सुपारी

सप्टेंबर 23, 2009

तर भाईनं पहिली मीटिंग घेतली शूटर शंभूसोबत.
भाईचे सगळे व्यवहार तसे रोखठोक.
स्पष्ट. अगदी एखाद्याचा गेम वाजवायचा असला, तरी त्याला सांगून सवरुन.
त्यामुळे मीटिंगमध्येही त्यानं शंभूला सांगितलं,
“शंभ्या, लेका हा असा प्रॉब्लेम आहे.”
“जागा एक और आदमी तीन.”
“भौत बडी नाइन्साफी है.”
“आता यातून बाहेर पडायचा मार्ग एकच आहे. काय?”
“अन तो कोन्चा भाई?”
शुटर शंभूनं आज्ञाधारकपणे विचारलं.
तर भाई म्हणाला,
“हे बघ शंभ्या, आपल्या धंद्याचा उसूल एकदम सीधा हाये.”
“ते म्हण्तात ना, जो जीता वही शिकंदर”
“तर आता त्याच उसुलप्रमाने आपल्याला तुमच्या तिघातला शिकंदर निवडायचा आहे.
समजलास?”
“होय भाई.”
“मग आता निघ आणि उद्याच्याला रात्री अकरा वाजता समुद्रकाठच्या गुदामात तयार रहा मुकाबल्याला.
तिथं तुमच्या तिघांत मुकाबला होईल.
आन मग जो जिता वो शिकंदर.”
भाई विषयीच्या आदराने शूटर शंभूचे डोळे भरून आले. त्याला अगदी भडभडूनच आलं हो.
भाईच खरा न्यायी, असं वाटलं त्याला. देशाचा पीएम होन्याची लायकी या मान्साची आसं पन तेवढृयापुरतं वाटलं त्याला.
भाईच्या पाया पडून तो गेला.
………………………………..
आता सुरेबाज सुरेशसोबतची मीटिंग.
तर भाई पुन्यांदा एकदा रोखठोक.
त्यानं सुरेशसोबतही जो जीता वोही शिकंदरचा एक शो केला.
त्याला बी उद्या रात्री अकराला समुद्राकाठच्या गुदामात बोलावला.
सुरेबाज सुरेशलाही वाटलं, भाई भारताचाच काय, अमेरिकेचाबी पीयेम बनायला पायजे.
भाईच्या पाया पडून तो पन चालता झाला.
………………………………….
आता मीटिंग सवाई भाईसोबत.
हा… चुकलात.
भाई इथं बी रोखठोक.
म्हणाला, “लेका, आयुष्यात आपन याच उसुलावर वागलो की जो जीता वोही शिकंदर. तवा तुला उद्याच्या गेम शो मध्ये एकतर शिकंदर व्हावं लागंन
न्हायतर जागेवर पानी सोडावं लागंन.
माज्या परीनं मी न्याय केलेला हाये, आता स्वताची पात्रता शिद्द करा.
आन या आता.”
सवाई भाईनं मान डोलावली, आन तो बी भाईच्या पायाला स्पर्श करुन चालता झाला.
तर आता समुद्रकाठचं गुदाम.
रात्री अकरा वाजता. गेम शो.
कौन बनेगा तिकिटपती?
……………………………….
समुद्राकाठचं गुदाम म्हणजे भाईचा पुराणा अड्डा.
म्हण्जे दिवार मधल्या अभिका बच्चनचा (हा खास भाईचा शब्द) कित्ता गिरवत भाई भाई झाला तेवापासुनचा.
भाईने आपले कारकिर्दितले सगळे महत्वाचे टप्पे हितंच साजरे केले.
भाईची फेवरेट प्लेस म्हणा हवं तर.
त्यामुळे आजच्या गुंत्याचा निकालबी हितंच लागनार हे ठरलेलंच.
खरं तर ठरलेलं काय असतं म्हना.
तो सर्वांच्या वर कोन बसलेला असतो, तो आधीच ठरवतो आन त्याला पायजे ते घडवून आन्तो.
त्यामुळं भाई तसा निश्चिंत.
आपन काय काळजी करायची, जे होईल ते होईल, असं तो मनाशी म्हणाला.
तर अकरा वाजून एक मिनिटांनी गुदामात पहिली एंट्री झाली, ती शूटर शंभूची.
बघतो तर सगळा अंधार.
पण गुदामाचा कोपरा न कोपरा माहित असल्यानं तो सराईत पावलं टाकीत पुढं चालला.
सूं…… धप्प.
अंधारातून विजेच्या वेगानं सुरा आला आन त्यानं शंभूच्या नरड्याचा वेध घेतला.
काम तमाम.
शंभूला ओरडायची पन संधी मिळाली नाय.

अकरा वाजून दोन मिनिटं.
धापा टाकीत सुरेबाज सुरेश गुदामात शिरला.
मिटृट काळोख.
पण चप्पा चप्पा माहीत असलेला सुरेश सावधपणे पुढे सरकला.
सूं…… धप्प.
एकच गोळी. वर्मी घाव. काम तमाम.

भाईनं दुसर्या दिवशी सकाळी साडेनवाला तातडीची मिटिंग बोलावली.
“हे बगा दोस्तांनो, आपल्या गँगेतले दोन खंदे मोहरे काल रातच्याला तिकिटाच्या लढाईत जीव गमावून बसले.
दोगांनाबी तिकिट हवं होतं, आन आम्ही दोघांनाबी सामोपचारानं, चर्चा करून तोडगा काडू असं सांगितलं होतं.
पन तिकिटाच्या मोहापायी भलती स्पर्धा करायला गेले आन दोगंबी एकमेकाला मारुन बसले.
आता प्रश्न असा आहे, की तिकिट कोनाला द्यायचं.
तर माला वाटतं की आता दोगंबी योग्य उमेदवारच उरले नसल्याने तिकिट सवाई भाईला देण्यात काय अडचण नसावी. काय?”
सर्वांनी माना डोलावल्या.
भाईला समाधान वाटलं.
वर बसलेल्यानं योग्य निकाल लावला होता.

“शाबास पोरा, घरान्याची इज्जत राखलीस.”
“ते तर मी जमवनारच होतो भाई.”
“सगळं व्यवस्थित करतो का नाय असं टेन्शन होतं.”
“छृया, येकदम सिंपल झालं, तुमी म्हटले, जो जीता वोही शिकंदर, पन कैसे जीता हे थोडीच विचारलं. म्हनलं कसा बी जिंकला तरी जो जिता वोही शिकंदर.
मग काय, पावनेअकरालाच गुदामाच्या माळृयावर जाउन बसलो.
इकडच्या दारानं शंभू आला, त्याला टिपला आन तिकडच्या दारानं सुरेश आला त्याला उडवला.
दोघांकडनं पिस्तुलगिरी आणि सुरेबाजी शिकलो त्याची गुरुदक्षिना देउन टाकली.
पन ती वरची जागा लय सोयीची ठरली.
त्यामुळंच तर ठरवलं तसं घडवता आलं.”
“पोरा, वरची जागा सोयीची असते म्हनूनच तर कायबी अन कवाबी आपल्या मनासारखं घडवता येतं, हे आता तुझ्या डोक्यात घुसलं ते बरं झालं.
तेवा वरच्या जागेवरच लक्ष आसू दे.”

“शेवटी आपल्या हातात काय आहे, वर बसलेला ठरवेल तसं होतं, काय समजलास?”

(समाप्त)


