मराठीत ज्या प्रमाणात मागील पिढ्यांमध्ये कोशकार्य, परिभाषा निर्मितीसाठी संशोधन केलं गेलं, त्या प्रमाणात आज असं काम होताना दिसत नाही. याचं कारण काय? अशी कोणती कामे करण्याची आज गरज आहे?
मराठीत माझे वडील ज्या प्रकारचं संशोधन करत होते, त्यात त्यांच्या पूर्वसुरींनी उभ्या केलेल्या प्रचंड कामाची मदत झाली. मराठी संस्कृतीच्या संवर्धनाच्या हेतूने मराठी भाषेविषयी संशोधनाचं कार्य सर्व बाजूंनी उचलून धरण्याचं कार्य त्या पिढीतील संशोधकांनी केलं. त्यासाठी त्यांनी निरनिराळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले. मी जेव्हा १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील संशोधनाचे काम करू लागले, तेव्हा लक्षात आलं की अव्वल इंग्रजीच्या शिक्षणातूनच त्या पिढीतील संशोधकांना मराठीच्या जतनासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याचं भान आलं. ते भान घेऊन पूर्णत: देशी पद्धतीने ही माणसं काम करत राहिली. त्यांनी कोश निर्माण केले, नियतकालिकं काढली, लोकगीतं गोळा केली, लोकसंस्कृतीची लहान लहान अंगं तपासली, लोक-संस्कृतीच्या उपासकांकडून त्यांच्या रचना मिळवल्या. ज्ञानाच्या पातळीवर भाषा सर्व अंगांनी मोठी झाली पाहिजे हे लक्षात घेऊन या माणसांनी ही कामं केली. त्यांच्यासमोर भौतिक अडचणी भरपूर होत्या. म्हणजे वाहनांची सोय नसणं, अत्याधुनिक साधनं नसणं इ. पण भाषेच्या संवर्धन आणि जतनासाठी काय करायला पाहिजे याची दृष्टी त्यांच्याकडे होती.
माझे वडील संशो-धनाच्या कार्यासाठी एखाद्या गावी जात तेव्हा कळे, की अमुक एका माणसाकडे शिवकालीन कागदपत्रे आहेत. तेव्हा ती मिळवण्यात फार अडचणी येत. भाऊबंदकीतील वादातून कोणी या कागदपत्रांचा गैरवापर करेल का, सरकारदरबारी ही कागदपत्रे गहाळ होतील अशी भीती आणि हे आमचं आहे, आम्ही ते कोणाला देणार नाही, ते गुप्त राहील, अशी भावना सामान्य लोकांमध्ये असायची. लोकांनाच त्यांचं महत्त्व लक्षात आलेलं नव्हतं. अशा सगळ्या अडचणींना तोंड देत त्या पिढीच्या संशोधकांनी काम केलं.
आताच्या काळात सर्व प्रकारची भौतिक साधनं उपलब्ध आहेत, तरीही ज्या पद्धतशीरपणे संशोधनाचे कार्य व्हायला पाहिजे तेवढं होत नाही. आज शैक्षणिकदृष्ट्या आणि विज्ञान तंत्रज्ञानात आपण जेवढी प्रगती केली आहे, त्या प्रमाणात मराठीत परिभाषा घडवण्याचं काम होत नाही. माझ्या वडिलांनी लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची परिभाषा घडवली. लोकनागर अभ्यासपद्धती यासारखे नवे शब्द निर्माण केले. नव्या वाटा निर्माण करणं, नव्या परिभाषा घडवणं हे त्या काळात या लोकांनी केलं. आज नव्या ज्ञानाच्या प्रकाशात नवी परिभाषा मराठीत घडवण्याचं काम ठप्प झालं आहे. शासनाच्या पातळीवर विश्वकोशाचं काम होतं, त्या जोडीला संस्कृतीकोश अथवा कृषिकोशासारखी कामं शासनाच्या मदतीने सुरू आहेत. श्रीराम कामतांनी चरित्रकोशाचं मोठं काम केलं. राज्य मराठी विकास संस्थेने मध्यंतरी वस्त्रोद्योग कोश सिद्ध केला. इतरही छोट्या-मोठ्या कोशांचं काम चालू आहे. पण ज्या प्रमाणात ज्ञानाचा, माहितीची एक मोठा पट आपल्यापुढे खुला होतो आहे, त्या तुलनेत हे काम खूप कमी पडतं आहे. दुसरं असं, की याचं समाजाला जितकं महत्त्व वाटायला पाहिजे तेवढं वाटत नाही, किवा महत्त्व वाटावं इतकं हे काम समाजासमोर येतही नाही.
