दृष्टांत (भाग १)

रामरावांना जाग आली. झोप उडाली, तरी जवळपास पाच-सात मिनिटं ते पलंगावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत, हेच त्यांना कळेना. नजरेसमोर पांढरा शुभ्र रंग. आभाळ इतकं पांढरं फटक कसं? त्यांना प्रश्न पडला. इतक्यात त्या पांढऱ्या रंगात एक चक्र फिरायला लागलं.
आभाळाला पंखा?
रामरावांना आश्चर्याचा धक्काच बसला. तसे ते धडपडत उठले आणि क्षणार्धात भानावर आले.
“च्यायला, ही तर आपली बेडरूम आहे.”
रामराव स्वत:शीच म्हणाले. भर दुपारी आपण घेतली की काय.. छे, दिवसा घेणं आपल्या तत्वाला पटत नाही हे त्यांना लागलीच आठवलं. हल्ली पान-तंबाखू बंद केल्यामुळे तेही चढायचा प्रश्न नाही..
रामराव गोंधळात पडले. बसल्या बसल्या अंग झाडून त्यांनी आळस दिला. तेव्हा त्यांच्या आडदांड शरीरासोबत पलंगही गदागदा हलला. पलंगाच्या पायाशी ठेवलेला छोटा स्कूल त्यांच्या पायाच्या धक्क्याने बेडरूमच्या दुसऱ्या टोकाला फेकला गेला.
“नौबती झडल्या वाटतं. उठलात का? चहा टाकायला सांगते.”
सुभद्राबाई, म्हणजे रामरावांचं कुटुंब, किचनमधूनच बोलल्या.
चहाचं नाव काढताच रामरावांना फ्रेश वाटलं. मनात गोंधळाची उकळी फुटलेली होती. तिची वाफ दाबत ते बाथरुममध्ये शिरले. खळखळून आठ-दहा चुळा भरल्या. तोंडावर पाण्याचे पंधरा-वीस सपकारे मारले.
“छ्‌या, अजून फ्रेश वाटत नाही. ” चेहरा रुमालाने टिपत रामराव स्वत:शीच म्हणाले, “काय घोळ आहे कळत नाही.”
“घोळ कसला असणार,” चहाचा कप रामरावांपुढे ठेवत सुभद्राबाई बोलल्या, “माणसानं काही करायचंच नाही ठरवल्यावर आपण तरी किती कपाळ आपटून घ्यायचं दगडावर. आपलंच डोकं फुटायचं मेलं.”
रामरावांची अवस्था पुन्हा एकदा तुटलेल्या पतंगासारखी झाली.
“कोणाबद्दल बोलते आहेस तू ?” ते वैतागून म्हणाले.
“अहो असं काय करता. आपल्या संग्रामबद्दलच बोलणार ना मी.”
आता रामरावांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मघाचा पांढरा पडदा, आभाळातला पंखा, वैताग, हॅंग ओव्हर सगळ्याचे संदर्भ लागले. चहाच्या गरम घोटासोबत त्यांचा उरलासुरला गोंधळ पोटात ढकलला गेला.
“मायला, या संग्रामरावांचं काहीतरी करावंच लागेल.” ते मनाशीच म्हणाले.
उरलेला चहा एका घोटात संपवून ते तडक कपड करून बाहेर पडले. आज या प्रकरणाचा निकाल लावायचाच असा निश्चयच त्यांनी केला होता.
…………………………
राजकारण हा रामरावांचा पिढीजात “व्यवसाय”. त्यांच्या वडिलांनी ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली. रामरावांनी तालुक्याच्या राजकारणात जम बसवला. पोरगा निदान आमदारपदापर्यंत जावा, अशी त्यांची मनापासून इच्छा. पण संग्रामरावांच्या नावातला लढाउ बाणा अंगात काही उतरला नाही. दहावी-बारावीला खटपटी लटपटी करून रामरावांनी त्याला पास करून घेतला. पण स्वारी कॉलेजला अशी काही बिलगली की दहा वर्ष उलटूनही बाहेर पडायला तयार नाही. राजकारणाची सुरुवात कॉलेजपासून करेल या आशेने रामरावांनी त्याला कॉलेजच्या निवडणुकीत उभा करून पाहिला. सगळं मॅनेज करून निवडून आणला, पण पोरगा त्याचं माइलेज मिळवू शकला नाही. कॉलेजमध्ये त्याला स्वत:चा करिष्मा निर्माण करता आलाच नाही. रामरावांनी त्याला उद्योगालाही लावण्याचे प्रयत्न केले. दर सहा महिन्यांनी एक असे सहा धंदे सुरु केले. ते सहा दिवसही चालवता आले नाहीत. आपल्या नंतर या पोराचं काय होणार, हा घोर त्यांना आणि त्यांच्यापेक्षा सुभद्राबाईंना लागून होता. त्यामुळेच त्यांची सारखी चिडचिड व्हायची.
पण आज मात्र या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच, असं ठरवून रामराव निघाले ते तडक गणा मास्तरकडे आले. आता या गणा मास्तरचा आणि मास्तरकीचा काहीही संबंध नव्हता. पण अनेकांना व्यावहारिक सल्ले देण्याची कला त्याच्याकडे होती, आणि त्या सल्ल्यांमुळे बऱ्याच जणांचा फायदाही झाला होता. रामरावांनाही. त्यामुळेच आज त्यांचे पाय पुन्हा गणा मास्तरकडे वळले होते.

(क्रमश:)

तुमचा अभिप्राय नोंदवा