प्रथम’दर्शनी’…

ऑगस्ट 4, 2009

डिंग डॉंग
(दार उघडल्याचा आवाज)
“येस?”
“अं, श्वेता आहे का ?”
“श्वेता.. बाहेर गेलीय..”
“अं..मी तिची फ्रेंड.. रसिका”
“अं..हो का, ये ना मग आत”
“…”
(दार लावल्याचा आवाज)
“प्लीज हॅव अ सीट”
“थॅंक्स”
“श्वेता आत्ता दोन मिनिट आधीच खाली गेली.”
“हो का, पण तिने मला अकराला बोलावलेलं..”
“हो का, इथं जवळच गेलीय ती, औषधं आणायला, येईलच एवढ्यात.”
“अच्छा”
“अं.. तू?”
“मी श्वेताचा कझिन ब्रदर. “
“अच्छा..”
“अरे, मी तुला पाणी पण विचारलं नाही. आय ऍम सॉरी..”
(घाईत चालण्याचा आवाज. पलिकडच्या रूममध्ये फ्रीज उघडून बाटली काढल्याचा आवाज. पाणी ग्लासात ओतल्याचा आवाज.)
“इटस ओके, अं..”
“निखिल, माझं नाव, आणि हे पाणी.”
“थॅंक्स”
“तू श्वेताच्या ऑफिसमध्ये असतेस का ?”
“हो..”
“इथं पहिल्यांदाच आली आहेस ना”
“अं, हो…”
“तुझ्या एकूण अवघडलेपणावरून वाटलंच मला. रिलॅक्स. बी कम्फर्टेबल. पेपर हवा असेल, तर तिथे टिपॉयखाली आहे. टीव्ही लावू का ?”
“नाही… नको..”
“…”
“नाईस सेंट.. सॉरी.. डिओ आहे ना?”
“अं.. हो”
“फा चा ऍक्वा. माझा पण फेव्हरिट आहे.”
“माझा पण..”
“कॉफी घेणार?”
“नाही, नको, मी चहा-कॉफी घेत नाही.”
“मग सरबत?”
“चालेल. पण श्वेतालाही येवू देत. तिघं बरोबर घेवू.”
“ओके.”
(पलिकडच्या रूममध्ये ग्लासात पाणी ओतण्याचा आवाज. बरणी उघडल्याचा आवाज. चमच्याने ग्लासांतल्या पाण्यात पावडर टाकल्याचा आवाज. संत्र्याचा आंबट गोड वास. बरणी लावल्याचा आणि चमच्याने सरबत हलवल्याचा आवाज. फ्रीज उघडून काही सेकंदांत पुन्हा लावल्याचा आवाज.)
“चला.. सरबत तयार करून ठेवलंय.”
“हं.. यू आर सो फास्ट.”
“सो आय ऍम. शुभ काम में देरी क्यों?”
“हम्म..”
“इफ यू वोन्ट माइंड. मी जरा आत बसतो. मला जरा प्रॅक्टिस करायचीय. यू कॅन एन्जॉय दी टिव्ही. येईलच श्वेता एवढ्यात.”
“ओके, फाईन.”
(बटणं दाबल्याचा आवाज. रिमोटने टीव्ही लावल्याचा आवाज.)
“हिअर.. हेल्प युअरसेल्फ.”
“थॅंक्स.. बाय द वे.. कसली प्रॅक्टिस करतोस तू?”
“सिंथी.”
“तू सिंथी वाजवतोस?”
“वाजवत नाही, शिकतोय.”
“पण म्हणजे तेच ना.”
“तेच कसं ? असू दे.. तुला पण म्युझिक मध्ये इंटरेस्ट दिसतोय?”
“इंटरेस्ट? आय ऍम मॅड फॉर इट.”
“अरे वा, छानच..”
“काय वाजवतेस तू?”
“वाजवत नाही, गाते.. सॉरी.. गाणं शिकते आहे.”
“गुड.. मस्तच. खरं तर प्रॅक्टिस करताना मला रुममध्ये कुणी आलेलं आवडत नाही. बट, वूड यू लाईक टू जॉइन मी?”
“नको.. कारण मलाही रियाझाच्या वेळी कुणी जवळ असलेलं आवडत नाही. सो डोन्ट अपोलोजाईझ.”
“ओके देन, फॅन्टॅस्टिक. मी जरा आत बसतो.”
(सिंथेसायझरवर अतिशय नाजूक सुरावटी छेडल्या जात आहेत. विलक्षण रोमॅन्टिक स्वरमिलाप. एकेका स्वरावर लडिवाळ हरकती आणि निर्जीव वाद्यातून सजीव, सुंदर, अबोल भावनांची नक्षी वातावरणावर उमटते आहे. अतिशय इन्टेन्स स्वरलहरी.. आणि आता त्यात एक सुरेख आणि सुरेल स्वर मिसळला आहे. प्रचंड गोडवा असलेला आणि भावनांनी भिजलेला आर्द्र स्वर. आसमंत म्हणजे एक गाणं झाल्यासारखं भारलेपण चोहीकडे भरून राहिलं आहे.)
“वॉव, कसली गातेस तू, ऑसम”
“आणि तूही भन्नाट वाजवतोस”
“मझा आला”
“मला पण, फक्त मधल्या द्रुत लयीत जो पीस आहे ना, त्याला थोडा पिलूचा टच दिलास ना, तर त्यातली समर्पणाची भावना आणखी गहिरी होईल.”
“हम्म.. हे माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. खरंच.”
“हे तू कम्पोज केलंयस?”
“हो”
“नाईस कॉम्पोझिशन”
“खरं तर मला विशेष आवडलं नव्हतं, पण तू मघा जे गायलीस त्यामुळे इट रिअली साउंडस नाईस.”
“इट वॉज रिअली अमेझिंग.. तू जे वाजवलंस”
“.. आणि तू जे गायलीस.”
“…”
“…”
(दोनच क्षण शांतता. इतकी, की वेगाने होणाऱ्या श्वासोच्छवासाचे आणि धपापणाऱ्या उरांचे आवाज कानठळ्या बसवताहेत.)
“डिंग डॉंग.”
“…”
“…”
“अरे.. श्वेता आली वाटतं.”
“बहुतेक”
(दार उघडल्याचा आवाज. मोठा पॉज.)
“श्वेता, बराच वेळ लागला तुला. ही रसिका केव्हाची येवून बसल्येय.”
“रसिका? कोण रसिका?”
(पाच-दहा सेकंद अवघडलेली शांतता ऐकू येते आहे.)
“हे श्वेता राजहंसचं घर नाहीये बहुतेक. तिचा आवाज असा नाही.”
“राजहंस? अच्छा, तुझा घोटाळा झाला तर, हे नगरकरांचं घर आहे. ती श्वेता पलिकडच्या विंगमध्ये राहते.”
(पडलेला आवाज) “आय ऍम सॉरी.. मला..”
“इटस ओके.. दारावरची पाटी बदलायला दिलीय बाबांनी. त्यामुळे तुला कळायला चान्स नव्हता.”
(पडलेला आवाज) “म्हणजे ही तुझी फ्रेंड नाही तर..”
“ऑफ कोर्स नॉट..”
“एनीवे आपण मात्र एकदम फास्ट फ्रेंडस झालोय, नाही का रसिका?”
“हो ना.”
“सो, तुला इथे पुन्हा यावंसं वाटलं, तर ये”
“शुअर, थॅंक्स फॉर द म्युझिकल ट्रीट”
“सेम हिअर”
“ओके, निखील, नाइस मिटिंग यू, बाय श्वेता”
“बाय रसिका, मी येवू का तुला सोडायला”
“नको गं, जाईन मी, आय कॅन मॅनेज”
“या, आय नो.. फक्त शेवटची पायरी जरा जास्त उंच आहे, तेवढी जपून उतर, डोळस माणसंही फसतात नेहमी. डोन्ट माइंड, बाय..”
(दार लावल्याचा आवाज)
“माय गॉड निखिल, चार दुकानं फिरले तेव्हा मिळाला तुझा फा डिओ. हा घे..”
“एक मिनिट श्वेता, तू काय म्हणालीस तिला जाताना, डोळस माणसंही फसतात म्हणजे..”
“म्हणजे अरे तीही तुझ्या- आय ऍम सॉरी.”
“माझ्यासारखीच म्हणजे यू मीन..”
(उदास स्वरात) “हो..”
“…”
“…”
(शांततेचा कोलाहल ऐकू येत राहातो.)

- अमोल


दृष्‍टांत (अखेर)

जुलै 25, 2009

(देवळाची पायरी कधीही न चढणाऱ्या आपल्या नवऱ्याला आज नेहमीपेक्षा जास्त चढलेली आहे, असं समजून त्यांचं बोलणं फारसं मनावर न घेता सुभद्राबाईंनी तो विषय तेथेच संपवला.

रामरावांना मात्र त्या रात्री झोप आलीच नाही.)

दुसऱ्या दिवशी रामरावांची सकाळ भराभरा फोन फिरवण्यात गेली.
दुपारी जेवणानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मिटिंगा चालू होत्या. तलाठी, आर्किटेक्ट, प्लॅनर, इंजिनिअर.. चर्चा झडू लागल्या. रामरावांना आता झोपायची उसंत मिळेना. डोक्यात आलेली योजना प्रत्यक्षात येईपर्यंत आता ते थांबणार नव्हते. नदीकाठच्या दोन एकरांच्या तुकड्यावर संग्रामरांवांच्या नव्या बिझनेसची उभारणी सुरु झाली आणि सात-आठ महिन्यांतच काम पूर्णही झालं. दरम्यानच्या काळात रामरावांना झालेल्या आयतेश्वराच्या दृष्टांताची बातमी कर्णोपकर्णी होत गावभर, नव्हे तालुकाभर पसरली होती.
रामरावांना म्हणे आयतेश्वराचा दृष्टांत झाला, खरं का?
खरं का म्हणजे काय गड्या, नदीकाठी काम बी सुरु झालंय म्हणे.
अशा चर्चाही झडू लागल्या. अधूनमधून रामरावांच्या कानावरही पडू लागल्या.
सारं काही नियोजनानुसार होतंय हे पाहून रामराव मिशीतल्या मिशीत हसले.
अखेर तो दिवस उजाडला.
नदीकाठी आज सरकारी, निमसरकारी, राजकीय, सामाजिक वाहनांची मांदियाळीच दाटली.
त्यासोबत तालुक्यातले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि रामरावांची भावकीही.
नाही म्हटलं, तरी किमान पाच हजारांचा लवाजमा पाहून रामराव सुखावले. पेपरातल्या जाहिरातींनी काम चोख बजावलं होतं म्हणायचं.
परिसराला जत्रेचं स्वरुप आलं होतं. नदीकाठचा प्रसन्न परिसर मंत्रपठणाने दुमदुमून गेला. घंटानाद चहुदिशांना भरुन राहिला. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रथम वास्तुचं उद्‌घाटन करण्यात आलं.
आज लोकांनी प्रथमच त्या वास्तूत प्रवेश केला.
एकदम डिट्टो
प्रतिरुपच हो
काय बी फरक नाही बघा
अशा प्रतिक्रिया प्रत्येकाच्या तोंडातून उमटू लागल्या.
..आणि गाभाऱ्यातली मूर्ती पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली.
हुबेहूब आयतेश्वर.
देवा, तुझी लीला अगाध आहे. प्रत्येकजण भारावून गेला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सभामंडपातल्या विश्वस्त मंडळाच्या बोर्डचंही अनावरण त्यांच्याच शुभहस्ते करण्यात आलं. अखेर प्रति-आयतेश्वराच्या उभारणीत प्रकल्पाला मंजुरीपासून आर्थिक अनुदान देण्याचं पुण्यकर्म त्यांच्याच आशीवार्दाने झालं होतं.
भारावलेल्या या वातावरणात सुभद्राबाईंच्या आनंदाला पारावार नव्हता.
आयतेश्वरानं त्यांची प्रार्थना ऐकली होती. संग्रामरावांनी नवी जबाबदारी स्वीकारण्याचं कबूल केलं होतं.
हाताला मळ नाही, पायाला मळ नाही. सगळं काही आयतेश्वर घडवून आणेल, हे आश्वासन आणि रामरावांचं नियोजन त्यांच्यासाठी पुरेसं होतं.
त्यामुळेच विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर संग्रामरावांचं नाव मोठ्या दिमाखात झळकत होतं.
गावभर रामरावांच्या देवभक्तीची आणि दृष्टांताची चर्चा होती.
प्रति आयतेश्वराची प्रसिद्धी आता दिवस रात्र वाढणारच होती.
भक्तांचा ओघ आणि त्यासोबत ओघानेच येणारी समृद्घीही.
सर्वांचीच इच्छा सफल झाली होती.

