रिबिन

“तुमची टेस्ट सुरु होतेय आत्ता,” टीचरने जाहीर केलं.
“मी आता जो शब्द सांगेन, तो तुम्ही वहीत लिहायचा. एका खाली एक शब्द लिहा. दोन शब्दांच्या मध्ये एक ओळ सोडा.
मी एक शब्द दोनदाच सांगणार आहे हं”
पहिल्या बाकावर बसलेल्या अमितकडे पाहून टीचर म्हणाली.

“पहिला शब्द आहे, Physics”

रजनीने आपल्या पेपरवर अक्षरं काढली – Fysics.

“पुढचा शब्द आहे, Biology”
रजनीनं लिहिलं – Biology.

अशा प्रकारे केमिस्ट्री, हिस्टरी, सोशल, इंडिपेंडंस, असे शब्द सांगत टीचरने यादी पुरी करत आणली.

“शेवटचा शब्द आहे, Pneumonia…Pneumonia.”

रजनीने आपल्या वहीत Neumonia असं लिहिलं तेव्हा तिच्या पेन्सिलचं टोक जवळजवळ मोडलंच.
तिला Neumonia चं स्पेलिंग अंधुक आठवत होतं, आणि आपण लिहिलेलं स्पेलिंग बरोबर आहे अशी तिला खात्री होती.

पाच मिनिटांनी बेल वाजली. तिने पेन्सिल आणि तुटलेलं शिशाचं टोक कंपासमध्ये कोंबलं. मूळचं लाल रंगाचं कंपास ठिकठिकाणी पेन्सिलचं शिसं लागून राखाडी बनलं होतं.
रजनीनं बॅग खांद्यावर टाकली, दुसर्या हातात लंच बॉक्स घेतला आणि ती गेटच्या दिशेनं चालू लागली.
गेटजवळ उभ्या रिक्षावाल्यानं तिच्याकडून ते घेवून रिक्षाच्या रिअर-व्ह्यू मिररच्या हँडलला अडकवलं. हँडलला आधीच लोंबकळणारृया लंच बॉक्सेसच्या गर्दीत रजनीचं लंच बॉक्स जावून विसावलं.

रिक्षावाल्याच्या पाठीमागचं रेलिंग पकडून रजनी रिक्षात चढली. तिच्या मैत्रिणींचा रिबिनी एक्स्चेंज कार्यक्रम रंगात आला होता. रजनीकडे आज बदलायला रिबीनच नव्हती. त्या दिवशी हट्टानं घेतलेला हेअर बँड तिने लावला होता, जो आता तिला मुळ्ळीच आवडत नव्हता. तिला आता पुन्हा रिबिनी हव्या होत्या. तिच्या मैत्रिणी आता एक्सचेंज करत होत्या तशा.
स्वत:शीच फुरंगटून ती कोणीशीच न बोलता शांत बसून राहिली.
घर आलं तशी तिनं झपाट्याने लंच बॉक्स घेतली आणि घराच्या दिशेनं धूम ठोकली.
तिचं घर पहिल्या मजल्यावर होतं.
सनराईज अपार्टमेंट त्या भागात नुकतंच बांधलं होतं. त्याच्या समोरच एक झोपडपट्टी होती.
मोलकरणीनं दरवाजा उघडून रजनीला आत घेतलं, तिचे मोजे काढले, आणि रजनीला बोर्नव्हिटा घातलेलं दूध प्यायला दिलं.
रजनीची आई बाल्कनीत तांदूळ निवडत बसली होती.
रजनीने स्कूल बॅग फेकली. तिचा आवडता ब्लॅक फ्रॉक घातला. तिला आता झोपडपट्टीच्या तोंडाशी असलेल्या दुकानातून रिबिनी आणायच्या होत्या.

मोलकरणीची मुलगी श्रृती रजनीची बेस्ट फ्रेंड. ती आपल्या वडिलांबरोबर जवळच्या धोबी घाटावर काम करायची.

दूधाचा ग्लास अर्धा ठेवून रजनीने धोबी घाटाच्या दिशेने धूम ठोकली.