माहिती संकलनाचं कार्य हे मूलभूत कार्य आहे, मात्र या माहितीवर संस्कार करून, त्याचा अन्वयार्थ लावून वेगळं मोठं काम उभं राहायला हवं, ते होत नाही. त्यामुळे नुसतंच संकलनाला महत्त्व आलेलं दिसतं. त्यात समग्रतेची दृष्टी नसते, समन्वयाचा अभाव असतो. आणि सुटी-सुटी, छोट्या पातळ्यांवरची कामं ही काही खरी नाहीत. तंजावरच्या मराठी ठेव्याबद्दल आपण मोठ्या अभिमानाने बोलतो, पण तिथली हस्तलिखितं इकडे यावीत, त्यावर अभ्यास व्हावा यासाठी प्रयत्न होत नाहीत. यातील काही हस्तलिखितं चेन्नईच्या संग्रहालयात आहेत, ती इकडे आणण्यासाठी सरकारी पातळीवरच प्रयत्न व्हायला हवेत, ते तितक्या गांभीर्याने, कळकळीने होत नाहीत. इतर भाषा आणि मराठी, विशेषत: सीमावर्ती भागातील भाषा आणि मराठी भाषा यांच्यातील देवघेव, एक-मेकांच्या भाषांवर झालेला परिणाम, त्यातून झालेले सांस्कृतिक बदल आणि परिवर्तनं, छोट्या छोट्या जमातींवर झालेले भाषिक परिणाम, या सगळ्याचा अभ्यास होत नाही. हे सगळे प्रकल्प छोटे आहेत, पण या साऱ्या अभ्यासातून एकूणच भाषेचा पैस आपल्याला अजमावता येतो आणि त्यामुळे आपलीच भाषा टिकवण्याला, समृद्ध करण्याला मदत होते. हे करण्यासाठी आपल्याकडे संशोधन प्रकल्पांकडे लक्ष दिलं जात नाही, तसे विषयही निवडले जात नाहीत, आणि जर कोणी निवडून धडपड केली, तर त्याच्या मागे पाठबळ उभं करण्याचं काम कोणतीच संस्था करताना दिसत नाही. अर्थात यालाही अपवाद आहेत, पण ते अत्यल्प !
मराठीच्या जतन आणि संवर्धनासाठी संस्थात्मक पातळीवर काय करता येईल?
सरकार आणि सरकारी संस्था यांच्या जोडीला टाटा मूलभूत संशोधन संस्थेसारखी संस्था आणि विद्यापीठं यात सहभागी होऊ शकतील. कारण विद्यापीठांचे भाषा विभाग आहेत. पुणे विद्यापीठात मराठी भाषा भवन निर्माण करावं आणि सगळ्या भारतीय भाषांचा तुलनात्मक अभ्यास तिथे व्हावा, भाषिक आदानप्रदान व्हावं आणि मराठी निरनिराळ्या भाषांशी जोडली जावी, असं आमचं स्वप्न होतं, पण ते तसंच राहिलं. विद्यापीठं यासंदर्भात खूप मोठं योगदान देऊ शकतील. कारण विद्यापीठांवर ताण कमी असतो आणि संशोधन हे विद्यापीठांचं मुख्य ध्येय असतं. त्यामुळे त्या अंगाने विद्यापीठं खूप काही करू शकतील असं मला वाटतं.