मेंढरांना नवा कळप मिळाला होता
आणि
गुरांना नवं कुरण.

प्रति-आयतेश्वराच्या गाभाऱ्यातला दिवा मात्र तेवढ्याच निर्मळपणे आणि तेजस्वीपणाने तेवत होता.

(समाप्त)

- अमोल


दृष्टांत (भाग२)

जुलै 21, 2009

(…पण अनेकांना व्यावहारिक सल्ले देण्याची कला त्याच्याकडे होती, आणि त्या सल्ल्यांमुळे बऱ्याच जणांचा फायदाही झाला होता. रामरावांनाही. त्यामुळेच आज त्यांचे पाय पुन्हा गणा मास्तरकडे वळले होते.)

“यावं, यावं फुडारी. आज एकदम हिकडं कसं?”
किल्लीच्या टोकानं कान कोरत गणा मास्तरनं रामरावांचं स्वागत केलं. गाडीत बसण्याच्या बेतात असलेला गणा मास्तर रामरावांना येताना बघून थांबला होता.
“काय मास्तर, दौऱ्यावर का?” रामरावांनी प्रतिप्रश्न केला.
“आयतेश्वराला चाललो होतो. गुरुवारचा नेम आहे आमचा. देवधर्मावर तुमची श्रद्धा नाही ते ठाउक आहे, पण तरी विचारतो, येताय का?”
नको, असं रामरावांच्या अगदी जिभेवर आलं होतं. ते निकरानं टाळत त्यांनी प्रतिप्रश्न केला.
“म्हंजे तुम्हाला परतायला रात होणार?”
“नउ तरी वाजतीलच बघा”
“अस्सं..” कानाची पाळी खाजवत रामराव बोलले, “मग चला तर.. आम्ही बी येतो. बघु तरी तुमचा आयतेश्वर काय म्हणतोय.”
गाडी रस्त्याला लागली तशी रामरावांनी मुद्यालाच हात घातला.
“मास्तर, ह्या संग्रामरावांनी पार वैताग आणलाय बघा आम्हाला. कशी ह्याची गाडी रुळाला लागनार काही कळंना झालंय बघा.”
“पुढारी, तुम्ही आयतेश्वराला यायला तयार झालात तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. संग्रामरावांचं प्रकरण दिसतंय.”
“काय सांगू मास्तर. आपलेच दात आन आपलेच ओठ. पोरगं तिशीला टेकल आता. पन अजून हात पाय हलवायची इच्छा नाही. आमची पुण्याई किती दिवस पुरणार?”
“बरोबर आहे पुढारी. तुम्ही त्याचं लग्न का लावून देत नाही? अंगावर जबाबदारी पडली, की लागेल लायनीला.”
“लगीन काय, मी उद्या बी लावून देईन हो. पोरींचे बाप डोळा ठेवून आहेत आमच्यावर. पण लग्नानंतरही याने काय केलं नाही, तर आमची अब्रू ती काय ऱ्हायली मास्तर.”
गणा मास्तरनं एक नि:श्वास सोडला.
“तुमच्या या समश्येवर आमच्याकडं बी काय उपाय नाही बघा पुढारी. आता काय गाऱ्हाणं मांडायचं ते आयतेश्वरापुढंच मांडा. तुम्हाला आवडणार नाही, पण माझं ऐका. ही वारी फुकट जाणार नाही.”
रामराव काहीच बोलले नाहीत. पोराच्या नाकर्तेपणाला आयतेश्वर काय करणार, असा प्रश्न त्यांच्या मनात आला.
तेवढ्यात आयतेश्वर आलंच.
गर्दीमुळे गाडी अलिकडेच पार्क करून मास्तर आणि रामराव मंदिराच्या दिशेनं निघाले.
निरिच्छेनंच दर्शनाला चाललेले रामराव आजूबाजूचं निरीक्षण करत चालले. पूजा-सामानाची, फुला-माळांची, आयतेश्वराचं लॉकेट, फोटो, अंगठी, चेन, शो-पीस, कॅसेट, सीडी अशा चीजवस्तूंच्या दुकानांची रांग दुतर्फा लागली होती. दोन-चार दुकानांत आयतेश्वराची कोणी “लोकल सुरेश वाडकरनं” गायलेली गाणी ढणाणा वाजत होती. चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर आयतेश्वराची गाणी.. सारं काही आयतेश्वरमय होतं. गुरुवार असल्याने मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. दर्शनाच्या रांगेत उभं असताना रामराव सारं काही टिपत होते.
साधा अभिषेक – 501 रु.
साग्रसंगीत अभिषेक – 1001 रु.
साद्यंत साग्रसंगीत अभिषेक – 5001 रु.
असा बोर्ड वाचून त्यांची करमणूक झाली.
आयतेश्वराची मूर्ती पाहून मात्र त्यांचा सगळा वैताग, शीणवटा पार पळून गेला. त्यांना प्रसन्न वाटू लागलं. मूर्तीपुढे नतमस्तक होवून परतताना कोपऱ्यात ठेवलेली भली मोठी दानपेटी त्यांच्या नजरेतून सुटली नाही.

रामराव घरी परतले ते एकदम खुशीत. रात्रीचं जेवण घेताना त्यांनी सुभद्राबाईंना पुन्हा-पुन्हा “संग्रामची गाडी आता कशी रुळाला लावतो पहाच”,असं सांगितलं.
“कशी ?” असं विचारल्यावर मात्र त्यांनी काही उत्तर दिलं नाही.
“मला दृष्टांत झालाय,” एवढंच ते उत्तरले.
देवळाची पायरी कधीही न चढणाऱ्या आपल्या नवऱ्याला आज नेहमीपेक्षा जास्त चढलेली आहे, असं समजून त्यांचं बोलणं फारसं मनावर न घेता सुभद्राबाईंनी तो विषय तेथेच संपवला.

रामरावांना मात्र त्या रात्री झोप आलीच नाही.

(क्रमश:)


दृष्टांत (भाग १)