तिच्या खिशात एक रुपया होता. या एक रुपयाची रिबीन श्रृती आपल्याला घेवून देईल अशी तिला खात्री होती. रजनी धोबीघाटावर पोहोचली तेव्हा एक मोठा टँकर तिथल्या हौदात पाणी ओतत होता. श्रृती ते दृश्य पाहत जवळ उभी होती.
पाण्याचे तुषार आसमंतात उडून धुकं धुकं झालं होतं. रजनीला ते दृश्‍य एकदम आवडलं. ती खुषीत श्रृतीच्या शेजारी जाउन उभी राहिली.
“मला रिबिनी घ्यायच्यात” ती श्रृतीला उद्देशून म्हणाली.
टँकरचं इंजिन आणि पाणी ओतल्याच्या आवाजात रजनीचा आवाज विरून गेला.
“मला काही ऐकू येत नाहीये” श्रृती म्हणाली.
रजनीने हाताची मूठ उघडली. त्यात रुपयाचं नाणं चमकत होतं.
श्रृतीला रिबीनीत रस नव्हता, तिचं सगळं लक्ष नुकत्याच भरलेल्या हौदाकडे होतं.
२० फुट लांबी आणि २ फुट उंची असलेला पाण्याने भरलेला हौद. त्यात मनसोक्त पोहायची तिची इच्छा होती.
श्रृतीने हौदात उडी घेतली. रजनीलाही हाक मारली. रजनीलाही जावंसं वाटलं, पण एक अडचण होती.
तिने तिचा आवडता फ्रॉक घातला होता, तो खराब झाला असता.
तिने पाण्यात पाय बुडवून हौदाच्या कठड्यावर बसणं पसंत केलं. श्रृती हौदाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मनसोक्त पोहू लागली.
अर्धा तास असं पोहल्यानंतर श्रृती हौदाच्या बाहेर आली. थंडीने अंग कुडकुडत होतं आणि ती मोठमोठ्याने हसत होती. संध्याकाळचे ७ वाजले होते. घरी जायची वेळ झाली.
पण, रजनीला रिबिनी घ्यायच्या होत्या. रिक्षातलं दृश्‍य तिच्या डोळ्यांसमोरुन हलायला तयार नव्हतं. तिला उद्या मैत्रिणींसोबत रिबीनींची अदलाबदल करायचीच होती.
रजनीने श्रृतीला आपल्याबरोबर रिबिन घ्यायला चलायचा आग्रह केला. दोघी दुकानात पोहोचल्या तेव्हा दुकानात चार-पाच गिर्हाईकं होती. रिबिन निवडण्यात रजनीने पाच मिनिट घालवले. दुकानदाराला पैसे देवून कुडकुडतच श्रृतीने रिबिन रजनीला दिली आणि दोघी आपापल्या घरी गेल्या.

घरी पोहोचताच श्रृतीने कपडे बदलले आणि जुनं ब्लँकेट पांघरून झोपून घेतलं.

दुसर्या दिवशी सकाळी रजनीची आई रजनीच्या केसांना नवी रिबिन बांधत होती तोच खालून वॉचमननं ओरडून सांगितलं की आज श्रृतीची आई कामाला येणार नाही.

“का येणार नाही?” रजनीच्या आईने ओरडून विचारलं.
“तिच्या मुलीला न्यूमोनिया झालाय” वॉचमननं सांगितलं.
“न्यूमोनिया? – “

रजनीने हळूच डोक्याच्या रिबीनीला स्पर्श केला. तिने स्कुल बॅग उचलली आणि रिक्षावाल्याची वाट पाहत ती खाली जावून थांबली तेव्हा तिच्या डोक्यात न्यूमोनियाचं स्पेलिंग घुमत होतं.

आपलं स्पेलिंग अचूक आहे, याची तिला खात्री होती.

(समाप्त)
(धीमांत पारेख यांच्या “न्यूमोनिया” या लघुकथेचे भाषांतर)

