रिक्षावाला दचकलाच.

”काही प्रॉब्लेम आहे का ?” मी विचारलं.

”नाय, प्रॉब्लेम तुम्हाला असायला पायजे.”

”म्हणजे ? मी नाही समजलो.”

घोर अज्ञानी माणसाकडे पहावं तशा दयार्द्र नजरेने रिक्षावाल्याने माझ्याकडे पाहिलं.

”माळावरच जायचंय का ?” त्याने विचारलं.

”माळाच्या अलिकडे मुतडक वाडी आहे, तिथेच सोडा.”

”बसा. पंधरा रुपये होतील.”

मी बसलो. रिक्षा धावू लागली. रात्र बरीच चढली होती.

”किती वाजलेत हो ?” मी रिक्षावाल्याला विचारलं.

”साडेअकरा झालेत.” आरशातून मला न्याहाळत रिक्षावाल्याने उत्तर दिलं.

मी बाहेर पाहू लागलो. शहराची सीमा ओलांडल्याने मोकळी वाटत असलेली हवा आता रिक्षावाल्याला झोंबू लागली होती. त्याने गळ्याभोवतीचा रुमाल कानावर ओढला. मला ते वातावरण नेहमीचंच होतं.

”इथं नवीन दिसताय?” अपेक्षित असलेला प्रश्न रिक्षावाल्याने टाकलाच.

”छे. गेले दीड वर्ष इथेच राहतोय.”

”मुतडकवाडीत?”

”हो, तिथं जवळच.”

”असं सांगा की राव.” रिक्षावाल्याच्या आवाजात मघापासून जाणवणारा तणाव आता सैलावल्याचं मला जाणवलं.

”ताडोबाच्या माळावर म्हटल्यावर मी जरा घाबरलोच बगा.”

मी काही बोलणार तेवढ्यात रिक्षा थांबली. वाडीच्या फाट्यावर एकाने हात दिला होता.

”वाडीला जायचंय” किडकिडीत शरीरयष्टीचा, विचित्र चेहऱ्याचा तो मनुष्य म्हणाला.

”बसा. दहा रुपये.”

मुख्य रस्ता सोडून रिक्षा आता शेतातल्या रस्त्यातून पुढे निघाली.

शेजारी बसलेला तो किडकिड्या माझ्याकडे पाहून दात विचकून हसला. मी मान वळवून बाहेर नजर टाकली.

अंधारात रस्त्याच्या कडेला असलेली झाडं चित्रविचित्र आकार धारण करत होती. मधुनच कोठेतरी शेतातल्या झोपडीत असलेल्या दिव्याचा प्रकाशमान ठिपका खुणावून अदृश्य होत होता. उन्हाळ्याच्या सुरुवातीचे दिवस आणि चांदणी रात्र असल्याने भोवतालची झाडं-झुडपं करड्या रंगात बुडवल्यासारखी दिसत होती. निःस्तब्ध शांततेत निर्मनुष्य रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षाच्या इंजिनाची घरघर वातावरणात भरून राहिली होती.

इतक्यात ते घडलं…….

काय घडतंय ते कळायला मला काही मिनिट लागले. नक्की कशामुळे कळेना, पण रिक्षावाल्याने करकचून ब्रेक दाबला आणि रिक्षा थांबली. तसा मी एकदम भानावर आलो.

”काय झालं, रिक्षा का थांबवली ?” मी प्रश्न केला.

रिक्षावाल्याने काही उत्तर दिलं नाही. मागे न वळताच तो भेदरलेल्या स्वरात म्हणाला, ”तो पासिंजर कुठं गेला?”

”कोण ?” मी विचारलं आणि माझ्या एकदम लक्षात आलं, फाट्यावर एक किडकिड्या मनुष्य रिक्षात

बसला होता. विचारांच्या नादात त्याचं अस्तित्वच मी विसरून गेलो होतो.