जुलै 18, 2009

रामरावांना जाग आली. झोप उडाली, तरी जवळपास पाच-सात मिनिटं ते पलंगावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत, हेच त्यांना कळेना. नजरेसमोर पांढरा शुभ्र रंग. आभाळ इतकं पांढरं फटक कसं? त्यांना प्रश्न पडला. इतक्यात त्या पांढऱ्या रंगात एक चक्र फिरायला लागलं.
आभाळाला पंखा?
रामरावांना आश्चर्याचा धक्काच बसला. तसे ते धडपडत उठले आणि क्षणार्धात भानावर आले.
“च्यायला, ही तर आपली बेडरूम आहे.”
रामराव स्वत:शीच म्हणाले. भर दुपारी आपण घेतली की काय.. छे, दिवसा घेणं आपल्या तत्वाला पटत नाही हे त्यांना लागलीच आठवलं. हल्ली पान-तंबाखू बंद केल्यामुळे तेही चढायचा प्रश्न नाही..
रामराव गोंधळात पडले. बसल्या बसल्या अंग झाडून त्यांनी आळस दिला. तेव्हा त्यांच्या आडदांड शरीरासोबत पलंगही गदागदा हलला. पलंगाच्या पायाशी ठेवलेला छोटा स्कूल त्यांच्या पायाच्या धक्क्याने बेडरूमच्या दुसऱ्या टोकाला फेकला गेला.
“नौबती झडल्या वाटतं. उठलात का? चहा टाकायला सांगते.”
सुभद्राबाई, म्हणजे रामरावांचं कुटुंब, किचनमधूनच बोलल्या.
चहाचं नाव काढताच रामरावांना फ्रेश वाटलं. मनात गोंधळाची उकळी फुटलेली होती. तिची वाफ दाबत ते बाथरुममध्ये शिरले. खळखळून आठ-दहा चुळा भरल्या. तोंडावर पाण्याचे पंधरा-वीस सपकारे मारले.
“छ्‌या, अजून फ्रेश वाटत नाही. ” चेहरा रुमालाने टिपत रामराव स्वत:शीच म्हणाले, “काय घोळ आहे कळत नाही.”
“घोळ कसला असणार,” चहाचा कप रामरावांपुढे ठेवत सुभद्राबाई बोलल्या, “माणसानं काही करायचंच नाही ठरवल्यावर आपण तरी किती कपाळ आपटून घ्यायचं दगडावर. आपलंच डोकं फुटायचं मेलं.”
रामरावांची अवस्था पुन्हा एकदा तुटलेल्या पतंगासारखी झाली.
“कोणाबद्दल बोलते आहेस तू ?” ते वैतागून म्हणाले.
“अहो असं काय करता. आपल्या संग्रामबद्दलच बोलणार ना मी.”
आता रामरावांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मघाचा पांढरा पडदा, आभाळातला पंखा, वैताग, हॅंग ओव्हर सगळ्याचे संदर्भ लागले. चहाच्या गरम घोटासोबत त्यांचा उरलासुरला गोंधळ पोटात ढकलला गेला.
“मायला, या संग्रामरावांचं काहीतरी करावंच लागेल.” ते मनाशीच म्हणाले.
उरलेला चहा एका घोटात संपवून ते तडक कपड करून बाहेर पडले. आज या प्रकरणाचा निकाल लावायचाच असा निश्चयच त्यांनी केला होता.
…………………………
राजकारण हा रामरावांचा पिढीजात “व्यवसाय”. त्यांच्या वडिलांनी ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली. रामरावांनी तालुक्याच्या राजकारणात जम बसवला. पोरगा निदान आमदारपदापर्यंत जावा, अशी त्यांची मनापासून इच्छा. पण संग्रामरावांच्या नावातला लढाउ बाणा अंगात काही उतरला नाही. दहावी-बारावीला खटपटी लटपटी करून रामरावांनी त्याला पास करून घेतला. पण स्वारी कॉलेजला अशी काही बिलगली की दहा वर्ष उलटूनही बाहेर पडायला तयार नाही. राजकारणाची सुरुवात कॉलेजपासून करेल या आशेने रामरावांनी त्याला कॉलेजच्या निवडणुकीत उभा करून पाहिला. सगळं मॅनेज करून निवडून आणला, पण पोरगा त्याचं माइलेज मिळवू शकला नाही. कॉलेजमध्ये त्याला स्वत:चा करिष्मा निर्माण करता आलाच नाही. रामरावांनी त्याला उद्योगालाही लावण्याचे प्रयत्न केले. दर सहा महिन्यांनी एक असे सहा धंदे सुरु केले. ते सहा दिवसही चालवता आले नाहीत. आपल्या नंतर या पोराचं काय होणार, हा घोर त्यांना आणि त्यांच्यापेक्षा सुभद्राबाईंना लागून होता. त्यामुळेच त्यांची सारखी चिडचिड व्हायची.
पण आज मात्र या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच, असं ठरवून रामराव निघाले ते तडक गणा मास्तरकडे आले. आता या गणा मास्तरचा आणि मास्तरकीचा काहीही संबंध नव्हता. पण अनेकांना व्यावहारिक सल्ले देण्याची कला त्याच्याकडे होती, आणि त्या सल्ल्यांमुळे बऱ्याच जणांचा फायदाही झाला होता. रामरावांनाही. त्यामुळेच आज त्यांचे पाय पुन्हा गणा मास्तरकडे वळले होते.

(क्रमश:)


उद्योगपती

जुलै 8, 2009

पहाटेची 3 ची वेळ ही काही सहज म्हणून फिरायला जाण्याची वेळ नाही. पण शहर नवीन असेल, तुम्ही एकटे असाल, आणि एरिया हाय प्रोफाईल असेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप येत नसेल, तर फिरायला जाण्यासाठी कोणतीही वेळ अयोग्य नाही. उलट अशा अनवट वेळाच बऱ्याचदा आपल्याला त्या शहराबद्दल दोन वेगळ्या गोष्टी सांगून जातात.
..आणि त्या दिवशी त्या दोन वेगळ्या नव्हे, दिग्मूढ करणाऱ्या गोष्टी समजणे माझ्या नशिबात होते. उतरलेल्या हॉटेलमधून बाहेर येऊन मी सरळ मुख्य रस्ता धरला. शहराच्या त्या भागात बहुतांश हॉटेलं आणि पब्ज, क्लब्जची रेलचेल असल्याने रात्रीचे दहा वाजल्यासारखा माहौल होता. चकाचक विदेशी बनावटीच्या गाडयांनी पार्किंग लॉट ओसंडून वाहत होते. त्या रंगीबेरंगी विश्वाचा नजारा न्याहाळत मी फुटपाथवरून रमत-गमत चाललो होतो, चालता-चालता मी पुढच्या मोठ्या चौकात आलो. आता चौक पास करून सरळ पुढे जावं की डावा अथवा उजवा रस्ता पकडावा की सरळ मागे फिस्न रूमवर जावं या विचारात असतानाच मला कुतूहल जागं करणारं ते दृश्य दिसलं.
चौकात रेंगाळलेल्या एका कारच्या खिडकीशी झुकून एक मनुष्य, भिकारीच असावा असं त्याच्या कपड्यांवर वाटत होतं, कारमधल्या मालकाच्या विनवण्या करत होता. अखेर मालकाने त्याच्या अंगावर शंभराची नोट भिरकावली आणि ती कार वेगाने रस्त्यावरच्या तुरळक वाहतुकीत अंतर्धान पावली.
एक सर्वसाधारण दृश्य. त्याची नोंद कळत-नकळत नोंद घेऊन मी पुढचा रस्ता धरणार होतो. पण, त्या भिकाऱ्याच्या नंतरच्या कृतीने माझी उत्सुकता चाळवली गेली. शंभराची नोट खिशात टाकून तो भिकारी चौकातून डावीकडे वळला, मात्र असं करताना त्याच्या देहबोलीत विलक्षण फरक पडला होता. मघाशी शरीराच्या प्रत्येक अवयवातून व्यक्त होणारी लाचारी अचानक लुप्त होऊन, त्यात एक प्रकारचा अपराईटनेस आला होता. त्या चालण्यात एक प्रकारचा सावधपणा आणि लगबग होती, त्याच्या लक्षात येणार नाही इतकं अंतर ठेवून मीही त्याच्यामागे चालू लागलो.

रस्त्यावरच्या एका अंधाऱ्या भागातून आता आम्ही जात होतो, भिकाऱ्याचं चालणं आता थोडं मंद झालं होतं, अखेर एका फारशी वर्दळ नसलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यात तो थांबला. खांद्यावरची मळकट पिशवी त्याने खाली घेतली. घाईत त्यातून काहीतरी बाहेर काढलं.. कपडेच होते ते. झटपट त्याने अंगावरचे फाटके, मळकट कपडे उतरवले आणि पिशवीत कोंबले. पिशवीतले काढलेले कपडे अंगावर चढवले, स्वच्छ पांढराशुभ्र शर्ट आणि गडद निळी पॅंट. खिशातून कंगवा काढून त्याने अंदाजानेच स्वत:चे केस विंचरले. पिशवीतून नॅपकीन काढला आणि खसाखसा स्वत:चा चेहरा नॅपकीनने पुसला. कायापालट. अक्षरश: कायापालट झाला होता त्याचा. पंधरा मिनिटांपूर्वी हाच माणूस पलिकडच्या चौकात चक्क भीक मागत होता, असं जर मी आता कुणाला सांगितलं असतं, तर त्याने मलाच अकलेचा भिकारी आहेस का, असं विचारलं असतं.
पिशवी उचलून समोरचा “भिकारी”आता चालू लागला, मीही त्याच्या मागोमाग चालू लागलो. रस्ता जिथे संपत होता, त्या टोकाशी एक रिक्षा उभी होती. भिकाऱ्याने रिक्षावाल्याला हात केला, पाच मिनिटांतच भिकारी रिक्षात बसून स्टेशनच्या दिशेने गेला देखील..
..हा प्रकार काय आहे, याचा तपास लावल्याशिवाय परतायचं नाही, असं ठरवून मी मागून येणाऱ्या रिक्षाला हात दिला आणि स्टेशनला घ्यायला सांगितलं. रस्ता मोकळा असल्याने ती रिक्षा नजरेच्या टप्प्यातच होती.
हा प्रकार काय आहे, हे जाणून घ्यायची माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती..