मधुर भागवतने गाडी घेतल्यानंतरची गोष्ट

तर मधुर भागवतने गाडी घेतल्यानंतर आठेक दिवसांतच बातमी आली.
मंत्र्यांच्या डेअरीतच दूधात भेसळ, मंत्र्यांचे आशिर्वाद वगैरे.
चौकशीचे आदेश दिले गेले. आम्हाला माहिती होतं, यातून निष्पन्न काही होत नाही. मंत्रीमहोदयांच्या विरोधकांनी काढलेलं खुसपट आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या, की विषय आपोआपच वृत्तपत्रांतून नाहिसा होईल.
तसं झालंही. पंधरा एक दिवसांत चौकशीचा, तपासणीचा फार्स होवून सगळा मॅटर सेटल झाला. बातम्या गायब झाल्या. लोक विसरुन गेले. आम्हीही विसरुन गेलो.
पण मधुर भागवतला मात्र आता आठवली – सद्सद्‍विवेकबुद्धी!
एक दिवस तिरीमिरीत माझ्याकडे येवून म्हणाला,
अप्पा, मला आता सहन होत नाही राव. मी हे सगळं पुन्हा उघडकीला आणतो.
मला वाटलं, तात्पुरता वैताग आहे. त्याला शांत केलं आणि असलं काही करु नकोस म्हणून समजावलं.
पुन्हा आठ दिवसांनी येवून म्हणतोच-
अप्पा, मला काही गप्प बसवत नाही, मी हे सगळं उजेडात आणतोच. पुराव्यासकट.
मी पुन्हा त्याला शांत करुन परत पाठवलं.
त्या दिवशी मात्र तो सगळं ठरवूनच आला.
अप्पा मी उद्या प्रेस कॉन्फरन्स बोलावलीय. त्यात मी सगळं पेपर्ससकट उघड करणार.
मी म्हटलं, जरा बस, निवांत बोलू.
मी विचारलं, लेका इथे नोकरीला लागून तुला अडीच वर्षे झाली. महिनाभरात तुला कारभाराची कल्पना आली होती. मग आताच सगळा प्रकार उघड करावासा का वाटतोय तुला?
तर म्हणाला, तेव्हा मी इनसिक्युअर होतो. मला अनुभव नव्हता. नोकरीची गरज होती.
मग आज नाहीये?
आहे ना, पण आता इथल्या अनुभवावर मला बाहेर आता दोन ठिकाणी ऑफर्स आहेत.
अच्छा, म्हणून जाता जाता पाचर मारुन जाणार आहेस का?
अप्पा, तसं नाही. पण हे कुठेतरी थांबावं असं वाटतंय.
हम्म. ते थांबवणारा तू कोण? तू पण त्यातच गुंतलास ना?
पण आता बाहेर पडावंसं वाटतंय.
पोट भरल्यावर असं वाटणं सोपं आहे रे. उपाशी पोटी स्वाभिमानाने लाचारीचा घास नाकारणं वेगळं आणि पोट भरलेलं असताना नाकारणं वेगळं.
यावर तो निरुत्तर झाला.
मी पुढे म्हणालो,
आणि तुला काय वाटलं. तू जाशीत तिथे काय हे प्रकार होत नसतील. अगदी असंच नाही तरी दुसरे अपप्रकार चालतातच सगळीकडे. काय काय सोडणार आहेस तू? की तिथेही आपला एक्सपिरिअन्स वाढवून सीव्ही वजनदार झाला, की मग नोकरी सोडणार?
यावर तो काही उत्तर देवू शकला नाही.
खांदे पाडून निघून गेला.

या गोष्टीला आज वर्ष झालं.
मधुर भागवतचं चांगलं चाललंय. नुकतीच त्यानं गाडी बदलून नवी एसयुव्ही घेतली.
डेअरीचंही चांगलं चाललंय.
लोक भेसळीचं विसरलेत.
डेअरी भेसळ न करायचं विसरलीये.
मधुर भागवत पत्रकार परिषदेचं विसरलाय.

- मी मात्र रोज रात्री झोपेची गोळी घ्यायचं अजिबात विसरु शकत नाही!

(समाप्त)

(हा भाग टाकायला फार म्हणजे फारच विलंब झाला, त्याबद्दल वाचकांचे क्षमस्व!)

© 2009, Amol Kapole, All rights reserved.