“हा काय माझ्या शेजारी” मी शेजारी नजर टाकत म्हणालो.

शेजारी कुणीच नव्हतं.

हा कुठं गेला ते पाहण्यासाठी उतरण्याच्या उद्देशाने मी बाहेर पाय टाकणार, इतक्यात रिक्षावाला ओरडला,

“सायेब, उतरू नका..”

“अरे पण तो कुठं गेला ते तर पाहायला हवं की नको”

“काय नको, तो पोहोचला बरोबर पाहिजे तिथं.”

“अरे, पण तूच तर म्हणालास ना, तो कुठे गेला म्हणून? मग हा काय प्रकार आहे ?”

असं म्हणून मी उतरलो आणि पाठीमागे नजर टाकली.

रस्त्यावर कुणाचा मागमूस नव्हता.

मी काही बोलणार तेवढ्यात रिक्षावाल्याने रिक्षा सुरु केली आणि तो ओरडतच म्हणाला, “पट्कन रिक्षात बसा, नाहीतर काय खरं नाही.”

मी रिक्षात बसलो. जिवाच्या आकांताने त्याने रिक्षा हाणली. मी काही विचारण्याचीही वाट न पाहता तो बोलू लागला.

“सायेब. वाचलो आपण. गडी रिक्षात बसला तेव्हाच मला डाऊट आला होता. ते रूपसिंग पाटलाचं भूत होतं”

“कशावरून ?” मी विचारलं.

“कशावरून म्हणजे काय, चालत्या रिक्षातून असा माणूस एकदम कसा नाहिसा होईल”

“ते भूत होतं हे तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण रूपसिंग पाटलाचं नव्हतं. रूपसिंग पाटील देखणा माणूस होता”

“द्येखन्या माणसांची भूतं कुरूप, किडकिडित नसतात कशावरून”

“नसतातच रे”

“तुमी बगितलंय का रूपसिंग पाटलाचं भूत?”

“तू तरी बघितलंयस का ?”

“त्याचं भूत बगितलं नसलं तरी त्याला मी एकदा ओझरता पाहिला होता जिवंतपणी, त्याच्या बरं का – द्येखना गडी, सहा फुट उंची, भरदार शरीर, राजबिंडं रूप हो”

“त्याचा अन ह्याचा काही ताळमेळ लागतोय का मग”

“नाय बा, पण मग हा गडी कोण होता?”

“बाप्पा मुरारी, त्याचा दोस्त. हूल देण्यात वस्ताद.”

“मायला, तुम्हाला बरीच माहिती दिसतेय त्याची. आपल्याला बरं काय केलं नाही त्याने.”

“तो काही करत नाही, त्याचं काम एवढंच”

“म्हण्जे?”

मी काही बोललो नाही.

रिक्षा मुतडकवाडीत शिरून माळाच्या दिशेने धावू लागली.

“तुम्हाला कुठे सोडू ?”

“ती टोकाची विहिर आहे ना, तिथे सोड, पुढे मी जाईन”

“एकटं जायला भीती नाय वाटत का?”

“मला सवय आहे”

वाडी संपून माळाचा रस्ता सुरू होतो, तिथेच ती विहिर होती. म्हटली तर वाडीजवळ, म्हटली तर लांब.

विहिर जवळ येऊ लागली, तसं मला बदल जाणवू लागला. एक हूरहूर मनात दाटायला लागली. बाहू

फुरफुरायला लागले, हात शिवशिवायला लागले. साताजन्माची भूक पोटात आगडोंब उसळवू लागली.

“इथं थांबव”

मंत्रावल्यासारखं रिक्षावाल्याने ब्रेक दाबून जागीच रिक्षा थांबवली.

उतरता उतरताच माझ्या इच्छा अनावर झाल्या.

——————————

रिक्षा थांबवून रिक्षावाल्यानं बाहेर पाहिलं.

पासिंजर खिशातून पैसे काढण्याच्या बेतात असताना त्याने नीट न्याहाळून पाहिलं.