स्टेशनसमोरच्या पानाच्या टपरीजवळच तो मला दिसला. पांढरपेशा नोकरदार माणसासारखा तो सिगरेट ओढत उभा होता. आता आपण काय करावं, ते कळेना म्हणून मीही थेट टपरीजवळच गेलो आणि सिगरेट शिलगावली.
काय साहेब, कुणाला शोधताय?
त्याचा प्रश्न मला अगदीच अनपेक्षित नव्हता, पण मी त्याच्या मागावर आहे, हे त्याने फार पटकन ओळखल्याचं मला आश्चर्य वाटलं.
नवीन पोस्टिंग दिसतेय तुमची.
म्हणजे तो मला पोलिस समजला होता.
मी पोलिस नाही, मी एका वाक्यात त्याची उत्सुकता संपवली.
समोरच्या माणसाला मी पत्रकार आहे, असं सांगितल्यावर दोन गोष्टी शक्य असतात,
एक तर तो काहीच बोलत नाही, किंवा खूपच बडबड करायला लागतो.
सुदैवाने तो दुसऱ्या प्रकारातला निघाला. आणि त्याने त्याची अद्‌भूत किंवा नॉट सो अद्‌भूत अशी कहाणी मला ऐकवली.
पुढच्याच स्टेशनवर उतरून तो आपल्या घरी जाणार होतो. घर म्हणजे तुमच्या-आमच्यासारखं वन बीएचके फ्लॅट.
त्याचं या व्यवसायातून येणारं उत्पन्न दरमहा साधारण तीसएक हजार रूपये होतं, होय, तीनएक नाही तीसएक.
भीक मागणे हा त्याचा व्यवसाय होता. त्यासाठी तो त्या उच्चभ्रू वस्तीत रोज रात्री आठ ते पहाटे तीन अशी ड्‌यूटी करत असे. रोज घरू न निघताना तो टापटीप, स्वच्छ कपडे घालून निघत असे. आज त्याने जिथे कपडे बदलले, तशाच कमी वर्दळीच्या जागी थांबून तो भिकाऱ्याचा वेश परिधान करे. पहाटे तीनला ऑफिस संपल्यावर तो पुन्हा कपडे बदलून घरी जाई. गेली 20 वर्षे तो हे करत होता.
याच वीस वर्षांच्या कमाईतून त्याने मुलांची शिक्षणं केली, त्याचा एक मुलगा झाडू विकण्याचा व्यवसाय करतो, तर दुसरा कॉलेजला आहे. सध्या राहत असलेल्या वन बीएचके फ्लॅटव्यतिरिक्त त्याने दुसराही एक मोठा फ्लॅट बुक केला आहे, लवकरच त्याचा ताबा मिळेल. याशिवाय इतरही व्यवसायांत त्याने पैसा गुंतवलेला आहे.
एकूण तो आपले दैन्यावस्थेतील, दरिद्री जिण्याचा पुरेपूर उपभोग घेतो आहे.
दिवसाला हजार रूपयांची बेगमी देणारा असा व्यवसाय दुसरा नाही, असं त्याचं मत आहे.
त्याच्या व्यवसाय एरियात गेली वीस वर्षे त्याची एकट्याची मक्तेदारी आहे, दुसऱ्या कुणालाही तो इथं पाय रोवू देत नाही. त्यासाठी भाईंपासून सायबापर्यंत सर्वांची फिल्डिंग त्याने व्यवस्थित लावली आहे.

..हातातल्या सिगरेटचा चटका बसला, तेव्हा मी भानावर आलो. तो नुकताच निघून गेला होता.
धक्क्यातून बाहेर येत मी रिक्षाला हात केला,
बाबा कुछ खाने को दो..
एक भिकारी रिक्षावाल्यापुढे हात पसरत होता.
..मला मात्र त्याच्या जागी सुटा-बुटातला कडक् उद्योगपती दिसू लागला होता.

- अमोल कपोले


निरर्थक..निर्हेतुक

जुलै 1, 2009

निव्वळ उपयोगितेवर आधारित जगण्यावर त्याचा विश्वास नव्हता. हाताशी उपयोगाचं काम नसल्याने तो आपल्याच खुळ्या नादांत रमायचा. पुरुषांची, स्त्रियांची चित्रं काढणं, सुंदर शिल्प घडवणं असं बरंच काही. जगाच्या दृष्टीनं जे काही निरुपयोगी होतं, निरुद्देश होतं, त्यातच तो वेळ घालवित असे. लोक त्याला हसायचे. त्यालाही कळायचं, आपण काहीतरी “उद्योग” करायला हवा. तो प्रयत्नही करीत असे. पण दुसर्‌या कामांत त्याचं मन लागत नसे.

काही मुलं क्वचितच अभ्यास करतात, आणि तरीही परीक्षेत पास होतात. याच्या बाबतही तसंच झालं. अवघं आयुष्य निरर्थक गोष्टींत घालवूनही मृत्युनंतर कशी कोण जाणे, याला स्वर्गाची दारं खुली झाली. आणि दैवगती म्हणावी की काव्यगत न्याय कुणास ठाउक, पण याला स्वर्गात घेउन आलेल्या देवदुताने महाशयांची रवानगी नेमकी कामसूंच्या नंदनवनात केली.

कामसूंच्या नंदनवनात निवांतपणा सोडून सारं काही सापडेल.

इथले पुरुष म्हणतात, “देवा, आमच्याकडे रिकामा घालवायला एक नॅनो सेकंदही नाही.”

बायका म्हणतात, “चला पटापटा कामं उरका, काळ पुढे चालला. थांबला तो संपला”

सारेच म्हणतात, “अजून भरपूर कामं उरकायचीत. हातातला प्रत्येक क्षण सार्थकी लागला पाहिजे.”

असं सांगताना ते तक्रारवजा उसासे टाकतात खरं, पण याच शब्दांनी त्यांना बळ येतं आणि ते जोमाने कामाला लागतात हेही खरं.

या सार्‌या वातावरणाला त्याचा स्वभाव जराही मिळता जुळता नव्हता. अहो, मर्त्यलोकातलं अवघं आयुष्य ज्याने कसलंही काम न करता घालवलं, तो या कामसूंच्या नंदनवनात कसा रुळेल? त्यामुळे स्वारी दिवसभर भटकंती करत राही. हिरवाईशी हितगूज करी. झर्‌यांच्या सान्निध्यात वेळ घालवीत असे. नंदनवनातली कामसू माणसं त्याच्याकडे “वाया गेलेलं प्रकरण” असं समजून दुर्लक्ष करायचे.

तर अशा या ठिकाणी एक तरुणी रोज नंदनवनातल्या मूक झर्‌याचं पाणी भरून नेण्याचं काम करीत असे. (मूक अशासाठी की कामसूंच्या नंदनवनातला झराही खळखळाटाद्वारे वाया जात असलेली उर्जा वाचवत असे. आता बोला!)

नवथर तारूण्याने बहरलेल्या या मुलीचं चालणं इतकं डौलदार आणि चपळ की जणू कुशल कलाकाराची वीणेवरून नजाकतीनं फिरणारी नाजुक बोटं. चंचलपणात तिला हार न जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे सदा न कदा कपाळावर येणारी तिच्याच केसांची बटवेलांटी.

आजही ती आपल्याच नादात घडा भरुन घेण्यासाठी आली. त्याचवेळी तोही तेथे रेंगाळत होता. पाणी भरताना तिची नजर अभावितपणेच त्याच्याकडे गेली. एखाद्या राजकन्येची दारी आलेल्या याचकाकडे जावी तशी.

“ओहो, तुझ्याकडे काही काम नाहीये का?” तिनं विचारलं.

“काम? कामात वाया घालवायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये” तो उत्तरला.

पण तिला काही त्याच्या बोलण्याचा अर्थ लागला नाही. ती म्हणाली, “तुला हवं असल्यास मी तुला काही काम देईन”

“मूक निर्झराच्या देवते, गेले काही क्षण मी तुझ्याकडून काहीतरी मागावं असाच विचार करतोय”, तो उत्तरला.

“कसलं काम हवंय तुला?” तिनं विचारलं.

“तुझ्या घागरींतली एक मला हवी आहे” तो म्हणाला.

“तुला यातून पाणी काढायचंय का?”

“नाही. मला त्यावर चित्र काढायचंय”

“चित्र? हू” नाक फेंदारून ती म्हणाली, “असल्या रिकामटेकड्या गोष्टींसाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाहीये”

असं म्हणून ती घागरी उचलून चालू लागली.

पण त्यानं तिचा पिच्छा सोडला नाही. त्यानंतर रोज जेव्हा ती झर्‌याचं पाणी भरायला येई तेव्हा हा रोज तिची मनधरणी करत असे. चित्र काढायला घागर मागत असे.

अखेर एक दिवस तिचं मन द्रवलं आणि तिनं आपली एक घागर त्याला दिली.

तो चित्र काढू लागला. लयदार रेषा आणि विलोभनीय रंगांच्‍या मेळातून त्याने ती घागर सजवली, देखणी बनवली. चित्र पूर्ण करून त्याने जेव्हा घागर तिला परत केली, तेव्हा ती पाहातच राहिली. घागर तोंडासमोर धरून चित्र पुन्हा-पुन्हा निरखत राहिली. डोळ्यात कोडं पडल्याचे भाव. भुवयांची धनुकली जास्तच वाकल्यासारखी.

“या रंगरेषांचा अर्थ काय रे? त्यांचा नेमका उपयोग काय?” तिनं त्याला विचारलं.

त्याला हसू आलं.

“शून्य. चित्राला अर्थ, हेतू असतोच असं नाही.” तो म्हणाला.

घागर घेउन ती घरी आली. घरच्यांच्या नजरा चुकवून दिव्याच्या प्रकाशात तीवरची कलाकुसर न्याहाळत राहिली. पुन्हा पुन्हा. प्रत्येक बाजुने. उलटसुलट. त्या रात्री तिला झोप लागेना. अंथरुणातून उठून तिने दिवा लावला आणि रात्रीच्या नीरव शांततेत घागरीवरची कलाकुसर पुन्हा न्याहाळली. आयुष्यात प्रथमच तिने निरर्थक, निर्हेतुक असं काहीतरी पाहिलं होतं.