सुपारी

तर भाईनं पहिली मीटिंग घेतली शूटर शंभूसोबत.
भाईचे सगळे व्यवहार तसे रोखठोक.
स्पष्ट. अगदी एखाद्याचा गेम वाजवायचा असला, तरी त्याला सांगून सवरुन.
त्यामुळे मीटिंगमध्येही त्यानं शंभूला सांगितलं,
“शंभ्या, लेका हा असा प्रॉब्लेम आहे.”
“जागा एक और आदमी तीन.”
“भौत बडी नाइन्साफी है.”
“आता यातून बाहेर पडायचा मार्ग एकच आहे. काय?”
“अन तो कोन्चा भाई?”
शुटर शंभूनं आज्ञाधारकपणे विचारलं.
तर भाई म्हणाला,
“हे बघ शंभ्या, आपल्या धंद्याचा उसूल एकदम सीधा हाये.”
“ते म्हण्तात ना, जो जीता वही शिकंदर”
“तर आता त्याच उसुलप्रमाने आपल्याला तुमच्या तिघातला शिकंदर निवडायचा आहे.
समजलास?”
“होय भाई.”
“मग आता निघ आणि उद्याच्याला रात्री अकरा वाजता समुद्रकाठच्या गुदामात तयार रहा मुकाबल्याला.
तिथं तुमच्या तिघांत मुकाबला होईल.
आन मग जो जिता वो शिकंदर.”
भाई विषयीच्या आदराने शूटर शंभूचे डोळे भरून आले. त्याला अगदी भडभडूनच आलं हो.
भाईच खरा न्यायी, असं वाटलं त्याला. देशाचा पीएम होन्याची लायकी या मान्साची आसं पन तेवढृयापुरतं वाटलं त्याला.
भाईच्या पाया पडून तो गेला.
………………………………..
आता सुरेबाज सुरेशसोबतची मीटिंग.
तर भाई पुन्यांदा एकदा रोखठोक.
त्यानं सुरेशसोबतही जो जीता वोही शिकंदरचा एक शो केला.
त्याला बी उद्या रात्री अकराला समुद्राकाठच्या गुदामात बोलावला.
सुरेबाज सुरेशलाही वाटलं, भाई भारताचाच काय, अमेरिकेचाबी पीयेम बनायला पायजे.
भाईच्या पाया पडून तो पन चालता झाला.
………………………………….
आता मीटिंग सवाई भाईसोबत.
हा… चुकलात.
भाई इथं बी रोखठोक.
म्हणाला, “लेका, आयुष्यात आपन याच उसुलावर वागलो की जो जीता वोही शिकंदर. तवा तुला उद्याच्या गेम शो मध्ये एकतर शिकंदर व्हावं लागंन
न्हायतर जागेवर पानी सोडावं लागंन.
माज्या परीनं मी न्याय केलेला हाये, आता स्वताची पात्रता शिद्द करा.
आन या आता.”
सवाई भाईनं मान डोलावली, आन तो बी भाईच्या पायाला स्पर्श करुन चालता झाला.
तर आता समुद्रकाठचं गुदाम.
रात्री अकरा वाजता. गेम शो.
कौन बनेगा तिकिटपती?
……………………………….
समुद्राकाठचं गुदाम म्हणजे भाईचा पुराणा अड्डा.
म्हण्जे दिवार मधल्या अभिका बच्चनचा (हा खास भाईचा शब्द) कित्ता गिरवत भाई भाई झाला तेवापासुनचा.
भाईने आपले कारकिर्दितले सगळे महत्वाचे टप्पे हितंच साजरे केले.
भाईची फेवरेट प्लेस म्हणा हवं तर.
त्यामुळे आजच्या गुंत्याचा निकालबी हितंच लागनार हे ठरलेलंच.
खरं तर ठरलेलं काय असतं म्हना.
तो सर्वांच्या वर कोन बसलेला असतो, तो आधीच ठरवतो आन त्याला पायजे ते घडवून आन्तो.
त्यामुळं भाई तसा निश्चिंत.
आपन काय काळजी करायची, जे होईल ते होईल, असं तो मनाशी म्हणाला.
तर अकरा वाजून एक मिनिटांनी गुदामात पहिली एंट्री झाली, ती शूटर शंभूची.
बघतो तर सगळा अंधार.
पण गुदामाचा कोपरा न कोपरा माहित असल्यानं तो सराईत पावलं टाकीत पुढं चालला.
सूं…… धप्प.
अंधारातून विजेच्या वेगानं सुरा आला आन त्यानं शंभूच्या नरड्याचा वेध घेतला.
काम तमाम.
शंभूला ओरडायची पन संधी मिळाली नाय.

अकरा वाजून दोन मिनिटं.
धापा टाकीत सुरेबाज सुरेश गुदामात शिरला.
मिटृट काळोख.
पण चप्पा चप्पा माहीत असलेला सुरेश सावधपणे पुढे सरकला.
सूं…… धप्प.
एकच गोळी. वर्मी घाव. काम तमाम.