साहित्य महामंडळासारख्या संस्था या संदर्भात काही करू शकतील का?
साहित्य महामंडळाने या प्रकारचं काम करणं ही अतिशय आनंददायी आणि आवश्यक गोष्ट आहे. पण तसं काही होत नाही. पूर्ण वर्षभर साहित्य संमेलनाची निवडणूक प्रक्रिया या पलीकडे काही काम होताना दिसत नाही. वर्धापनदिनासारखे काही कार्यक्रम होतात. यात पैशाची अडचण असेल, तर स्वत:चा महाकोश स्वत: निर्माण करणं आणि स्वायत्त होणं ही महामंडळाची पहिली गरज आहे. तसं झालं, तर त्यांना या उपक्रमांकडे गांभीर्याने लक्ष देता येईल. बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांमध्ये अशी कामे करण्याची क्षमता निर्माण करून त्यांच्याकडे ती कामे सोपविली गेली, तर बरं होईल. कारण या संस्था आपल्याकडे तयार आहेत. पण त्यांची अडचण अशी आहे, की बाहेरच्या प्रदेशांत मराठी मंडळी कमी असतात, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सगळ्याच संस्था काही फारशा चांगल्या अवस्थेत नाहीत. इथे आपण सगळ्या मराठी सांस्कृतिक संदर्भांमध्येच जगत असतो, पण बाहेरच्या मंडळींना तसे संदर्भ निर्माण करावे लागतात, आणि त्यातच त्यांची सगळी शक्ती खर्ची पडते. मग ते अनेकदा हौसेच्या पातळीवरच राहतं. संस्कृतीची वरवरची अंगंच समोर येतात, कारण आंतरिक संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी जे पर्यावरण लागतं, ते तिथे उपलब्ध होणं अवघड असतं. अन्यथा, त्या संस्था हेही संशोधन कार्यासाठी एक चांगलं व्यासपीठ होऊ शकतील.
व्यक्तिगत पातळीवर काही प्रयत्न करता येतील का?
खरं तर आता जे थोडं फार काम चालू आहे, ते व्यक्तिगत पातळीवरच होताना दिसतं. शासनाचे प्रयत्न या बाबतीत कमी पडत आहेत असं मला वाटत नाही. पण, त्यामागे एक समग्रतेची दृष्टी नाही, समन्वय नाही. त्यामुळे आज भाषा संचालनालय काय करतं आहे याचा राज्य मराठी विकास महामंडळाला पत्ता नसतो, किवा पुरातत्त्व विभाग काय करतो आहे, याची कल्पना साहित्य संस्कृती मंडळाला नसते, अशी परिस्थिती आहे. खरं म्हणजे अशा प्रकारचं काम करणाऱ्या संस्था आपल्याकडे अस्तित्त्वात आहेत. त्यांच्यात समन्वय आणला, तर त्यातून भाषाविषयक एक मोठं काम उभं राहू शकतं. पण ते होत नाही.
पोषाख, खाणं इ. संस्कृतीची अविभाज्य अंगं आहेतच, पण हे नसूनही जेव्हा आपण स्वत:ला मराठी म्हणतो, ते कशामुळे? म्हणजे मराठी माणसाने आजवर चोखाळलेल्या ज्ञानमार्गातून आपली एक विशिष्ट घडण, मूल्यव्यवस्था निर्माण झाली, ज्यातून आपलं मराठीपण सिद्ध झालेलं आहे, की आपले या प्रदेशाशी असलेले संबंध, येथे असलेली आपली मुळं, यातून आपलं मराठीपण आलेलं आहे? वरवरचं काहीही नसताना जेव्हा आपण एखाद्या संस्कृतीची गोष्ट करतो, ती काय आहे? मग आपल्या आतापर्यंतच्या सांस्कृतिक परंपरेचा विचार आपल्या मनात कुठेतरी असतो का? तो माहीत नसताना मराठी म्हणून आपण शिल्लक राहू शकतो का? या सगळ्याचा विचार कुठेतरी केला पाहिजे.