दुसर्‌या दिवशी ती जेव्हा घागरी घेउन पाणी भरण्यासाठी निर्झराकडे निघाली तेव्हा तिची पावलं नेहमीच्या घाईनं पडत नव्हती. तिच्या मनातही एक विलक्षण नवी जाणीव भरून राहिली होती. जिला ना हेतू होता, ना अर्थ.

आजही तो तिथं उभा होता.
गोंधळून तिनं विचारलं, “आज तुला काय हवंय?”
“काही नाही. आणखी थोडंसं काम” तो म्हणाला.
“कोणतं काम आवडेल तुला?”
“तुझ्या केसांसाठी एक रंगीबेरंगी रिबिन तयार करावी म्हणतो” तो म्हणाला.
“कशासाठी?”
“असंच”

आणि त्याने रिबिनी बनवल्याही. सुंदर, रंगारंग. आता तिचा रोजचा बराचसा वेळ त्या सुंदर रिबिनी केसांत बांधण्यात जाउ लागला. बरीचशी मिनिटं निरर्थक वाया जाउ लागली. बरंचसं काम शिल्लक राहू लागलं.

हळूहळू कामसूंच्या नंदनवनातल्या बर्‌याचशा लोकांची कामं तुंबून राहू लागली. प्रत्येकाचा थोडाफार वेळ चित्रं काढणे, शिल्प घडवणे अशा निरर्थक गोष्टींत वाया जाउ लागला.

नंदनवनाचे श्रेष्ठी चिंताक्रांत बनली. कामांवर फारच परिणाम होउ लागला होता. नंदनवनाच्या इतिहासात आजवर असं कधी घडलं नव्हतं. तातडीची सभा बोलावण्यात आली.

देवदूताने घाईतच सभेत प्रवेश केला, श्रेष्ठींना मुजरा केला आणि आपली चूक कबुल केली.

“क्षमस्व. मी चुकीच्या माणसाला नंदनवनात आणलं”, तो म्हणाला, “या सार्‌याला तोच जबाबदार आहे.”

त्याला बोलावणं धाडण्यात आलं.

शांतपणे त्याने सभेत प्रवेश केला. सभेनं त्याच्याकडे पाहिलं. कलाकाराला साजेसा वेष, हातात निरनिराळे कुंचले, रंगांच्या वड्या, कपड्यांना रंगांचे डाग… पाहता क्षणीच त्यांना समजलं. हा मनुष्य नंदनवनात राहण्यास योग्य नाही.

“या ठिकाणी तुमच्या सारख्या लोकांना स्थान नाही. ताबडतोब चालते व्हा” अध्यक्षांनी कठोर स्वरात आज्ञा सोडली.

त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला, आपले कुंचले आणि रंग गोळा केले आणि सभेतून निघाला. जाण्यासाठी वळणार इतक्यात त्याच्या कानावर शब्द ओले.
“थांब, मलाही तुझ्यासोबत यायचंय”
मुक्या निर्झरावर पाणी भरणारी ती. तिचाच आवाज होता तो.

सारी सभा विस्मयचकित झाली. नंदनवनात अशी घटना कधीही घडली नव्हती. एक निर्हेतुक आणि निरर्थक घटना.

- (गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या A Wrong Man in Workers Paradise चे भाषांतर)


गर्वहरण

जून 30, 2009

घ्रर्रर्र….
नदीकिनार्‌याच्या शांत वातावरणाला चिरत तो आवाज आसमंतात भरला. आसपासच्या झाडाझुडपांवरची पाखरं कावरी बावरी होत उडाली. नदीकाठाने मॉर्निंग वॉकला जाणार्‌यांचे चेहरे त्रासिक बनले. नेहमीच्या चिवचिवाटाची जागा यांत्रिक थडथडाटाने घेतली. मातीचा धुरळा उडून धुकं धुकं झालं. भले मोठे जेसीबी नदीकाठच्या उंचसखल जमिनीला एकसारखे करण्याच्या कामाला जुंपले. नदीच्या ओंजळभर पाण्यातही तगून राहिलेले मासे भेदरून तळातल्या कपारींच्या आश्रयाला गेले. पाण्यावर धुळीचं बारिकसा तांबडा-पांढरा थर साचू लागला. सावळ्या चेहर्‌याच्या बाईनं तोंडभर पावडर थापून घ्यावी, तसा नदीचा चेहरा विचित्र दिसू लागला.
नदीचा प्रवाह मात्र नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहत होता. काठावर आज झालेल्या बदलांची नोंद त्याने घेतली होती की नाही, कोण जाणे.

शहराच्या मध्यभागातून वाहणारी नदी म्हणजे पुरुषांच्या कळपात हरवलेली बाई. दाही दिशांनी जिभल्या चाटत अंगावर येवू पाहणार्‌या इमारती, झोपडपटृटया, रस्ते, गटारं. त्यातूनही उरलीसुरली अब्रु सांभाळत वाट फुटेल तशी आपला मार्ग आक्रमणारी ती. नदी. आजही काठावर दाटीवाटीनं गर्दी करुन असलेल्या उंच इमारतींनी तिच्याकडे तुच्छतेने पाहिलं. पलिकडचे रस्ते दात विचकून हसले. गटारं घाण ओकू लागली. त्यात भर म्हणून ही जेसीबी यंत्रं. सौंदर्यवतीचा केशसंभार वस्तर्‌यानं भादरून तुळतुळीत गोटा करावा, तसा तो हिरवाईनं लगडलेला नदीकाठ जेसीबीच्या धारेखाली निर्जीव, सरधोपट आकार धारण करु लागला.

एकेकाळी हीच नदी शहरातलं मुख्य सौंदर्यस्थळ होती. घरात एकुलती एक पोर असली, की तिचं जसं कोडकौतुक होतं, तसंच हिचंही होत असे. दोन्ही तिरांवर पसरलेली हिरवाई म्हणजे या पोरीच्या खांद्यावर बागडणार्‌या दोन वेण्याच. सकाळ-संध्याकाळ नदीकाठचा आसमंत पाखरांच्या किलबिलाटाने किणकिणायचा. सुटीच्या दिवशी लेकुरवाळी कुटुंबं, नवथर तरुण जोडपी नदीच्या काठी विरंगुळ्याला यायची. चार घटका निवांत घालवायची. नदीच्या वाहत्या पाण्याचा खळखळाट तेव्हा अधिकच बोलका व्हायचा.

पण अचानक सारंच बदललं. नदीकाठाला लागून पहिली इमारत उभी राहिली, तेव्हाही नदीचा प्रवाह नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहत होता. काठावर झालेल्या बदलांची नोंद त्याने घेतली होती की नाही, कोण जाणे. याच शांतपणाचा फायदा दोन पायांच्या श्वापदानं घेतला. नंदनवनात रोगट तण माजावं, तसं इमारतींचं रान नदीच्या आसपास माजू लागलं. डांबराचे साप विषारी फुत्कार टाकत तिच्याभोवती पाश आवळू लागले. सुदृढ शरीरात रोगट रक्त शिरावं, तशी गटारं नदीच्या सात्विक सौंदर्याला भ्रष्ट करण्याच्या इर्ष्येने तिच्या शरीराला लुचू लागली. पण तणातल्या तुळशीसारखी नदी मात्र या सार्‌यांतून वाट काढत वाहत राहिली. अशक्त्त बनली पण साहत राहिली. काठावरचे इमले कुचेष्टेने तिची टर उडवत राहिले.

आज मात्र अखेरचा घाव पडला. अक्राळविक्राळ यंत्रानं तिच्या अब्रुवरच घाला घातला. डोहात आतल्या आत खळबळ माजली. पण तीरावरुन कुचेष्टेनं तिच्याकडे पाहणार्‌या इमल्यांना नदीचा प्रवाह आजही शांत आणि संथच वाटत होता.

आपल्या नशिबावर रडावं की माणसाच्या करंटेपणावर हसावं नदीला कळेना. डोहातल्या कपारीत घुमणारे हुंदके तिला असह्य झाले. दात विचकून हसणार्‌या इमल्यांचा आवाज कानातून मळ काढून फेकावा तसा तिनं फेकायचा प्रयत्न केला. उगमापासून अंतापर्यंत अंगात साठलेला संताप उसळ्या मारु लागला. शहराबाहेरच्या धरणाच्या कुंपणावर नदीचं पाणी धडका देउ लागलं.

अशातच कृष्णानं द्रौपदीला वस्त्र पुरवावं तशा पावसाच्या धारा जमिनीवर कोसळू लागल्या, रानावनातून, रस्ते-गल्ल्यांतून, गटारा-नाल्यांतून पाणी नदीला येवून मिळू  लागलं. तसा प्रवाहाचा जोर वाढला. वाढतच राहिला.