भाईनं दुसर्या दिवशी सकाळी साडेनवाला तातडीची मिटिंग बोलावली.
“हे बगा दोस्तांनो, आपल्या गँगेतले दोन खंदे मोहरे काल रातच्याला तिकिटाच्या लढाईत जीव गमावून बसले.
दोगांनाबी तिकिट हवं होतं, आन आम्ही दोघांनाबी सामोपचारानं, चर्चा करून तोडगा काडू असं सांगितलं होतं.
पन तिकिटाच्या मोहापायी भलती स्पर्धा करायला गेले आन दोगंबी एकमेकाला मारुन बसले.
आता प्रश्न असा आहे, की तिकिट कोनाला द्यायचं.
तर माला वाटतं की आता दोगंबी योग्य उमेदवारच उरले नसल्याने तिकिट सवाई भाईला देण्यात काय अडचण नसावी. काय?”
सर्वांनी माना डोलावल्या.
भाईला समाधान वाटलं.
वर बसलेल्यानं योग्य निकाल लावला होता.

“शाबास पोरा, घरान्याची इज्जत राखलीस.”
“ते तर मी जमवनारच होतो भाई.”
“सगळं व्यवस्थित करतो का नाय असं टेन्शन होतं.”
“छृया, येकदम सिंपल झालं, तुमी म्हटले, जो जीता वोही शिकंदर, पन कैसे जीता हे थोडीच विचारलं. म्हनलं कसा बी जिंकला तरी जो जिता वोही शिकंदर.
मग काय, पावनेअकरालाच गुदामाच्या माळृयावर जाउन बसलो.
इकडच्या दारानं शंभू आला, त्याला टिपला आन तिकडच्या दारानं सुरेश आला त्याला उडवला.
दोघांकडनं पिस्तुलगिरी आणि सुरेबाजी शिकलो त्याची गुरुदक्षिना देउन टाकली.
पन ती वरची जागा लय सोयीची ठरली.
त्यामुळंच तर ठरवलं तसं घडवता आलं.”
“पोरा, वरची जागा सोयीची असते म्हनूनच तर कायबी अन कवाबी आपल्या मनासारखं घडवता येतं, हे आता तुझ्या डोक्यात घुसलं ते बरं झालं.
तेवा वरच्या जागेवरच लक्ष आसू दे.”

“शेवटी आपल्या हातात काय आहे, वर बसलेला ठरवेल तसं होतं, काय समजलास?”

(समाप्त)

दृष्‍टांत (अखेर)

(देवळाची पायरी कधीही न चढणाऱ्या आपल्या नवऱ्याला आज नेहमीपेक्षा जास्त चढलेली आहे, असं समजून त्यांचं बोलणं फारसं मनावर न घेता सुभद्राबाईंनी तो विषय तेथेच संपवला.

रामरावांना मात्र त्या रात्री झोप आलीच नाही.)

