तर हल्लीची ही जनरेशन.
प्रचंड कॉन्फिडन्ट आहे हो.
आणि क्लिअरही.
आपल्याला नेमकं काय हवंय, काय नको बरोबर माहिती आहे यांना.
जे काय असेल ते रोखठोक.
रोखठोक माणसाशी आपलं जमतंच. प्रश्नच नाही.
त्यामुळेच संध्याकाळी बसू या म्हणताच पठ्ठ्या आढेवेढे न घेता तयार झाला.
आणि विषय काढण्याआधीच बोलायलाही लागला.
“सर मला माहिती आहे, तुम्ही मला काय सांगणार आहात ते. आपल्या डेअरीतल्या दुधात राजरोस भेसळ चालते आणि त्याकडे डोळेझाक करण्याचे वरुन आदेश आहेत”
वा रे पठ्ठ्या.
मान गये.
म्हटलं बरं झालं, समजावण्याची गरज नाही. धमकावण्याची नाही की घाबरवण्याचीही नाही. मोकळं वाटलं एकदम.
म्हणालो, “लेका, स्वत:हून पॉइंटावर आलास ते बरं केलंस, आपला दोघांचाही वेळ वाचवला आणि श्रमही”
तर विचारलंच त्याने, “आप्पा, तुम्हाला भीती नाही वाटत का? पकडलं जाण्याची”
म्हटलं, कोण पकडणार? इथं पकडणारेच सोडवायला बसलेत. सारं काही त्यांच्या संमतीनेच तर होतंय. मग कुणी कुणाला पकडण्याचा प्रश्न येतोच कुठे.
डेअरी कुणाची आहे माहिती आहे ना?
तर म्हणाला ते तर सार्या जगाला माहिती आहे.
तर त्याला म्हटलं, आता धृतराष्ट्रासारखी डोळृयाला पट्टी बांध. आणि हा संजय जे सांगतो तेच खरं समज. दोन वर्षांत गाडी घेतोस की नाही बघ.
त्यावर फक्त्त हसला.
म्हटलं इंजिनिअरिंगसाठी किती पैसा खर्च केलास रे, सात-आठ लाख ओतले असतील कमीत-कमी. तो वसूल व्हायला नको का?
करु, करु असं म्हणाला.
आज दोन वर्ष झाली त्या गोष्टीला.
पठ्ठ्या धृतराष्ट्राचाही बाप निघाला.
दोन वर्षांत गाडी घेतलीच.
मी म्हटलंच होतं सुरुवातीला, हा पोरगा पुढे जाणार.
त्या दिवसापासून पुढे त्याने ना कोणाच्या रिडिंगविषयी शंका घेतली, ना कधी मला प्रश्न विचारले.
म्हटलं असा कसा हा एवढा सोपा-सरळ. काहीही विरोध नाही, काही नाही.
पण खरोखरच त्याने काही खुसपट काढलं नाही.
आणि अखेर गाडी घेतली.
आता आपण, मधुर भागवतने गाडी घेतल्यानंतर काय झालं, त्याची गोष्ट पाहणार आहोत,
पण ते पुढच्या भागात.
(क्रमश:)