हजारोंच्या संख्येनं सैन्य शत्रूवर चालून जावं, तसे पाणी वाट फुटेल तसं शहरात शिरु लागलं. डांबराचे साप प्रवाहात वाहून गेले. मगरीच्या शेपटीच्या फटकार्‌याने पाठीचा मणका मोडावा, तशा प्रवाहाच्या फटकार्‌यांनी कच्ची घरं मोडून पडली. भिंती वाहून गेल्या. पण प्रवाहाला उसंत नव्हती, त्याचं तांडव आता तर कुठे सुरू झालं होतं. साताजन्माच्या भुकेल्या अजगराने दिसेल तो प्राणी गिळंकृत करावा, तसा पाण्याने नदीकाठ गिळंकृत करुन टाकला. पोट फुगलेल्या अजगरासारखी नदी दिसू लागली. तरी पाण्याला उसंत नव्हती. काठावरचे इमले पत्त्याच्या बंगल्यासारखे प्रवाहाच्या आवर्तात कोसळले, होते नव्हते झाले. तरी पाण्याची भूक शमण्याची चिन्हे नव्हती. पाणी शहरात शिरु लागलं. सहस्र हातांनी शहराला आवळू लागलं. नदी कात टाकल्यासारखी दिसू लागली.

युगायुगांच्या क्रोधाची आग ओकत साक्षात कालीनं तांडव करावं, तशी नदी अस्ताव्यस्त पसरली. दिवसभर शहराच्या छाताडावर बेभान तांडव करत फिरली.

…अखेर पात्रातल्या डोहाचा तळ पूर्ववत शांत झाला. भानावर येत असलेल्या नदीने काठावरच्या उदृध्वस्त इमल्यांकडे नजर टाकली. गलितगात्र होवून ते मोडून पडले होते. डांबराचे साप छिन्नविछिन्न झाले होते. अवघं शहर मरणासन्न झालं होतं. एरवी गर्वाने ताठ असलेली शहराची मान मोडून पडली होती…

…नदीचा प्रवाह आता पुन्हा नेहमीच्याच शांत आणि संथपणाने वाहू लागला होता.

- अमोल कपोले


————मृगजळ————

जून 24, 2009

उपेनचा निर्णय झाला होता. ओंकारनाथांचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. “जन्माची ददात मिटेल”. पण त्यासाठी सरूला…..?, उपेनच्या मनात विचार आला.
- मग काय झालं, असाही तिचा काय उपयोग आहे आपल्याला..नशिबाने पैसा मिळण्याची संधी पदरात आणून टाकली आहे, तिचा फायदा न घेण्याचा करंटेपणा कसा करावा. ऒंकारनाथांनी एवढ्या खात्रीने सांगितलंय…

त्याने खिशातून ओंकारनाथांनी लिहून दिलेलं ते चिटोरं काढलं. जीर्णं झालेला तो एक कागद होता. शंभर सव्वाशे वर्षांपुर्वीचा. त्यावरचे बरेच शब्द आता पुसट झाले होते. पण ते वाचण्याची आवश्यकता नव्हती. ऒंकारनाथांनी त्याला सर्व काही समजावून सांगितलं होतं. उपेनने शांतपणे घडी करून तो कागद खिशात ठेवून दिला. तो झपाझप पाऊलं टाकत घराच्या दिशेने चालू लागला. जमल्यास आज रात्रीच त्याला काम उरकून घ्यायचं होतं.
……
सुन्न मनानं सरू समोरच्या भिंतीकडे नजर लावून बसली होती. तिथेच त्या भिंतीच्या पलिकडे त्यांच्या नशिबाची दारं उघडणारी किल्ली दडलेली होती. पण त्या नशिबाकडे नेणारा मार्ग भयंकर होता. भैरप्पाचे शब्द तिच्या मनात घुटमळत होते. “पैसा मिळवण्यासाठी असलं काही करण्याची तिच्या मनाची तयारी नव्हती. तरीही मनात सारखे तेच विचार येत होते. धोका पत्करलाच पाहिजे. तिचं मन तिला सांगत होतं. असंही या दरिद्री
जिण्याला काय अर्थ होता. देणेकयांची देणी चुकवता चुकवता पुरेवाट होत होती. देणेकर्यांना चुकवण्यासाठीच गुपचुप घर बदलून या जुनाट वाड्यात रहायला आलो अन नशिबानं अलगद समोर सोन्यासारखी संधी आणून ठेवली. तिचा लाभ आपण घेतला नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच.
-पण उपेनला किती त्रास होईल, त्याचा विश्वासघात?
तेवढ्यापुरतं त्याला वाटेल, आणि असंही नंतर तो कुठे असणार आहे आपल्याबरोबर. या विचारासरशी तिच्या अंगावर शिरशिरी आली. कसला तरी निर्णय घेत ती लगबगीनं उठली.
आज रात्रीच आपला बेत तडीस न्यायचा, असा निर्णय तिनं घेतला.
……..
उपेन आणि सरूनं वाड्यातली खोली घेतली आणि त्या प्रकाराला सुरूवात झाली. वाडा जुना असला तरी गावाच्या मध्यवर्ती वस्तीत होता. मुख्य म्हणजे भाडं अगदी कमी होतं. बरेच रहिवासी वाडा सोडून गेले होते,
सरू-उपेन धरून तीन कुटुंबं सध्या तिथे वास्तव्यास होती. त्यांची खोली वाड्याच्या एका टोकाला होती.
-पहिल्याच रात्री त्यांना तो अनुभव आला.
त्यांची खोली म्हणजे भाडेकरूंसाठी एका मोठ्या खोलीचं दोन खणी घरात केलेलं रूपांतर होतं. खोलीच्या पुढ्च्या भागातल्या एका बाजूकड्च्या भिंतीमध्ये एक मोठा कोनाडा केलेला होता. त्याची खोल्रीही बर्यापैकी म्हणजे तीन साडेतीन फुट होती आणि उंची साधारणत: अडीच फुट. बारकाईने निरिक्षण केल्यावर असं लक्षात येत असे, की तिथे एक दरवाजा होता. जो कोनाडा काढ्ल्याने कायमचा बंद करण्यात आला होता.
रात्री दीडच्या सुमारास त्या आवाजाने दोघांनाही जाग आली.
खूप खोल ठिकाणाहून यावा अशा पद्धतीचा तो आवाज होता. पण दोघांनाही तो स्पष्टपणे ऐकू आला.
“ए, मला काढ”
भीतीने दोघांच्याही अंगावर सरसरून काटा आला. उपेनने जवळ जाऊन कोनाड्याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.
पलिकडून पुन्हा तेच शब्द उमटले. दर पाच मिनिटांच्या अंतराने ती हाक येत राहिली. बरोबर अडीचला ते शब्द येणं बंद झालं.
त्या रात्री दोघांनाही झोप लागणं शक्यच नव्हतं.
…..
वाड्यात गुप्तधन आहे, ज्योतिषी ऒंकारनाथांनी एका जीर्ण कागदावरचा मजकूर बघत सांगितलं.
काढलं तर सात पिढ्या बसून खातील, पण-
पण काय ?, उपेनने अधीर होवून विचारलं.
जो काढेल त्याला बळी जावं लागेल.
…..
बळी?
होय, सरूकडे भेदकपणे पहात भैरप्पा उत्तरला.
जो स्वत: ते दार फोडेल त्याला जीव गमवावा लागेल, यात काही बदल संभवत नाही. काय करायचं ते
तुम्ही ठरवा, असं म्हणून भैरप्पा निघून गेला.
….
घराकडे निघायला उपेनला साडेदहा वाजून गेले. पण त्याला आता वेळकाळाचं भान राहिलं नव्हतं. आजच्या आज निकाल लावून टाकायच्या इराद्यानं तो झपाटला होता.
“सात पिढया बसून खातील इतकी संपत्ती..” त्याला दुसरं काही दिसेनासं झालं होतं, दुसरं काही ऐकू
येईनासं झालं होतं.
-प्रश्न सरूला कसं तयार करायचं हाच होता.
अर्थात आपण काहीतरी कारण काढून तिला कोनाडा फोडायला सांगितलं तरी ती विरोध करणार नाही याची त्याला खात्री होती.
त्याच्या डोळ्यांत एक क्रूर चमक तरळून गेली. झपाझप पावलं टाकीत तो घराकडे निघाला.
…..
अकराच्या सुमारास उपेन घरापाशी पोहोचला. दार अर्धवट लोटलेलं होतं, त्यातून प्रकाशाची तिरीप बाहेर जमिनीवर पडली होती. सरूशी कसं कसं बोलायचं यावर मुद्दे मनात घोळवत त्याने दरवाजा लोटला. आतलं दृष्य पाहून त्याची नजर थिजली.
जमिनीवर सरूचा निष्प्राण देह पडला होता. तिचं सर्वांग हिरवं निळं पडलं होतं. कुठ्ल्याशा विषारी दंशाने तिचा जीव घेतला होता. बाजुलाच एक चिटोरं पडलेलं त्याला दिसलं. उपेनने ते उचललं. सरूचंच हस्ताक्षर होतं ते.
त्यात लिहिलं होतं,
“उपेन, मी तुला कधीच आवडत नव्हते. ही गोष्ट मला ठाऊक आहे. माझ्याकडून तुला कसलेच सुख देणे झाले नाही. मुलाबाळांचेही नाही. जीव गमाविण्याचे मला काही वाटत नाही. किमान तुझं पुढील आयुष्य सुखात जाईल.”
-सरू.
बरं झालं, सुंठीवाचून खोकला गेला, उपेनच्या मनात विचार आला. उपेनची नजर भिंतीकडे गेली. कोनाडा खोदण्याचा प्रयत्न सरूने केलेला दिसत होता. भिंतितली चौकट फोडलेली होती. आतल्या कुबट हवेचा दर्प खोलीत भरून राहिला होता. उपेनचे डोळे चमकू लागले.
“सात पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती..”
बेभान होवून तो पुढे सरसावला. कोनाड्यात चढून त्याने फोडलेल्या चौकटीवर लाथ मारली. आता आत डोकावण्याइतकी सोय झाली होती. अधीर होवून त्याने आत डोकं घातल. त्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. श्वास जड होवू लागला, खोल खोल पाण्यात आपण गाडले जातोय असं त्याला वाटू लागलं. मदतीसाठी हाक मारण्यासाठी त्याने तोंड उघडलं, पण आवाजच निघेना.
-पुढ्च्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. थोड्याशा झटापटीनंतर सारं कसं शांत शांत झालं.
…..
दुसर्या दिवसाच्या वर्तमानपत्रात बातमी होती,
एका विचित्र घटनेत गावातील जुन्या वाड्यात एका जोडप्याचा मृत्यु झाला. पत्नीचां मृत्यु विषारी दंशाने, तर पतीचा मृत्यु गुदमरल्याने झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच घरात सुमारे एक कोटी रुपये किमतीचं सोनं सापडलं…..