दुसऱ्या दिवशी रामरावांची सकाळ भराभरा फोन फिरवण्यात गेली.
दुपारी जेवणानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मिटिंगा चालू होत्या. तलाठी, आर्किटेक्ट, प्लॅनर, इंजिनिअर.. चर्चा झडू लागल्या. रामरावांना आता झोपायची उसंत मिळेना. डोक्यात आलेली योजना प्रत्यक्षात येईपर्यंत आता ते थांबणार नव्हते. नदीकाठच्या दोन एकरांच्या तुकड्यावर संग्रामरांवांच्या नव्या बिझनेसची उभारणी सुरु झाली आणि सात-आठ महिन्यांतच काम पूर्णही झालं. दरम्यानच्या काळात रामरावांना झालेल्या आयतेश्वराच्या दृष्टांताची बातमी कर्णोपकर्णी होत गावभर, नव्हे तालुकाभर पसरली होती.
रामरावांना म्हणे आयतेश्वराचा दृष्टांत झाला, खरं का?
खरं का म्हणजे काय गड्या, नदीकाठी काम बी सुरु झालंय म्हणे.
अशा चर्चाही झडू लागल्या. अधूनमधून रामरावांच्या कानावरही पडू लागल्या.
सारं काही नियोजनानुसार होतंय हे पाहून रामराव मिशीतल्या मिशीत हसले.
अखेर तो दिवस उजाडला.
नदीकाठी आज सरकारी, निमसरकारी, राजकीय, सामाजिक वाहनांची मांदियाळीच दाटली.
त्यासोबत तालुक्यातले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि रामरावांची भावकीही.
नाही म्हटलं, तरी किमान पाच हजारांचा लवाजमा पाहून रामराव सुखावले. पेपरातल्या जाहिरातींनी काम चोख बजावलं होतं म्हणायचं.
परिसराला जत्रेचं स्वरुप आलं होतं. नदीकाठचा प्रसन्न परिसर मंत्रपठणाने दुमदुमून गेला. घंटानाद चहुदिशांना भरुन राहिला. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रथम वास्तुचं उद्‌घाटन करण्यात आलं.
आज लोकांनी प्रथमच त्या वास्तूत प्रवेश केला.
एकदम डिट्टो
प्रतिरुपच हो
काय बी फरक नाही बघा
अशा प्रतिक्रिया प्रत्येकाच्या तोंडातून उमटू लागल्या.
..आणि गाभाऱ्यातली मूर्ती पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली.
हुबेहूब आयतेश्वर.
देवा, तुझी लीला अगाध आहे. प्रत्येकजण भारावून गेला.
पालकमंत्र्यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सभामंडपातल्या विश्वस्त मंडळाच्या बोर्डचंही अनावरण त्यांच्याच शुभहस्ते करण्यात आलं. अखेर प्रति-आयतेश्वराच्या उभारणीत प्रकल्पाला मंजुरीपासून आर्थिक अनुदान देण्याचं पुण्यकर्म त्यांच्याच आशीवार्दाने झालं होतं.
भारावलेल्या या वातावरणात सुभद्राबाईंच्या आनंदाला पारावार नव्हता.
आयतेश्वरानं त्यांची प्रार्थना ऐकली होती. संग्रामरावांनी नवी जबाबदारी स्वीकारण्याचं कबूल केलं होतं.
हाताला मळ नाही, पायाला मळ नाही. सगळं काही आयतेश्वर घडवून आणेल, हे आश्वासन आणि रामरावांचं नियोजन त्यांच्यासाठी पुरेसं होतं.
त्यामुळेच विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर संग्रामरावांचं नाव मोठ्या दिमाखात झळकत होतं.
गावभर रामरावांच्या देवभक्तीची आणि दृष्टांताची चर्चा होती.
प्रति आयतेश्वराची प्रसिद्धी आता दिवस रात्र वाढणारच होती.
भक्तांचा ओघ आणि त्यासोबत ओघानेच येणारी समृद्घीही.
सर्वांचीच इच्छा सफल झाली होती.

मेंढरांना नवा कळप मिळाला होता
आणि
गुरांना नवं कुरण.

प्रति-आयतेश्वराच्या गाभाऱ्यातला दिवा मात्र तेवढ्याच निर्मळपणे आणि तेजस्वीपणाने तेवत होता.

(समाप्त)

- अमोल

दृष्टांत (भाग२)

(…पण अनेकांना व्यावहारिक सल्ले देण्याची कला त्याच्याकडे होती, आणि त्या सल्ल्यांमुळे बऱ्याच जणांचा फायदाही झाला होता. रामरावांनाही. त्यामुळेच आज त्यांचे पाय पुन्हा गणा मास्तरकडे वळले होते.)