आज माझ्यासारख्या लेखिकेला जगभरातील विविध देशांत विखुरलेल्या मराठी माणसांशी संवाद साधायचा असल्यास त्यासाठीची जी आवश्यक साधनं आहेत, ती कितपत मराठीला उपयुक्त आहेत? जगात सर्वत्र सर्वांना वापरतायेईल असा संगणकावर लिहिण्यासाठीचा एक मराठी फॉन्ट अद्याप आपण तयार करु शकलेलो नाही. व्हॉईस टू टेक्स्ट सॉफ्टवेअर आलंय, पण त्यात मराठी बोललेलं मराठीत टाईप होणं आज शक्य आहे का? त्याप्रकारची प्रणाली निर्माण करणं, अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यासाठी मराठीतून संवादाची साधनं निर्माण करण्याची गरज आहे. पण तसं होत नाही. त्यामुळे इंग्रजी आल्याशिवाय तुम्ही नवीन जगामध्ये प्रवेशच करु शकत नाही, हा जो समज निर्माण झालेला आहे, तो दूर होण्यासाठी हे सारं नवं तंत्रज्ञान वापरण्याच्या प्रणाली मराठीतून विकसित व्हायला हव्यात. हे आव्हान नव्या पिढीतील मुलांनी स्वीकारायला हवं. बाहेरच्या जगाशी संवादाशी भाषा म्हणून इंग्रजी महत्त्वाची असली, तरी समूहांतर्गत संवादासाठी मराठीचा आग्रह कायम ठेवायलाच हवा. जितका मराठी समूह निरनिराळ्या क्षेत्रांत अधिकारपदांवर जाईल, आणि जितक्या गोष्टींत त्याचं मत अनिवार्य होईल, तितकी त्याची भाषाही त्याने बरोबर नेली आणि तिचा आजच्या संदर्भातला विकास करणं मनावर घेतलं, तर ते काही फार अवघड नाही. एकीकडे जागतिकीकरणाच्या रेट्यात सांस्कृतिक सपाटीकरण अटळ आहे. हजारो भाषा मरत आहेत, छोट्या बोली नष्ट होत आहेत, हे अटळ आहे. पण त्याचा वेग किमान रोखणं, आणि आवश्यक गोष्टी, सत्वाच्या गोष्टी कायम राखणं हे केलंच पाहिजे.
एक भाषा म्हणून मराठी लवचिकतेत कमी पडते असं तुम्हाला वाटतं का?
असं नाही मला वाटत. फार पूर्वीपासून मराठीने संस्कृतबरोबरच अरबी, फारसी शब्द आपलेसे केले आहेत. इंग्रजी राजवटीनंतर आपण इंग्रजी आणि हिदीसुद्धा आपलीशी केली. अडचण अशी आहे, की बोलणाऱ्या माणसालाच आता मूळचे मराठी शब्द वापरायची लाज वाटते. त्या ऐवजी आम्ही दहा इंग्रजी शब्द वापरू . त्यामुळे आपले मूळ शब्ददेखील आपण हरवत चाललो आहोत. मूळचे संदर्भ हरवत चालले, की तो शब्द पण निरुपयोगी होतो. त्यामुळे मग तो शब्द कळेनासाच होतो. टांगातळ म्हटलं, तर नाही कळत आजच्या मुलांना. कारण मुळात टांगाच माहीत नाही, आणि तळही माहीत नाही, अशा कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्या आयुष्यातून हद्दपार झाल्या आहेत. त्यांच्याशी जोडलेले शब्दही शिल्लक राहात नाहीत. भोवतालचं जग बदललं, की त्यासोबत अनेक सांस्कृतिक संदर्भ नष्ट होतात. पूर्वी पिढ्यांचं अंतर जास्त असायचं. आता दर पाच वर्षांनंतर पिढी बदलते, असं आपण म्हणतो. त्यामुळे वेगवान बदलांच्या रेट्यात हे संदर्भ तसे टिकणारे नाहीत. हे आपण थोपवू शकत नाही. ते चांगलं की वाईट असा विचार करायला आपल्याला संधीच नाही इतक्या वेगाने हे बदल होत आहेत. अशा परिस्थितीत निदान काय टिकवायचं याचा समग्रतेचा विचार करून प्रयत्न व्हायला हवेत.