- अमोल कपोले


अनपेक्षित

जून 24, 2009

fog-777806

ताडोबाच्या माळावर यायचंय का ?

या प्रश्नामध्ये दचकण्यासारखं काय आहे ?

पण माझ्या प्रश्नावर रिक्षावाला दचकलाच.

”काही प्रॉब्लेम आहे का ?” मी विचारलं.

”नाय, प्रॉब्लेम तुम्हाला असायला पायजे.”

”म्हणजे ? मी नाही समजलो.”

घोर अज्ञानी माणसाकडे पहावं तशा दयार्द्र नजरेने रिक्षावाल्याने माझ्याकडे पाहिलं.

”माळावरच जायचंय का ?” त्याने विचारलं.

”माळाच्या अलिकडे मुतडक वाडी आहे, तिथेच सोडा.”

”बसा. पंधरा रुपये होतील.”

मी बसलो. रिक्षा धावू लागली. रात्र बरीच चढली होती.

”किती वाजलेत हो ?” मी रिक्षावाल्याला विचारलं.

”साडेअकरा झालेत.” आरशातून मला न्याहाळत रिक्षावाल्याने उत्तर दिलं.

मी बाहेर पाहू लागलो. शहराची सीमा ओलांडल्याने मोकळी वाटत असलेली हवा आता रिक्षावाल्याला झोंबू लागली होती. त्याने गळ्याभोवतीचा रुमाल कानावर ओढला. मला ते वातावरण नेहमीचंच होतं.

”इथं नवीन दिसताय?” अपेक्षित असलेला प्रश्न रिक्षावाल्याने टाकलाच.

”छे. गेले दीड वर्ष इथेच राहतोय.”

”मुतडकवाडीत?”

”हो, तिथं जवळच.”

”असं सांगा की राव.” रिक्षावाल्याच्या आवाजात मघापासून जाणवणारा तणाव आता सैलावल्याचं मला जाणवलं.

”ताडोबाच्या माळावर म्हटल्यावर मी जरा घाबरलोच बगा.”

मी काही बोलणार तेवढ्यात रिक्षा थांबली. वाडीच्या फाट्यावर एकाने हात दिला होता.

”वाडीला जायचंय” किडकिडीत शरीरयष्टीचा, विचित्र चेहऱ्याचा तो मनुष्य म्हणाला.

”बसा. दहा रुपये.”

मुख्य रस्ता सोडून रिक्षा आता शेतातल्या रस्त्यातून पुढे निघाली.

शेजारी बसलेला तो किडकिड्या माझ्याकडे पाहून दात विचकून हसला. मी मान वळवून बाहेर नजर टाकली.

अंधारात रस्त्याच्या कडेला असलेली झाडं चित्रविचित्र आकार धारण करत होती. मधुनच कोठेतरी शेतातल्या झोपडीत असलेल्या दिव्याचा प्रकाशमान ठिपका खुणावून अदृश्य होत होता. उन्हाळ्याच्या सुरुवातीचे दिवस आणि चांदणी रात्र असल्याने भोवतालची झाडं-झुडपं करड्या रंगात बुडवल्यासारखी दिसत होती. निःस्तब्ध शांततेत निर्मनुष्य रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षाच्या इंजिनाची घरघर वातावरणात भरून राहिली होती.

इतक्यात ते घडलं…….

काय घडतंय ते कळायला मला काही मिनिट लागले. नक्की कशामुळे कळेना, पण रिक्षावाल्याने करकचून ब्रेक दाबला आणि रिक्षा थांबली. तसा मी एकदम भानावर आलो.

”काय झालं, रिक्षा का थांबवली ?” मी प्रश्न केला.

रिक्षावाल्याने काही उत्तर दिलं नाही. मागे न वळताच तो भेदरलेल्या स्वरात म्हणाला, ”तो पासिंजर कुठं गेला?”

”कोण ?” मी विचारलं आणि माझ्या एकदम लक्षात आलं, फाट्यावर एक किडकिड्या मनुष्य रिक्षात

बसला होता. विचारांच्या नादात त्याचं अस्तित्वच मी विसरून गेलो होतो.

“हा काय माझ्या शेजारी” मी शेजारी नजर टाकत म्हणालो.

शेजारी कुणीच नव्हतं.

हा कुठं गेला ते पाहण्यासाठी उतरण्याच्या उद्देशाने मी बाहेर पाय टाकणार, इतक्यात रिक्षावाला ओरडला,

“सायेब, उतरू नका..”

“अरे पण तो कुठं गेला ते तर पाहायला हवं की नको”

“काय नको, तो पोहोचला बरोबर पाहिजे तिथं.”

“अरे, पण तूच तर म्हणालास ना, तो कुठे गेला म्हणून? मग हा काय प्रकार आहे ?”

असं म्हणून मी उतरलो आणि पाठीमागे नजर टाकली.

रस्त्यावर कुणाचा मागमूस नव्हता.

मी काही बोलणार तेवढ्यात रिक्षावाल्याने रिक्षा सुरु केली आणि तो ओरडतच म्हणाला, “पट्कन रिक्षात बसा, नाहीतर काय खरं नाही.”

मी रिक्षात बसलो. जिवाच्या आकांताने त्याने रिक्षा हाणली. मी काही विचारण्याचीही वाट न पाहता तो बोलू लागला.

“सायेब. वाचलो आपण. गडी रिक्षात बसला तेव्हाच मला डाऊट आला होता. ते रूपसिंग पाटलाचं भूत होतं”

“कशावरून ?” मी विचारलं.

“कशावरून म्हणजे काय, चालत्या रिक्षातून असा माणूस एकदम कसा नाहिसा होईल”

“ते भूत होतं हे तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण रूपसिंग पाटलाचं नव्हतं. रूपसिंग पाटील देखणा माणूस होता”

“द्येखन्या माणसांची भूतं कुरूप, किडकिडित नसतात कशावरून”

“नसतातच रे”

“तुमी बगितलंय का रूपसिंग पाटलाचं भूत?”

“तू तरी बघितलंयस का ?”

“त्याचं भूत बगितलं नसलं तरी त्याला मी एकदा ओझरता पाहिला होता जिवंतपणी, त्याच्या बरं का – द्येखना गडी, सहा फुट उंची, भरदार शरीर, राजबिंडं रूप हो”

“त्याचा अन ह्याचा काही ताळमेळ लागतोय का मग”

“नाय बा, पण मग हा गडी कोण होता?”

“बाप्पा मुरारी, त्याचा दोस्त. हूल देण्यात वस्ताद.”

“मायला, तुम्हाला बरीच माहिती दिसतेय त्याची. आपल्याला बरं काय केलं नाही त्याने.”

“तो काही करत नाही, त्याचं काम एवढंच”

“म्हण्जे?”

मी काही बोललो नाही.

रिक्षा मुतडकवाडीत शिरून माळाच्या दिशेने धावू लागली.

“तुम्हाला कुठे सोडू ?”

“ती टोकाची विहिर आहे ना, तिथे सोड, पुढे मी जाईन”

“एकटं जायला भीती नाय वाटत का?”

“मला सवय आहे”

वाडी संपून माळाचा रस्ता सुरू होतो, तिथेच ती विहिर होती. म्हटली तर वाडीजवळ, म्हटली तर लांब.

विहिर जवळ येऊ लागली, तसं मला बदल जाणवू लागला. एक हूरहूर मनात दाटायला लागली. बाहू

फुरफुरायला लागले, हात शिवशिवायला लागले. साताजन्माची भूक पोटात आगडोंब उसळवू लागली.

“इथं थांबव”

मंत्रावल्यासारखं रिक्षावाल्याने ब्रेक दाबून जागीच रिक्षा थांबवली.

उतरता उतरताच माझ्या इच्छा अनावर झाल्या.

——————————

रिक्षा थांबवून रिक्षावाल्यानं बाहेर पाहिलं.

पासिंजर खिशातून पैसे काढण्याच्या बेतात असताना त्याने नीट न्याहाळून पाहिलं.

सहा फुट उंची, देखणं रूप, भरदार शरीरयष्टी, आणि या देखणेपणाला न शोभणारं क्रूर हसू ओकणारे डोळे.

पुढ्च्याच क्षणी त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

- पण आता फार उशीर झाला होता.

- अमोल कपोले