“यावं, यावं फुडारी. आज एकदम हिकडं कसं?”
किल्लीच्या टोकानं कान कोरत गणा मास्तरनं रामरावांचं स्वागत केलं. गाडीत बसण्याच्या बेतात असलेला गणा मास्तर रामरावांना येताना बघून थांबला होता.
“काय मास्तर, दौऱ्यावर का?” रामरावांनी प्रतिप्रश्न केला.
“आयतेश्वराला चाललो होतो. गुरुवारचा नेम आहे आमचा. देवधर्मावर तुमची श्रद्धा नाही ते ठाउक आहे, पण तरी विचारतो, येताय का?”
नको, असं रामरावांच्या अगदी जिभेवर आलं होतं. ते निकरानं टाळत त्यांनी प्रतिप्रश्न केला.
“म्हंजे तुम्हाला परतायला रात होणार?”
“नउ तरी वाजतीलच बघा”
“अस्सं..” कानाची पाळी खाजवत रामराव बोलले, “मग चला तर.. आम्ही बी येतो. बघु तरी तुमचा आयतेश्वर काय म्हणतोय.”
गाडी रस्त्याला लागली तशी रामरावांनी मुद्यालाच हात घातला.
“मास्तर, ह्या संग्रामरावांनी पार वैताग आणलाय बघा आम्हाला. कशी ह्याची गाडी रुळाला लागनार काही कळंना झालंय बघा.”
“पुढारी, तुम्ही आयतेश्वराला यायला तयार झालात तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. संग्रामरावांचं प्रकरण दिसतंय.”
“काय सांगू मास्तर. आपलेच दात आन आपलेच ओठ. पोरगं तिशीला टेकल आता. पन अजून हात पाय हलवायची इच्छा नाही. आमची पुण्याई किती दिवस पुरणार?”
“बरोबर आहे पुढारी. तुम्ही त्याचं लग्न का लावून देत नाही? अंगावर जबाबदारी पडली, की लागेल लायनीला.”
“लगीन काय, मी उद्या बी लावून देईन हो. पोरींचे बाप डोळा ठेवून आहेत आमच्यावर. पण लग्नानंतरही याने काय केलं नाही, तर आमची अब्रू ती काय ऱ्हायली मास्तर.”
गणा मास्तरनं एक नि:श्वास सोडला.
“तुमच्या या समश्येवर आमच्याकडं बी काय उपाय नाही बघा पुढारी. आता काय गाऱ्हाणं मांडायचं ते आयतेश्वरापुढंच मांडा. तुम्हाला आवडणार नाही, पण माझं ऐका. ही वारी फुकट जाणार नाही.”
रामराव काहीच बोलले नाहीत. पोराच्या नाकर्तेपणाला आयतेश्वर काय करणार, असा प्रश्न त्यांच्या मनात आला.
तेवढ्यात आयतेश्वर आलंच.
गर्दीमुळे गाडी अलिकडेच पार्क करून मास्तर आणि रामराव मंदिराच्या दिशेनं निघाले.
निरिच्छेनंच दर्शनाला चाललेले रामराव आजूबाजूचं निरीक्षण करत चालले. पूजा-सामानाची, फुला-माळांची, आयतेश्वराचं लॉकेट, फोटो, अंगठी, चेन, शो-पीस, कॅसेट, सीडी अशा चीजवस्तूंच्या दुकानांची रांग दुतर्फा लागली होती. दोन-चार दुकानांत आयतेश्वराची कोणी “लोकल सुरेश वाडकरनं” गायलेली गाणी ढणाणा वाजत होती. चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर आयतेश्वराची गाणी.. सारं काही आयतेश्वरमय होतं. गुरुवार असल्याने मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. दर्शनाच्या रांगेत उभं असताना रामराव सारं काही टिपत होते.
साधा अभिषेक – 501 रु.
साग्रसंगीत अभिषेक – 1001 रु.
साद्यंत साग्रसंगीत अभिषेक – 5001 रु.
असा बोर्ड वाचून त्यांची करमणूक झाली.
आयतेश्वराची मूर्ती पाहून मात्र त्यांचा सगळा वैताग, शीणवटा पार पळून गेला. त्यांना प्रसन्न वाटू लागलं. मूर्तीपुढे नतमस्तक होवून परतताना कोपऱ्यात ठेवलेली भली मोठी दानपेटी त्यांच्या नजरेतून सुटली नाही.

रामराव घरी परतले ते एकदम खुशीत. रात्रीचं जेवण घेताना त्यांनी सुभद्राबाईंना पुन्हा-पुन्हा “संग्रामची गाडी आता कशी रुळाला लावतो पहाच”,असं सांगितलं.
“कशी ?” असं विचारल्यावर मात्र त्यांनी काही उत्तर दिलं नाही.
“मला दृष्टांत झालाय,” एवढंच ते उत्तरले.
देवळाची पायरी कधीही न चढणाऱ्या आपल्या नवऱ्याला आज नेहमीपेक्षा जास्त चढलेली आहे, असं समजून त्यांचं बोलणं फारसं मनावर न घेता सुभद्राबाईंनी तो विषय तेथेच संपवला.

रामरावांना मात्र त्या रात्री झोप आलीच नाही.

(क्रमश:)

अतिथी देवो भव

समानशीले व्यसनेषु सख्यम्

नम्र आवाहन!

या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.
Marathi Mandali!

ईमेलद्वारे नवीन पोस्टस मिळवा.

Join 7 other followers

Follow

Get every new post delivered to your Inbox.