सहा फुट उंची, देखणं रूप, भरदार शरीरयष्टी, आणि या देखणेपणाला न शोभणारं क्रूर हसू ओकणारे डोळे.

पुढ्च्याच क्षणी त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

- पण आता फार उशीर झाला होता.

- अमोल कपोले


————आठवांचे गाव————

जून 22, 2009

तुझ्या माझ्या अंगणात
पावसाचा ओला वारा
तुझ्या माझ्या आठवांचा
आज खळाळला झरा

तुझ्या माझ्या अंगणात
पावसाचे चार थेंब
तुझ्या माझ्या अद्वैताचे
त्यात उमटले बिंब

तुझ्या माझ्या कानातून
पावसाचे ओले श्वास
तुझ्या माझ्या रितेपणी
भेटीचे ते जुने भास

तुझ्या माझ्या उरी झरे
पावसाची मुकी सर
तुझ्या माझ्या ओळखीचा
अर्थ होई तिचा स्वर

तुझ्या माझ्या असण्याला
अशा पावसाचे नाव
त्याच्याविना तुझे माझे
सुने आठवांचे गाव !

*अमोल कपोले*


————यमक————

जून 22, 2009

मी म्हणालो,
तो चंद्र मेघांनी माखला.

तू म्हणालीस,
भोवती किती अंधार साचला.

मी म्हणालो,
फुल किती छान

तू म्हणालीस,
सारं सारखंच, फूल असो की पान.

मी म्हणालो,
आभाळातली रत्नं वेचू.

तू म्हणालीस,
तारे कसे असतील मोती किंवा पाचू ?

मी म्हणालो,
ऐकलास का, मौनाचा गुंजारव ?

तू म्हणालीस,
कोलाहलाची तहान भागव.

मी म्हणालो,
लागला का, शब्दांचा थांग ?

तू म्हणालीस,
यमक कुठाय ते सांग.

शब्द माझे बोलले
भावनेची भाषा.

तुला मात्र होती
छंदांचीच आशा.

तुला उमजले नाही,
ते मला कळले होते.

तुझ्या नी माझ्या आयुष्याचे
यमक टळले होते !

- अमोल कपोले


————तुलाच ठाऊक————

जून 22, 2009

तुलाच ठाऊक, असे कशाने
मनात माझ्या शब्द बोलती
तुझीच भाषा

तुलाच ठाऊक, असे कशाने
कुठेही निघता पाय वळावे
तुझ्या दिशेने

तुलाच ठाऊक, असे कशाने
कुणासवेही बोल बोलता
तुझेच शब्द

तुलाच ठाऊक, असे कशाने
कधी कुठेही रमता होती
तुझेच भास

तुलाच ठाऊक, असे कशाने
कुण्या दिशेची झुळूक येता
तुझेच श्वास

तुलाच ठाऊक, असे कशाने
कुण्या स्वरांची तार छेडिता
तुझेच गीत

तुलाच ठाऊक, असे कशाने
कुण्या निशेचे डोळे मिटता
तुझेच स्वप्न

तुलाच ठाऊक, असे कशाने
तुझ्या मनाची मुक्या-मुक्याने
मलाच साद !

- अमोल कपोले


————असे अचानक————

जून 22, 2009

असे अचानक
मनात माझ्या
मोर नाचले

जग हे सारे
क्षणात एका
नवे भासले

अशी अचानक
कळू लागली
पाखर वाणी

फुलाफुलांतून
स्वरून आली
नवीच गाणी

असे अचानक
सुरात एका
गीत गवसले

अबोलातले
अर्थ अनोखे
मनात हसले

अशी अचानक
अंतरातली
ओळख पटली

नवजीवनाची
पहाट मजला
अशी भेटली

असे अचानक
जवळी येता
दोघे आपण
मने उमलली
गेले सरूनी
अवघे मीपण !

- अमोल कपोले