इंग्रजी भाषेत दरवर्षी कोणत्या नवीन शब्दांची भर पडली, त्यंाची यादी प्रसिद्ध केली जाते, तसे प्रयत्न आपल्याकडे होताना दिसत नाहीत..
होय, असे प्रयत्न आपल्याकडे होत नाहीत. मराठी शुद्धलेखनातही नियम बदलून, अर्थ न गमावता काही करता येईल का याचा विचार होत नाही. शब्दकोष नव्याने पुन्हा-पुन्हा मराठीत होत नाहीत. भाषेत नव्या शब्दांची जी भर पडते, त्याची दखल घेउन ते आपल्यात सामावून घेणं हे होत नाही. दुसरं असं, की आपल्याकडच्या भाषेची ओळख पाठ्यपुस्तकांतूनच पुर्वी होत असे. प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंतचे उतारे (गद्य आणि पद्य) त्यात समाविष्ट असल्याने भाषा कशी बदलत गेली याचं भान विद्यार्थ्यांना येत असे. आता शिक्षकांनाच त्याची जाणीव नाही. त्यामुळे मुलांनाही नाही. कारण जुनी मराठी वाचायला, समजायला अवघड जाते. तरीही भाषेची ओळख करुन देण्यासाठी ती एक अत्यावश्यक गोष्ट आहे. ती अधिक चांगल्या रितीने अभ्यासक्रमात समाविष्ट व्हायला हवी. भाषेच्या विकासाच्या दृष्टीने शिक्षकांनी त्याकडे लक्ष देऊन तिची ओळख करून देणं हेही गरजेचं आहे. वेगवेगळ्या बोलींमधले धडे असतात. त्यातील शब्दांच्या पलिकडे जाऊन त्यांच्या जिवंतपणाशी जोडून घेत त्या बोलींशी ओळख करून देणं व्हायला पाहिेजे. त्यामुळेच अभ्यासक्रमाच्या बाबतीतही खूप असमाधान आहे.
प्रमाणभाषा असणं हे आवश्यकच असतं. समूहातील एकात्मता टिकण्यात समान भाषा महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे प्रमाण भाषेची आवश्यकता आहेच. शिक्षणाचा हातच न धरलेल्या आणि बोली भाषेतच व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला प्रमाणभाषेत प्रवेश करणं अवघड वाटतं, आणि त्याच्याकडे त्याच्या भाषेची अस्मिता असणं हेही स्वाभाविक आहे. पण त्यांना प्रमाणभाषेकडे आणण्याचा आपला प्रयत्न असावा. त्यांच्या भाषेचा ओघ आपल्या भाषेत मिसळून प्रमाण भाषा आणखी समृद्ध झाल्या पाहिजेत. यात पुन्हा शालेय अभ्यासक्रमाचा वापर महत्वाचा ठरतो. त्या दृष्टीने ज्ञानवंतांच्या, अध्यापकांच्या पिढीने खूप काम करण्याची आवश्यकता आहे.
पूर्वप्रसिद्धी – लोकमत, मंथन पुरवणी – दि.२१ मार्च २०१०